Showing posts with label कलाकार. Show all posts
Showing posts with label कलाकार. Show all posts

Tuesday, 8 January 2013

हिंदुहृदयसम्राट, एक खदखदता ज्वालामुखी- बाळासाहेब ठाकरे



एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताची तर्जनी हवेत उंचावत, तर कधी दोन्ही हात, बाहू पसरावेत तसे विस्तारलेले....लाखो सैनिकांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राच्या राजकरणात सतत निर्णायक आणि रोख ठोक भूमिका घेणारे तळपते राजकीय नेते....अफाट प्रतिभा  असलेला व्यंगचित्रकार.... असमान्य असलेला, पण सदैव सामान्य राहिलेला  माणूस  म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...... मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट....!!

सत्ता हातात असूनसुद्धा लोकप्रियता मिळविणे सोप्पे नसते. कारण एकाला खुश करणे म्हणजे इतर अनेकांना दुखावणे असे विचित्र समीकरण असते. आपली माणसेच पुढे आणायची झाली तर इतर गुणवान लोक दुखावले जाऊन दुरावतात. त्यांना न्याय द्यायचा तर आपली वाटणारी माणसे तोडली जातात. मात्र गेली पाच दशके या माणसाने संपूर्ण देशावर अक्षरशः गरुड केले. हा माणूस जितका सामान्यांना कळला तितका तर बुद्धीवाद्यांनाही कधी कळला नसेल....एखाच्या लोकनेत्याने असे अफाट प्रेम मिळवणे म्हणजेही फार मोठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रात आणि बाहेरच्याही असंख्यांना बाबासाहेबांची अफाट लोकप्रियता म्हणजे एक न उलगडणारे कोडेच वाटते.

आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळणाऱ्या प्रबोधनकार उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. घरातील प्रबोधनाची परंपरा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा आणि अस्सल मराठी बाण्याचा  वडील प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.  पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी  ऑगस्ट, १९६० मध्ये मार्मिकहे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे मार्मिकनाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.  संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली.

प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, उद्योग आहेत,पैसा आहे पण तरीही  मराठी माणूस गरीब-बेरोजगार आहे. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील)  मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. सुरवातीला शिवसेना आणि हिंदुत्त्वाची बाळासाहेबांची भूमिका या दोन्ही गोष्टी व्यवहारात उतरणे अशक्य असेच वाटले होते. पण या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. गर्व से कहो हम हिंदू हैया घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था-साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे - अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही  अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.

महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे  अत्यंत गरीब कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी  त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठाच दिली नाही तर राज्याच्या सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीत नेऊन बसवले.  बाळासाहेबांचा केंद्रबिंदू  नेहमी मुंबई आणि महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस  होता. कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारीत्र्यापेक्षाही संघटात्मक गुणवत्तेला त्यांनी विशेष महत्व दिले आणि समाजकारणातूनच शिवसेनेच्या राजकारणाची  मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.


बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार नव्हते किंवा केवळ राजकीय नेतेसुद्धा नव्हते. ते एक सजग आणि एक चोखंदळ वाचक होते, रसिक श्रोते देण्याची दिलदारी त्यांच्यात होती. असे  विविध पैलू असणारा, रसिकत्वाची वरची यत्ता असणारा राजकीय नेता आता होणे कठीणचं आहे. अनेकदा एखादे कलावंत व्यक्ति राजकारणाकडे वळली, त्यात यशस्वी झाली की ती आपले कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या फळताळात ढकलून मोकळी होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातला व्यंगचित्रकार  कधीच अव्हेरला नाही. उलट मनातील व्यंगचित्रांच्या कल्पनांना त्यांनी शाब्दिक स्वरूप देत आपल्या भाषणाची तिरकस शैली विकसित केली. बाळासाहेब खरे तर हाडाचे रसिक आणि कलाकारही. पण त्यांच्यामध्ये अन्यायाची आणि मराठी माणसाबद्दल लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती. लेखणी आणि कुंचला प्रभावीपणे चालवण्याचे सामर्थ्य होते. वक्तृत्वाची पकड तर सर्वानी पहिलीच आहे. अत्यंत फटकळ जीभ असूनही माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती.

