Sunday 14 October 2012

विजयाताई लवाटे-‘मानव्य'चा मायेचा वारसा

देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा  वारसा देणाऱ्या विजयाताई लवाटे.....!!!
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी मानव्यसंस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामध्ये त्या काम करीत होत्या. तेथून वेश्यावस्ती जवळच असल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन विजयाताईंना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. या स्त्रियांशी चर्चा करताना त्यांचे विविध प्रश्न समजले. प्रथमोपचार सेवा संघ आणि नंतर निहारप्रकल्पातून त्यांनी वेश्या आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य सुरू केले. निहारमध्ये काम करीत असतानाच एचआयव्ही आणि एड्सचे रुग्ण आढळू लागले. या रोगाचा तीव्र गतीने होणारा प्रसार आणि लहान मुलांमधील प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातूनच मानव्य संस्थेचे बीज अंकुरले गेले.

वडील डॉक्टर असल्याने रुग्णांबद्दल आस्था,समाजसेवेची जाणीव त्यांच्या मनात होती पण सुरुवातीचे दिवस विजयाताईंच्या कामाच्या दृष्टीने अडचणीचे, त्रासाचे, कटकटीचे होते. मुळात वेश्यांच्या मुलांनी जायचं कुठं, त्यांना आधार कुणाचा हा प्रश्न् होता. उघड्यावर वाढणाऱ्या मुलांना ताईंच्या संस्थेच्या रूपाने एक मायेचं छत्र लाभलं. पुणे जिल्ह्यातच शहरापासून काही अंतरावर विजयाताई , चाफेकर , मुक्ता मनोहर यांनी एक छोटं वसतिगृह काढलं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांनाही आशेचा किरण दिसला. वस्तीतल्या गंदगीतून मुलं बाहेर येतील. चार बुकं शिकून आपल्या पायावर उभं राहतील असं कुठंतरी या साऱ्यांना वाटत होतं. पण  हे दिवस फार  तर कठीण होते. जागा, पैसे, अन्नधान्य, औषधं, शिक्षण, अंथरूण-पांघरूण हे सारं काही पुरवण कठीण होतं पण विजयाताईंनी या साऱ्या मुलांच्या अंगावरून आपल्या मायेची ऊबदार शाल पांघरली. मात्र त्या शालीची ऊब काही दिवस मिळाली आणि एके दिनी ही शालही काही सामाजिक कार्यर्कत्यांनी हिसकावून घेतली. तरीही विजयाताई डगमगल्या नाहीत.
राखेतून फिनिक्स पक्षी आकाशात झेपावतो असं म्हणतात नं तशाच विजयाताईंनी पुन्हा एकदा जिद्द धरली, उभारी घेतली आणि 'निहार' ची स्थापना केली. पुण्यात येरवड्याच्या पुढे जमीन घेतली. पैसे जमत गेले तसं वसतिगृह उभं राहिलं. तिथेही खूप अडचणी आल्या पाणी,वीज,रस्ता अशा एक ना अनेक प्रश्नंशी सामना करता करता विजयाताईंनी एके दिवशी ' निहार ' चा निरोप घेतला आणि ' मानव्या ' ची हाक दिली….मात्र वीस वर्षांत एड्सने भयाण रूप धारण केले होते. आता कार्य आणखी अवघड, गुंतागुंतीचे झाले होते. वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येक मुलाचा चेहराच सांगायचा की तो किती दिवसांचा सोबती आहे. इथेही विजयाताई डगमगल्या नाहीत. नेटाने उभ्या राहिल्या. कष्ट करीत राहिल्या.