Showing posts with label आदर्श व्यक्तिमत्व. Show all posts
Showing posts with label आदर्श व्यक्तिमत्व. Show all posts

Tuesday, 8 January 2013

हिंदुहृदयसम्राट, एक खदखदता ज्वालामुखी- बाळासाहेब ठाकरे



एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताची तर्जनी हवेत उंचावत, तर कधी दोन्ही हात, बाहू पसरावेत तसे विस्तारलेले....लाखो सैनिकांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राच्या राजकरणात सतत निर्णायक आणि रोख ठोक भूमिका घेणारे तळपते राजकीय नेते....अफाट प्रतिभा  असलेला व्यंगचित्रकार.... असमान्य असलेला, पण सदैव सामान्य राहिलेला  माणूस  म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...... मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट....!!

सत्ता हातात असूनसुद्धा लोकप्रियता मिळविणे सोप्पे नसते. कारण एकाला खुश करणे म्हणजे इतर अनेकांना दुखावणे असे विचित्र समीकरण असते. आपली माणसेच पुढे आणायची झाली तर इतर गुणवान लोक दुखावले जाऊन दुरावतात. त्यांना न्याय द्यायचा तर आपली वाटणारी माणसे तोडली जातात. मात्र गेली पाच दशके या माणसाने संपूर्ण देशावर अक्षरशः गरुड केले. हा माणूस जितका सामान्यांना कळला तितका तर बुद्धीवाद्यांनाही कधी कळला नसेल....एखाच्या लोकनेत्याने असे अफाट प्रेम मिळवणे म्हणजेही फार मोठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रात आणि बाहेरच्याही असंख्यांना बाबासाहेबांची अफाट लोकप्रियता म्हणजे एक न उलगडणारे कोडेच वाटते.

आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळणाऱ्या प्रबोधनकार उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. घरातील प्रबोधनाची परंपरा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा आणि अस्सल मराठी बाण्याचा  वडील प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.  पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी  ऑगस्ट, १९६० मध्ये मार्मिकहे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे मार्मिकनाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.  संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली.

प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, उद्योग आहेत,पैसा आहे पण तरीही  मराठी माणूस गरीब-बेरोजगार आहे. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील)  मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. सुरवातीला शिवसेना आणि हिंदुत्त्वाची बाळासाहेबांची भूमिका या दोन्ही गोष्टी व्यवहारात उतरणे अशक्य असेच वाटले होते. पण या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. गर्व से कहो हम हिंदू हैया घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था-साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे - अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही  अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.

महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे  अत्यंत गरीब कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी  त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठाच दिली नाही तर राज्याच्या सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीत नेऊन बसवले.  बाळासाहेबांचा केंद्रबिंदू  नेहमी मुंबई आणि महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस  होता. कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारीत्र्यापेक्षाही संघटात्मक गुणवत्तेला त्यांनी विशेष महत्व दिले आणि समाजकारणातूनच शिवसेनेच्या राजकारणाची  मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.


बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार नव्हते किंवा केवळ राजकीय नेतेसुद्धा नव्हते. ते एक सजग आणि एक चोखंदळ वाचक होते, रसिक श्रोते देण्याची दिलदारी त्यांच्यात होती. असे  विविध पैलू असणारा, रसिकत्वाची वरची यत्ता असणारा राजकीय नेता आता होणे कठीणचं आहे. अनेकदा एखादे कलावंत व्यक्ति राजकारणाकडे वळली, त्यात यशस्वी झाली की ती आपले कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या फळताळात ढकलून मोकळी होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातला व्यंगचित्रकार  कधीच अव्हेरला नाही. उलट मनातील व्यंगचित्रांच्या कल्पनांना त्यांनी शाब्दिक स्वरूप देत आपल्या भाषणाची तिरकस शैली विकसित केली. बाळासाहेब खरे तर हाडाचे रसिक आणि कलाकारही. पण त्यांच्यामध्ये अन्यायाची आणि मराठी माणसाबद्दल लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती. लेखणी आणि कुंचला प्रभावीपणे चालवण्याचे सामर्थ्य होते. वक्तृत्वाची पकड तर सर्वानी पहिलीच आहे. अत्यंत फटकळ जीभ असूनही माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती.

प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यात ज्वलजहाल वाणीचे साम्य होते. दोघेही स्पष्टवक्ते आणि बंडखोर वृत्तीचे. प्रबोधनकारांच्या बौद्धिक पातळीवर किंवा त्यांच्यासारखे ते चिकित्सक नव्हते. पण लोकांच्या मनात काय चाललं आहे , याची नेमकी नस बाळासाहेबांना कळली होती. त्याच्या भाषणात व्यंगचित्र नव्हते , तर पंचलाईन होती. ती सामान्यांना भिडायाची. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरी मशीद पडली तेव्हा भाजप नेत्यांनी काखा वर केल्या. देशात हिंदुत्त्ववाद्यांमध्ये एकमेव बाळासाहेब असे होते जे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्याचा गर्व आहे म्हणत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