प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यात ज्वलजहाल वाणीचे साम्य होते. दोघेही स्पष्टवक्ते आणि बंडखोर वृत्तीचे. प्रबोधनकारांच्या बौद्धिक पातळीवर किंवा त्यांच्यासारखे ते चिकित्सक नव्हते. पण लोकांच्या मनात काय चाललं आहे , याची नेमकी नस बाळासाहेबांना कळली होती. त्याच्या भाषणात व्यंगचित्र नव्हते , तर पंचलाईन होती. ती सामान्यांना भिडायाची. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरी मशीद पडली तेव्हा भाजप नेत्यांनी काखा वर केल्या. देशात हिंदुत्त्ववाद्यांमध्ये एकमेव बाळासाहेब असे होते जे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्याचा गर्व आहे म्हणत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

एवढी मोठी संघटना बांधणे, सत्तेचा मोह बाजूला ठेऊन ती चालवणे, मतांचा राजकारणात महाग पडली तरी सडेतोड भाषा वापरणे आणि धडाकून निर्णय घेऊन तो अमलात आणणे असे गुण अलीकडच्याच नेतृत्वात सापडणे अवघडच आहे. सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार खेळण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. सत्ता नव्हती तेव्हाही आणि सत्ता आली आणि गेली तरीही ज्यांच्या  सामाजिक, राजकीय भूमिकेत तसूभरही फरक पडणार नाही, असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व देशाच्या राजकारणात आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे . बेरीज वजाबाकी , फायद्या-तोट्याचा विचार न  करता बेधडक राजकारण करणारा हा उमदा  आणि दिलदार नेता , एकदा शब्द दिला की तो पाळायचाचं , त्यासाठी वाटेल तेवढी टीका झाली तरी चालेल, पण माघारचा  घ्यायची नाही हा त्यांचा रघुकुल बाणा. त्यासाठीच्या राजकीय परिणामांची तमा न बाळगता, आपल्या मार्गाने जाणारा हा मनस्वी नेता. 
अशा या हिंदुहृदयसम्राटाला त्रिवार वंदन...!!!

आले किती,गेले किती, संपले भरारा,
तुझ्या परी नामाचा रे, अजुनी दरारा.....
अजुनी दरारा….

जय महाराष्ट्र !!