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनअसे म्हणत विजयाताई लवाटे यांनी १८ जून १९९७ रोजी मानव्य संस्थेची स्थापना केली. एचआयव्हीबाधित मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्यापासून १२ किलोमीटर अंतरावर भूगाव येथे ‘मानव्य गोकुळ’ साकारण्यात आले. एचआयव्हीबाधित महिलांच्या तान्हय़ा मुलांचे होणारे हाल लक्षात घेऊन नवजात अर्भकापासून ते तीन-चार वर्षांपर्यंतच्या मुलांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशातून मानव्य संस्थेची सुरुवात झाली. अनाथ मुलांना आधार देणे, या मुलांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, औषधोपचार आणि वैद्यकीय तपासणी सुविधा पुरविणे, आरोग्यवर्धक आणि चौरस आहार देणे आणि एचआयव्हीबाधित स्त्रियांना आधार देणे... मुलांचा सर्वागीण विकास करून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे हेच मानव्य संस्थेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना समाजात स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या गोकुळमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक मुलास जगण्याचा, सुरक्षिततेचा, समाजात वावरण्याचा आणि संपूर्ण विकासाचा हक्क दिला आहे.
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे म्हणून सुरु केलेल्या या संस्थेत मुलांची विशेष काळजी घेतली जाते. संस्थेतील सर्व मुलांच्या वेळोवेळी सगळ्या प्रकारच्या तपासण्या करणे, कॅल्शियम, बी. कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी हे पूरक औषधोपचार मुलांवर करणे, एचआयव्हीचा प्रसार रोखण्याबरोबरच मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उद्देशातून दिल्या जाणाऱ्या ‘एआरटीच्या  (अ‍ॅन्टी र्रिटोव्हायरल ट्रीटमेंट) औषधांमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित व्यायाम याकडेही लक्ष दिले जाते. सध्या संस्थेतील ६३ पैकी ५० मुलांना एआरटी ट्रीटमेंट सुरू आहे. उत्तम भोजनामुळे मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढत असल्याने उर्वरित १३ मुलांना या ट्रीटमेंटची गरज भासत नाही. सध्या वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगतीमुळे मुलांचे आयुर्मान वाढले आहे. संस्थेतील मुलांना त्वरित प्रथमोपचार मिळावेत यासाठी संस्थेच्या आवारामध्येचकृष्णार्पणम निरामय मेडिकल अँड रीसर्च सेंटर प्रकल्पांतर्गत २००६पासून चार खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. येथील उपचाराप्रमाणेच दर आठवड्याला या मुलांची ससूनमध्येही तपासणी करण्यात येते. एका ट्रस्टचे आणि औषध कंपनीचे यासाठी सहकार्य लाभते. पंचक्रोशीतील बाधित रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे तसेच एचआयव्हीविषयी जनजागृती करणे, परिणामांची माहिती देणे असे कार्यही स्वयंसेवक, समन्वयक आणि वैद्यकीय सल्लागारांच्या मदतीने केले जाते.