एवढी मोठी संघटना बांधणे, सत्तेचा मोह बाजूला ठेऊन ती चालवणे, मतांचा राजकारणात महाग पडली तरी सडेतोड भाषा वापरणे आणि धडाकून निर्णय घेऊन तो अमलात आणणे असे गुण अलीकडच्याच नेतृत्वात सापडणे अवघडच आहे. सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार खेळण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. सत्ता नव्हती तेव्हाही आणि सत्ता आली आणि गेली तरीही ज्यांच्या  सामाजिक, राजकीय भूमिकेत तसूभरही फरक पडणार नाही, असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व देशाच्या राजकारणात आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे . बेरीज वजाबाकी , फायद्या-तोट्याचा विचार न  करता बेधडक राजकारण करणारा हा उमदा  आणि दिलदार नेता , एकदा शब्द दिला की तो पाळायचाचं , त्यासाठी वाटेल तेवढी टीका झाली तरी चालेल, पण माघारचा  घ्यायची नाही हा त्यांचा रघुकुल बाणा. त्यासाठीच्या राजकीय परिणामांची तमा न बाळगता, आपल्या मार्गाने जाणारा हा मनस्वी नेता. 
अशा या हिंदुहृदयसम्राटाला त्रिवार वंदन...!!!

आले किती,गेले किती, संपले भरारा,
तुझ्या परी नामाचा रे, अजुनी दरारा.....
अजुनी दरारा….

जय महाराष्ट्र !!

Friday, 20 July 2012

अरण्य फुलावीणारा अवलीया- जादव पायेंग





जंगल म्हणजे परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं...अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्रजीवन सुखी करण्यासाठीचे यंत्रआणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. आता मात्र हे उध्वस्त होत आहेत कुठे मानवाच्या स्वार्थापायी तर कुठे निर्सगाच्या कोपामुळे...पण यातही काही लोक निसर्गाशी एकनिष्ठ असतात, त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यचं वानप्रस्थ करून टाकतात,  त्याचं एक उदाहरण म्हणजे जादव पायेंग...!

हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करनारा... आपल्या अवघ्या आयुष्या दररोजच वसुंधरा दिवस आणि पर्यावरण दिवस साजरा करणारा..रेताडओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत 'मुलई कथोनी' नावाचं एक संपुर्ण अरण्य फुलावीणारा... जंगलाकडून सगळं घेत असतांना आपणही त्याच काहीतरी देणं लागतो हे जाणणारा...तुमच्या-आमच्यासारखाच  सामान्य पण कार्याने असामान्य असणारा जादव पायेंग...!!
आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावात जादव पायेंग याने ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार केलंय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघतीन गेंडेशंभरेक हरणंशेकडो माकडंससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो.

१९७९ साली ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे तर बी रूजायला माती देखील ठेवली नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. शेकडो प्राणी आणि होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. हे सगळ पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं कीया बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.

१९८० मध्ये अरुना चापोरी भागात वन विभागाद्वारे २०० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले हे कार्य पूर्ण झाल्यावर सर्व कामगार निघून गेले, पण जादव तिथेच थांबला त्याने हे कार्य इथेच न थांबवता पुढे न्यायचं आणि पुन्हा जंगल निर्मार करायचं ठरवलं. त्याकरिता तो रोपटी मागायला वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला पण सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलंअसा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. त्याला घरचे आणि गावचे लोक 'मुलईम्हणायचे. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनीम्हणजे मुलईचं जंगल. मुलईच्या अथक परिश्रमाने बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे.

आपल्याला एका मुंगीचा चावा सहन होत नाही, इथे मात्र मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ताकाही होडीत बसुन आणि नंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवासात आपल्या जवळ बाळगत, त्यांचे अगणित चावे सहन करत त्या मुंग्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोलअर्जुनइजरगुलमोहरकोरोईमोज आणि हिमोलूची रोपटी जमवत फिरणा-या..लावलेली रोपटी जगावीतम्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या, मुलईला सरकार,गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही.

आज या जंगलाशी मुलईचं ईतकं दृढ नातं आहे की ईथले वाघएकशिंगी गेंडेही त्याला ओळखतातआजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा मग हत्तींवर गोळ्या चालवाअसं जाहिर आव्हान करणारा, एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे करणारा मुलई आहे. अधे-मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आलीकी झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच राहणारा मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. बायकोदोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिचं दूध विकून चालवतो.

२००८ नंतर जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. त्यानंतर वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांना  मुलईच्या मदतीने अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनीहे 'हॅपनींग डेस्टीनेशनबनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं.

बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टसलोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनीच्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतलीतर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही  अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतोअसा त्याला विश्वास आहे.

५३ वर्षीय पायेंगला त्याच्या या अथक प्रयत्नानंतर पर्यावरण आणि सरकार कडून वाह्वाही मिळाली. पर्यावरण संवर्धनाच्या ३२ वर्षाच्या संघर्षानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयने 'फॉरेस्ट मैन ऑफ असम' ही उपाधी देऊन सन्मानित केले. अगदी भावूक होऊन मुलई म्हणतो की, ‘मी सहा वर्षाचा असताना नष्ट होत असलेले कुरूवा पक्षी या भागात पहिले होते पण मागच्या ४५ वर्षात ते इथे दिसलेच नाहीत. आज मात्र तेच पक्षी माझ्या या जंगलात वास्तव्याला येतात या पेक्षा दुसरं आणखीन काय हवं’...

आपल्या कार्याने आदर्श घालून देणारा...पुरस्कार, प्रसिद्धी पासून लांब असून आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेला जादव पायेंग आपल्या सारख्या सामान्य माणसाला पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश देऊन जातोय...