Tuesday, 7 August 2012

भारतीय सिनेमाला मिळालेला पहिला डान्सिंग स्टार- मास्टर भगवान पालव


सध्या भारतीय सिनेमाची शताब्दी सुरू आहे आणि याच सिनेजगतात तब्बल ६५  वर्षं घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे...गेली अनेक दशके चित्रपट रसिकांना बेधुंद करणारे..स्टंट चित्रपटांचे मर्दानी नायक व अभिजात नर्तक असे जगावेगळे मिश्रण असलेले...हास्य अभिनेते म्हणून नावाजलेले गेलेले कलाकार मास्टर भगवान यांची जन्मशताब्दीही 0१ ऑगस्टपासून सुरू झाली आहे...
१९१३ साली पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला. हेच १९१३ साल हिंदी चित्रपट जगतातील एका अवलिया मराठी कलावंताचे जन्मसाल आहे. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटांना मिळालेली अतीव लोकप्रियता ही कर्णमधुर-भावुक गीत-संगीताने मिळाली हे सर्व खरे, तेवढाच महत्त्वाचा यशाचा वाटा हा या चित्रपटातील नृत्यशैलीमुळे अधोरेखित झाला हेही तितकेच खरे...याच नर्तनकलेत आपली वेगळी छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेता म्हणजे मास्टर भगवान होय.
भगवान पालव या अस्सल कोकणी माणसाचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी मालवण भागात झाला. बालपण खुप हलाखीत काढणाऱ्या भाग्वानादादांचे शिक्षण कसंबसं चौथी पर्यंत झाले होते. त्यांना लहानपणापासूनच मास्टर विठ्ठल यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्यासारखे आपणही चित्रपटात काम करावं आणि सगळीकडे लोकप्रिय व्हावं असं भगवानदादांना नेहमी वाटायचं. पण गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं...
मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत...! त्यांच्यासारखे आपणही एक दिवस हीरो व्हावे हा एकच ध्यास त्यांनी विद्यर्थीदशेपासून घेतलेला. डोळस निरीक्षण, नियमित व्यायामाने कमविलेली शरीरयष्टी मर्दानी खेळांमुळे तिला आलेला लवचिकपणा, अफाट परिश्रम, मूळचा गमत्या स्वभाव, हाणामारी, शस्त्रविद्येतील कौशल्य, रोमारोमांत भिनलेला नैसर्गिक ऱ्हिदम, चित्रपटात काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व वडिलांचे आशीर्वाद या शिदोरीवर एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मूकचित्रपटाच्या जमान्यापासून सुरुवातीला विनोदी नटपुढे फायटर म्हणून चित्रपटात काम करू लागला व म्हणता म्हणता १९३८ मध्ये पाश्र्वगायक खान मस्ताना, मीर साहेबांचे संगीत असलेल्या बहादूर किसानचित्रपटाचे दादा कथालेखक व दिग्दर्शकही झाले.
1930 मध्ये दादाला कॉमेडियन म्हणून 'बेवफा आशिक' हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र 'बेवफा आशिक' या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी दादाला आपल्या 'जनता जिगर' या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. 'हिम्मते मर्दा' या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले..
१९४६ ते १९६८ या दरम्यानचा काळ भगवानदादांसाठी जॉकपॉटचा काळ ठरला. भगवानदादा हा खरे तर दिवसभर काबाडकष्ट करून, घामाचे पैसे खर्च करून ग्रांट रोडच्या बकाल वस्तीतील थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या गरीब जनतेचा आणि शाळा-कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो पाहयला आलेल्या विद्यार्थ्यांचा आवडता नायक होता.. त्यांच्या  मुद्राभिनयाला, हाणामारी किंवा हास्यप्रसंगाला थिएटरमध्ये टाळ्या, हास्य व शिट्टयांचा जल्लोष असे. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.
१९५१ ला रिलीज झालेल्या 'अलबेला’तील  एकाहून एक "सुपरडुपर हिट' गाणी आणि त्यावरील खास "भगवान-डान्स'ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'भोली सुरत दिल के खोटे' हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भगवान दादांचा हा रोंबासांबा डान्स अत्यंत सोपा परंतु आकर्षक नृत्यप्रकार असल्याने खूप लोकप्रिय झाला.. शाम ढले खिडकीतले तुम सीटी बजाना छोड दो' या गीतानं तर "छेडछाडवाल्या' गीतांचा आरंभ केला."ओ बेटाजी, किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम' या गीतात भांड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः भगवानदादांची होती."भोली सूरत दिल के खोटे। नाम बडे और दर्शन छोटे ' आणि "शोला जो भडके । दिल मेरा धडके। दर्द जवानी का सताए बढ बढ के' या गाण्यानं पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. या सिनेमातील अंगाईगीत सर्वांत लोकप्रिय ठरलं. 'धीरे से आजा री अखियन में निंदिया धीरे से आ जा' या लता मंगेशकर यांनी गायलेल्या अंगाईगीतानं आजही सर्वोत्कृष्ट अंगाईगीताचं स्थान कायम ठेवलं आहे.

भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्‍चात्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या "अलबेला'नं केलं. भगवानदादा यांचं "अलबेला'चं हे यश मात्र "एकमेवाद्वितीय' ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले..."झमेला', "कर भला', "लाबेला', "शोला जो भडके', "रंगीला....” पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. सिनेमानिर्मितीच्या उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवानदादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपलं लक्ष पूर्णपणे 'डान्स'वर केंद्रित केलं. पुढं कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमांत ते नाचू लागले. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा "प्लस पाइंट' होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. "चोरी चोरी', "झनक झनक पायल बाजे' या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या.
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवानदादा यांनी १९४२ मध्ये "जागृती पिक्‍चर्स' या बॅनरची स्थापना केली; तसेच स्वतः चा चेंबूर इथं "जागृती स्टुडिओ'ही १९४७ मध्ये उभारला.  पुढं गोरेगावमधल्या भगवानदादा यांच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात त्यांचे हे सारे स्टंटपट भस्मसात झाले. १९५१ मध्ये अलबेलाप्रदर्शित झाल्यावर बरोबर पंचवीस वर्षांनी रणजीत बुधकरांनी अलबेलाचे हक्क विकत घेतले. काळाप्रमाणे आवड बदलते असे म्हणतात. पण अलबेलाकाळाच्या कसोटीलाही पुरेपूर उतरला. नव्या तरुण पिढीने त्याचे न भूतो न भविष्यतीअसे स्वागत केले अलबेलाने परत रजत जयंती साजरी केली. आज भगवानदादांच्या स्टंटपटांची आठवण इतिहासजमा झाली असली, तरी त्याच्या कारकीर्दीला "चार चॉंद' लावणारा "अलबेला' शाबूत राहिला. भगवानदादांच्या "अलबेला'नं इतिहास घडवला. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला "पहिला डान्सिंग ऍक्‍टर' -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला.