एचआयव्हीबाधित मुलांना सामाजिक स्वीकृती मिळणे अवघड आहे हे जाणून येथे या मुलांसाठी ८ वी पर्यंत शाळाही आहे. आठवी झाल्यावर या विद्यार्थ्यांना नॅशनल ओपन स्कूलतर्फे दहावीच्या परीक्षेलाही बसवले जाते. एअरकंडिशनिंग रिपेअरिंग, मोबाइल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन असे प्रशिक्षण देऊन या मुलांना आपल्या पायावर उभे केले जाते. शुभेच्छापत्रे , हँडिक्राफ्ट, शिवणकाम, शिल्पकला याबरोबरच फ्लॅट फाइल्स आदींचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आधुनिक काळाची पावले ओळखून संस्थेने संगणक प्रशिक्षण आणि फॅशन डिझायनिंग हे अभ्यासक्रमदेखील सुरू केले आहेत. विजयाताई  यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या या उपक्रमामुळे सुमारे पन्नास -पंचावन्न एचआयव्हीबाधित मुलांचे जिणे सुकर होते आहे.  
एड्स अवेअरनेस सेल पुरस्कार, मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार, युगंधर पुरस्कार, भाटिया मेमोरीअल रीटेबल ट्रस्ट अवार्ड दिल्ली(1995), भारतीय स्त्रीशक्ती पुरस्कार(1995), श्रीमती ताराबाई पुरस्कार(1996), फाय फाऊंडेशन पुरस्कार(1996), हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था पुरस्कार(1996), श्रीमती मीनाताई ठाकरे पुरस्कार(1996), सावित्रीबाई फुले पुरस्कार(1997), Rotary Foundation Jean Harris Award, माऊली आनंदी पुरस्कार(1998), श्रीमती कुसुमताई चौधरी पुरस्कार, केसरी पुरस्कार(2000), जनसेवा पुरस्कार(2001), बाया कर्वे पुरस्कार(2004) अशा विविध पुरस्कारांनी विजयाताई लवाटे यांच्या माणुसकी जपणाऱ्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
एके काळी एचआयव्हीबाधित मुलांचं मरण सुसहय़ व्हावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेची वाटचाल आता मुलांचं जगणं सुखाचं व्हावं अशी झाली आहे.  मर्यादित जागेत आणि ज्वलंत विषयाशी संबंधित काम असल्यामुळे स्वयंसेवक, हितचिंतक आणि देणगीदारांच्या प्रोत्साहनातून मानव्य गोकूळ प्रकल्प' स्वतःच्या जागेत आज  यशस्वी कार्यरत आहे. एचआयव्हीबाधित मुलांच्या आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन देणारी संस्था असेच मानव्यचे वर्णन करावे लागेल.  विजयाताईंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शिरीष लवाटे आणि स्नुषा उज्ज्वला लवाटे ही पुढची पिढी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मानव्य संस्थेचे, नव्हे मानवतेचे हे कार्य पुढे घेऊन जात आहे.
मानवतेचा वारसा देणाऱ्या...माणूस हाच माझा देव, माणुसकी हा माझा धर्म मानणाऱ्या आणि  हा देव आणि हा धर्म ज्या आईवडिलांनी शिकवला त्यांना यशाच संपूर्ण श्रेय प्रदान करत समाजभान जपणाऱ्या विजयाताई लवाटे यांना मानाचा मुजरा.....

