Monday 7 May 2012

कवी ग्रेस... 
अरुपाचे रुप दावणारा कवी...
जन्म:- १०मे १९३७
मृत्यू:-  २६मार्च २०१२ 

कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपूर येथे झाला. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नावं. पण "कवी ग्रेस" या नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९६७ साली प्रकाशित झालेल्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत, अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. त्यांच्या काही कविता आपल्या शालेय अभ्यासक्रमातही आहेत.
                                                      
"समजण्यास अत्यंत अवघड" इथपासून ते "केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही" इथपर्यंतच्या टीका कवी ग्रेस यांच्या काव्यावरती झाल्या आहेत. यावर "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही" असे त्यांचे म्हणणे होते.
ग्रेसची दुःखला सामोरे जाण्याची पद्धत विलक्षण होती. दुःख आणि कविहृदय याचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा आहे. दुःख जणू शहाणपण देण्याकरिताच निर्माण होत असावे. म्हणूनचदेठास तोडतानाही रडले फुलांचे अंग’ ही पुष्पवस्था त्यांना आदर्शवत वाटत असावी.. ग्रेसच्या कवितेचे दर्शनी स्वरूप अत्यंत मोहक आहे. संगमरवरावर नाजूक हाताने नक्षी काढून, तिला रंग दिल्यावर तिचे सौंदर्य खुलावे, तशी शब्दांची नक्षी कोरण्याचा ग्रेसला हव्यास होता. त्यांच्यासंध्याकाळच्या कविता’ प्रकाशित होऊन इतकी वर्षे लोटल्यावरही तिच्यातील ताजेपणा लोपले नाही.

ग्रेस यांना अगदी सुरवातीपासूनच शब्दशक्तीची विलक्षण समज होती. त्यांना ती नक्षीकामाकरिता अतिशय उपयोगी पडली. शब्दाच्या अर्थाची आणि नादाची इतकी खोल समाज असणारा कवी निराळाच. आवश्यक शब्दांच्या अचूक निवडीत त्याच्या प्रतिभेचे मर्म आहे. अपरिचित, आडवळणी, कृत्रिम, मुद्दाम निर्माण केलेले, इंग्रजीने संस्कारित केलेले असे कोणतेही शब्द त्याच्या कवितेत नाहीत. याचे कारण त्यांचे भावविश्व संपूर्णपणे भारतीय जीवन जाणीवांनी आणि वैचारिक विश्वाने संस्कारित केलेले होते. ग्रेसच्या अनवट अनुभूतीविश्वाने ग्रेसच्या शैलीला विवक्षित परिणाम दिले. शैलीतील प्रासादिकतेचे सौंदर्य तिला मान्य नव्हते, किंबहुना कविता आलंकारिक आणि भरजरी असली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. ग्रेसच्या शैलीत सुभाषितवजा चरणांना फार महत्व आहे. आपल्या प्रतिभेच्या घाटातूनच मराठी काव्य परंपरेतील आवश्यक घटकांचा स्वीकार त्यांनी केला होता.समकालीन भावकाव्यात कवी ग्रेसच्या कविता संपूर्णपणे वेगळ्या आहेत.. मर्ठेकारी काव्याप्रवाहत लिहिणाऱ्या अलीकडच्या कवींच्या संस्कृतिसंचीताला दिलेला नकार आणि बोजड गद्मयता यामुळे निर्माण झालेले मराठी कवितेतील आवर्त ग्रेसच्या कवितेने निवारले.. मराठी कवितेतील संस्कारभान तिने जगविले. परंपरागत मराठी संस्कृतीतील तपशिलाचा साहचर्यसंगीतयुक्त उपयोग करून तिला समृद्ध केले. पण त्यातच गुंतून पडता नेनिवेप्रधान भावावस्थेतील तरल गुढ अनुभूतिनी साकार करून एक अभिजात सोंदर्यशिल्पाचे रूप आपल्या कवितेला दिले. मराठी भावकवीतेला आपल्या अंतस्थ गेयतेचे परिमाण देऊन समृद्ध केले.

स्वतःच्या जगण्यातून इतरांना सदैव अस्वस्थ करणाऱ्या कविवर्य ग्रेस यांच्या जगण्याची धाटणी "मै ओर मेरी तनहाई" अशी होती.. वर्तमानातील प्रत्येक क्षणाची चाचपणी करून तो मनसोक्त जगण्याची आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्याच्या ग्रेस यांच्या जगण्याचे कुतूहल शेवट पर्यंत कायम राहिले. अनेकदा स्वतःच्या एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेस यांना या एकटेपणानेच जगण्याची मजा बहाल केली होती. कधी रडवणारे, कधी हसविणारे, कधी अंतर्मुख करणारे, तर कधी जगण्याचे आणि जगाचे अद्वितीय सत्य उमगायला लावणारे, स्वतःच्या जगण्यावर निस्सिम प्रेम करणारे, कवी ग्रेस म्हणजे कलंदर माणूस... म्हणूनच...

I am free But not Available.
Flat For Sale But not For Gentlemen.

असे अफलातून ओळी लिहून ठेवायचे.

इतरांना जगण्याचे भान आणून देतानाच त्यांना काहीतरी वेगळे तत्वज्ञान सांगणारे ग्रेस अतिशय दिलदार. त्यांच्या घरात आलेला कोणीही माणूस कधी रिकाम्या हाताने गेलाच नसावा. तो विचार, आनंदी जगणे, एकटे जगण्यातील ताकद, असे बरेच काही घेऊन गेलेला असावा.
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काही गाजलेले कविता संग्रह तर चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी हे त्यांचे गाजलेले ललित संग्रह होते.

कवी गेस हे नागपूरच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालयात (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. यांनी काही काळ पत्रकारितासुध्दा केली होती. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या दुस-या -साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
पुरस्कार :-

संध्याकाळच्या कविता’ या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८,
चर्चबेल’ ललितबंधाला राज्य पुरस्कार,
राजपुत्र आणि डार्लिंग’ राज्य पुरस्कार,
चंद्रमाधवीचे प्रदेश’ या कवितासंग्रहाला प्रादेशिक भाषेत बंगलोरमध्ये राज्य पुरस्कार,
मितवा’ या ललितबंधाला मारवाडी संमेलनात सम्मान, कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार-२०११, नागपूर भूषण २०११, नागपूर - विदर्भ फाउंडेशनचा "विदर्भभूषण' पुरस्कार -२०११,
"
वा-याने हलते रान" या ललित लेखसंग्रहाला २०१२ सालच्या "साहित्य अकादमी पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले होते. आजारी असूनही साहित्यविश्वातील सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी ग्रेस व्हिलचेअरवर या समारंभासाठी आले होते. पण बसल्या जागेवरून हलणे शक्य नसल्यामुळे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी, ग्रेस बसले होते तेथे जाऊन त्यांचा सन्मान केला.


कवी ग्रेस गेले काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होते.तीन वर्षांपुर्वी त्याना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून ते पुण्य़ाच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर २६ मार्च २०१२ रोजी ७५ वर्षीय ग्रेस यांची प्राणज्योत मालवली.

समकालीन कवींपेक्षा वेगळा विचार करून शब्दांच्या जगात लिलया वावरणारा हा जादूगार आज गेल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा, निष्पर्ण तरूंची राई, मरण या त्यांच्या गाजलेल्या कविता रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....!!! 

No comments:

Post a Comment