Monday 14 May 2012

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज...
सिंहाचा छावा.......

जन्म :- १४ मे इ.स.१६५७
मृत्यू :- ११ मार्च इ.स १६८९


मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते. आठ भाषांचे जाणकार असणारे ‘बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिणारे राजे. आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट करून , स्वराज्यातील एकही किल्ला न गमावता , मराठ्यांचे आरमार शक्तीशाली करणारे छत्रपती संभाजीराजे. औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविणारा मराठ्यांचा हा छावा....

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ' राजेंच्या दुधाई बनल्या. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच, राजकारण लवकर आत्मसात केले. विद्याभ्यास, घोडस्वारी, शास्त्रविद्या, दंडनिती, राजधर्म , राजपुत्र धर्म, पितृसेवा, राजकारण अशा प्रकारे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण त्यांना दिले गेले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची जडणघडण अतिशय काटेकोर पद्धतीने राजमाता जिजाऊंच्या देखरेखी खाली होत गेली.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले. आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.


१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी राजे दुसऱ्यांदा पोरके झाले. तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या. संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते, त्यांना भ्रष्टाचार खपत नसे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले. शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले आणि संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली, तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता, जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल. पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तृत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना, संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला. महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी, लेखक जागा झाला. या कालावधीत त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’ , ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत निपुण असणाऱ्या संभाजीचे संस्कृत व हिंदी या भाषांवरील प्रभुत्व या ग्रंथांवरून दिसून येते.
याच काळात शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला. पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला. संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत, असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला. तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.

आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले. अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला. मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला. येथे संभाजी राजेंचा निर्णय चुकला. दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला. शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली. संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली. पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला. मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले. तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट घडली. संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

१५ मार्च १६८० राजारामच्या विवाहानंतर काही दिवसांनीच म्हणजे ३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले. ही बातमी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळी यांनी संभाजी राज्यांना कळवलीच नाही उलट लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे ठरवून २१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले. मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे पाठविण्यात आले. त्याप्रसंगी हंबीरराव मोहिते (सोयराबाईंचे सख्खे बंधू) यांनी संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे. त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता. अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते. या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून ते संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिले.

सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक, किल्ले रायगडावर झाला. या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले. पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली, तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्याी परली गावात हत्तीच्या पायी दिले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. त्यानंतर बुर्हाबणपुरची मोहिम, मोघलांशी लढा, सिद्दीचा बंदोबस्त, रामसेजचा ऐतिहासिक लढा, म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त, गमेश्वरला दगा अशा केवळ ९ वर्षांच्या काळात तब्बल १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्याम धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्यांामुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर संभाजी राजे यांना ३५५व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा..!!!

जय जिजाऊ !!
जय शंभूराजे !!
जय शिवराय !!

No comments:

Post a Comment