संपर्क :
'मानव्य',
४६-३-१ लक्ष्मण व्हिला, फ्लॅट १३, पौड रस्ता,
जोग हॉस्पिटलजवळ, पुणे - ४११०३८
फोन : २५४२२२८२
मानव्य गोकूळ : माताळवाडी फाटा, पौड रस्ता, भूगाव, ता. मुळशी, पुणे - ४११०२१
फोन : ३२३०२६९५
संकेतस्थळ - www.manavya.org

Saturday 22 September 2012

रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ - स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी

एखादी कल्पना सुचली की ती मूर्त स्वरूप देऊन ती लोकोपयोगी होईल असे काम स्वार्थत्यागाने करणारे...अतिशय निरलस आणि सेवाभावी वृत्तीने गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणाऱ्यारुग्णांना अतिशय आवश्यक असलेल्या, परंतु सहजरितीने न मिळणाऱ्या अनेक वस्तू नि:शुल्क वा अत्यल्प दरात पुरविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेची स्थापना करणारे रुग्नसेवेतील सेवाभाव जपणारे स्वातंत्र्यसैनिक (कै.) द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी..
कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्यारुग्णोपयोगी वस्तुसंग्रहया कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. तेव्हाचा काळ हा विषमज्वर असाध्य आजार होता गुरुजींचा भाऊ विषमज्वराने आजारी होता. त्याच्या शुश्रूषेसाठी बर्फाच्या पिशवीची गरज होती. खूप प्रयत्न करूनही बर्फाची पिशवी गुरुजींना मिळत नव्हती. अखेर एका सधन विद्यार्थ्यांच्या घरी अडगळीत, धूळ खात पडलेली पिशवी गुरुजींना मिळाली आणि उपचार सुरू झाले.
या धावपळीतच गुरुजींच्या मनात विचार आला, की रुग्ण असलेल्या भावाच्या सेवेसाठी जी वेळ आपल्यावर आली तशी ती आणखी कितीतरी जणांवर येत असणार. ही वेळ खरेतर कोणावरच येता कामा नये. स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींच्या मनाने मग या कामाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभही लगेच झाला. गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटर, युरीन पॉट, कुबडी ही साधनेदेखील तेव्हा दुरापास्त होती. सर्वसामान्यांना ती परवडणे शक्यच नव्हते. सोलापुरातील अनेक धनिकांच्या घरात पडून असलेली अशी साधने गुरुजींनी गोळा केली. स्वत:च्या तुटपुंज्या पगारातील पैसे बाजूला ठेवून ते साठवले आणि त्यातूनच १९३२मध्ये रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह-सोलापूरया संस्थेची स्थापना त्यांनी केली.  रुग्णसेवेचे काम भावे गुरुजींनी सुरू केले, तेव्हा निघाले युरीन पॉट वाटायलाअशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. ते सातत्याने आणि सेवावृत्तीने काम करत राहिले. या कामासाठी आयुष्य वेचलेल्या गुरुजींच्या कामाला पुढे रुग्णसेवेचा भावे प्रयोगअशी जनमान्यता मिळाली.

चाकाची खुर्ची, वॉकर, कुबडय़ा, कमोड खुर्ची, स्ट्रेचर आदी अनेक साधनांची आवश्यकता आजारपणातच भासते आणि या साधनांचे महत्त्वदेखील त्याच काळात समजते. ज्या कुटुंबावर ही वेळ येते, त्यांच्यासाठी ही साधने मिळवणे अनेकदा जिकिरीचे होऊन बसते. या वस्तू विकत घेण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा काळात लोक चिंतातुर होतात. काय करावे समजत नाही. चांगली आर्थिक परिस्थिती असली, तरी वस्तू कायमस्वरूपी लागणार नसल्यामुळे ती विकत घेणेदेखील व्यवहार्य नसते. समाजाची ही गरज ओळखून भावे गुरुजींच्या संस्थेने रुग्णोपयोगी वस्तू गरजूंना नाममात्र भाडय़ाने आणि गरिबांकडून कोणतेही भाडे न आकारता देण्याचे काम सुरू केले. हळूहळू लोकांना या कामाचे महत्त्व पटू लागले.

गुरुजींचा पिंड निरलस समाजसेवकाचा होता. सेवेची कोणतीही कल्पना मनात आली की ती पूर्णत्वाला नेणे एवढाच त्यांचा ध्यास असे. त्यातूनच संस्थेला सेवेचे नवे आयाम मिळाले. साहित्य पुरवण्याबरोबरच रुग्णांची घरी जाऊन सेवा करणे, किरकोळ आजारात किरणोपचार करणारी यंत्रे अत्यल्प भाडय़ात देणे, रुग्णांच्या सेवा-शुश्रूषेसाठी अटेंडंट देणे, महापालिका शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवणे, मुलांना दुधाचे वाटप, मोफत दवाखाना, फिरता दवाखाना, अत्यल्प दरात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे ही आणि अशी अनेक कामे संस्थेने सुरू केली. या सर्वच कामांची निकड एवढी होती, की संस्थेचा पसारा वाढत राहिला. त्यातून गुरुजींनी सोलापुरात संस्थेची स्वत:ची वास्तू निर्माण केली आणि आजही या वास्तूचा वापर रुग्णसेवा तसेच अनुषंगिक उपक्रमांसाठीच सेवाभावनेतून केला जातो.