दादरच्या ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते राहत होते, त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ भगवानदादा यांच्याशिवाय पुरा होत नसे. एकेकाळी एका स्टुडिओचे मालक असलेल्या भगवानदादांनी बंगला, गाडी असं सर्व काही ऐश्‍वर्य उपभोगलं. पुढं काळ बदलला. भगवानदादा "डेली पेड आर्टिस्ट' म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. भगवानदादा हे अहंकाराची अजिबात बाधा नसलेले कलाकार होते.
ऐश्‍वर्य आणि गरिबी त्यांनी एकाच मापात मोजली. ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते लहानपणापासून राहत असत, तिथंच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. ०४ फेब्रुवारी २००२ रोजी. जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता, तिथंच ते आयुष्याच्या अखेरीस येऊन विसावले.
मास्टर भगवान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक गोड स्वप्नच होते. अशा या हरफनमौला, दिलखुलास मास्टर भगवानदादांच्या जन्मशताब्दी निमित्त  विनम्र अभिवादन...!!!

Friday, 8 June 2012


सुमन कल्याणपूर     
भाव संगीतातील हिरवा चाफा...


मेरी आवाज ही मेरी पहचान है' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते, पण स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते, सुमन कल्याणपूर त्यातीलच एक..!
विश्वास, कृतज्ञता , प्रामाणिकपणा,आदर या आदर्श 'मूल्यांना' फारसा अर्थ नसणाऱ्या स्पर्धेच्या रानटी ईर्षा आणि स्वार्थने व्याप्त असलेल्या मायावी दुनियेतील गायिका सुमन कल्याणपूर यांची वाटचाल ही अनिश्चिततेच्या फे-यात अडकूनही कमालीची यशस्वी बनली म्हणूनच आज सुमनताईंनी पाश्र्वगायन सोडल्याला अनेक वर्षे उलटली तरी त्यांचे नाव गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याशा गावातील हेमाडी कुटुंबात झाला. घरातील धार्मिक, कलासक्त आणि रसिक वातावरणाने त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार झाले. तिथेच वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले. १९४३ मध्ये दु. महायुद्धाच्या काळात हेमाडी कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आणि सहा वर्षांच्या सुमनताईंच्या रीतसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यांना केशवराव आणि ज्योत्स्नाबाई भोळे हे शेजारी तर यशवंत देव हे शाळेतील संगीत शिक्षक म्हणून लाभले. शाळेत असतांनाच त्याचं एक गाणंशुक्राची चांदणी’ नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड केलं गेल पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनतार्इंची कारकीर्द मराठीतून सुरू होता हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.

दहा वर्षे वेगवेगळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतानाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अशाच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनतार्इंचा आवाज ऐकला. ‘इस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एचएमव्हीकडे स्वत:हून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली.

१९५४ साली सुमनताईंनी आपलं पहिलं गाणंमंगू’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं‘. संगीतकार मोहम्मद शफी आणि . पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. ‘कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांच पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं. मात्र लता दिदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याने सुरुवातीला तिला 'प्रतिलता' ही उपाधी मिळाली खरी पण याचा तिला त्रासच जास्त झाला. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलं. खरं तर सुमनताई यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. मात्र हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येत. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिदी चित्रपटसृष्टीची टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदींशी ज्यांचं पटत नव्हतं अशा काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनतार्इंकडून गाणी गाऊन घेतली. त्यामुळेच सुमनताईंना मोठ्या बॅनरचे, मोठ्या संगीतकारांचे , मोठ्या नायिकांचे सिनेमे तसे फार कमी मिळाले. विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. ‘स्वान्त सुखाय’ या तत्वाने त्या गायल्या. ज्या क्षणी त्यांची कोंडी होताना दिसली त्या क्षणी त्यांनी वाट बदलली. संघर्ष, त्वेष, इर्षा या पासून कोसो दूर राहिल्या. मोजकं आणि मनाला भावेल इतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं.

सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपल्या ताकतीची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव होती. अत्यंत्‍ गोड गळा आणि शब्दातील भावार्थ समजून समरसून गाणारी गायिका त्यामुळेच त्या वेगळ्या' ठरलल्या. या तत्त्वज्ञानामुळेच आज सुमन कल्याणपूर या नावाभोवती जे आदराचे आणि कौतुकाचे वलय निर्माण होते.

१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकीर्द खरया अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतु आवडणारी गाणी निवडली. ठरावीकच गायचं परंतु तेखास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदींचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यापैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण अधिक असल्याने पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना खरा न्याय मिळाला असच म्हणावं लागेल. नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनतार्इंकडूनच ते गाणे गाऊन घेत. ‘आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हेब्रह्मचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदींनीच गायलंय् असं वाटतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे.

मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनतार्इंचा आवाज वापरला. ही युगलगीतं इतकी लोकप्रिय
झाली की, नंतर रफी आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली. मराठीत आणि भाव गीतांच्या क्षेत्रात मात्र सुमन ताईला अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यांसमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. तसेच सुधीर फडके, श्रीनिवास खळे ,वसंत देसाई, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा), देवा दया तुझी ही (बोलकी बाहुली), जाग रे यादवा (प्रेम आंधळ असतं), तुझ्या कांतीसम रक्त पताका (अन्नपूर्णा) अशी असंख्य गाणीही लोकप्रिय झाली.
मराठी भावगीताच्या माध्यमातून त्यांनी अप्रतिम स्वरांगणाची निर्मिती केली. नंदाघरी नंदनवन फुलले , पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय,आकाश पांघरोनी जग शांत ,झिम झिम झरते श्रावण धारा ,घाल घाल पिंगा वाऱ्या, केतकीच्या बनी तिथे, नाविकारे वारा वही रे, तर भक्ती गीताच्या द्वारे (गणाधीश हो उठ लवकरी , ओमकार प्रधान रूप गणेशाचे,देह शुद्ध करूनी,चंदनाचे हात पाय ही चंदन, नाम आहे आदी अंती ,देव माझा विठू सावळा,चाल उठ रे मुकुंदा,श्रीरामाचे चरण धरावे) त्यांच्या स्वरातून रसिकांच्या मनावर अमृत शिंपणच होते. त्यांनी मराठी, हिंदी व्यतिरिक्त १३ भाषांमध्ये पाश्र्वगायन केलंय.

१९८० च्या दशकात कुटुंबांच्या जबाबदारया सांभाळत त्यांनी आपली करीअरची वाटचालही सुरू ठेवली. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत त्यांचे पिता आणि नंतर त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. विशेषतः त्यांच्या पतीने प्रसंगी स्वतः चे व्यवसाय मागे ठेवून पत्नीचे करीयर घडविण्यात सिंहाचा वाट उचलला! सुमनताईं बरोबर प्रत्येक ठिकाणी जाताना ते त्यांना नैतिक आणि मानसिक बळच देत होते. याच काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतीची प्रकृती, इत्यादींमुळे त्यांनी खूप मोजकी गाणी गायली. मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र, नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं.

देश विदेशात त्यांनी अनेक संगीताचे कार्यक्रम केले.बी बी सी टी.व्ही.वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. सुमनताईंना २०१० मध्ये महंमद रफी पुरस्कार तर २०११ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराप्रती त्यांनी हाएका सुमधुर आवाजाने दुसऱ्या सुमधुर आवाजाचा केलेला हा सन्मान आहे’ असे भाव व्यक्त केलेत तरपती जिवंत असताना हा गौरव मला मिळाला असता तर आम्हा दोघांनाही भरपूर आनंद झाला असता’ या वाक्यात त्यांना जाणवत असलेली खंतही व्यक्त केली.

मायावी नगरीत आयुष्य घालवून सुमन कल्याणपूर तिथल्या गढूळ वातावरणापासून अलिप्त राहीलेल्या आपली कारकीर्द आपल्या निकषांवर सुरू ठेवणाऱ्या तर 'जो मिल गया उसिको मुकद्दर समज लिया, जो खो गया मै उसको भूलता चला गया'या साहिरच्या तत्वाशी देव सारखीच अभेद्य राहिलेल्या सुमन कल्याणपूर.
संगीत हा जीवनाचा भाग आहे आणि पाश्र्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग असणाऱ्या सुमनताई आज पंच्याहातरव्या वर्षी सुखाने आयुष्य जगात आहेत.