सोलापुरात आणि जिल्हय़ात ज्या ज्या कोणी महत्त्वाच्या व्यक्ती येतील त्यांना आग्रहाने संस्थेत न्यायचे आणि संस्थेच्या कामाची ओळख करून द्यायची, यासाठी भावे गुरुजी खूप आग्रही असायचे. अनेकांना ते मुंबईत आणि दिल्लीतही जाऊन भेटले होते. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, झैलसिंग, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, भाऊसाहेब बांदोडकर, कमलाताई होस्पेट, लीलाताई मुळगावकर, सुशीलकुमार शिंदे अशी शेकडो नावे सांगता येतील की ज्यांनी संस्थेचा गौरव केला आहे.

अनेकदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेले काम त्या व्यक्तीच्या पश्चात तितक्या प्रभावीपणे चालतेच असे नाही. भावे गुरुजींनी मात्र स्वत: काम करतानाच अनेक सहकारी असे तयार केले, की गुरुजींच्या पश्चात हे काम आजही पूर्वीच्याच सेवाभावी वृत्तीने आणि आत्मीयतेने गुरुजींनी घालून दिलेल्या मार्गाने आजही सुरू आहे. सत्त्याण्णव वर्षांपर्यंत गुरुजी हे काम करत राहिले. जीवनातील त्रेसष्ट वर्षे त्यांनी या कामासाठी दिली. रुग्णांचे नातेवाईक वस्तू नेण्यासाठी रात्री-अपरात्री, अगदी सणावाराच्या दिवशीदेखील येतात आणि त्यामुळे बारा महिने-चोवीस तासही या कामाची वेळ आहे; पण कधीही न कंटाळता, न थकता, न रागावता गुरुजींचे संपूर्ण कुटुंब हे काम करत राहिले. त्यात पत्नी इंदिराबाई यांची फार मोलाची साथ त्यांना लाभली. आलेल्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला दिलासा देण्याचे कामही वस्तू देताना केले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ही संस्था अडचणीच्या काळात मोठा आधार ठरते.  गुरुजींचे पुत्र रमेश हे १९७७ मध्ये पुण्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आणि पुण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी संस्थेचे काम पुण्यातही सुरू केले. पुण्यात आता रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्थेची तीन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये वस्तू नाममात्र भाडय़ाने देण्याचे काम चालतेच, शिवाय रमेश भावे यांनी या सेवाकार्याला आता आणखी काही पैलू जोडले आहेत. गरम पाण्याची पिशवी, बर्फाची पिशवी, चाकाची खुर्ची, घडीच्या कुबडय़ांपासून ते एअरबेडपर्यंत या आणि अशा अनेक रुग्णापयोगी वस्तू अत्यल्प दरात आणि प्रसंगी नि:शुल्क पद्धतीने देण्याचे काम केंद्रातर्फे पुण्यात चालते. गरीब आणि गरजू रुग्णांना सवलतीने रक्त मिळवून देण्याचेही काम केले जाते. रक्तदानानंतर मिळणारी आणि रुग्णाचे सहाशे ते एक हजार रुपये वाचवणारी सवलतपत्रे संकलित करून ती गरजू रुग्णांना देणे, गरजूंना अध्र्या किमतीत रक्त मिळवून देणे, ज्येष्ठांना एक रक्तपिशवी विनामूल्य देणे, गरजूंना रक्त मिळावे यासाठी रक्तपेढय़ांना निधी देणे यांसह अनेक कामे संस्थेतर्फे सुरू आहेत.

रमेश आणि त्यांची पत्नी ललिता भावे हे दोघेही गेली चाळीस वर्षे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून रुग्णसेवेचे काम पुण्यात करत आहेत. रुग्णसेवेबरोबरच संस्थेसाठी आर्थिक स्वरूपाची मदत गोळा करण्याकरता सातत्याने पायपीट करावी लागत असली, तरीही ते ज्या पद्धतीने हे काम करतात त्यामागची प्रेरणा खरोखर भावे प्रयोगहीच आहे.
 
संस्थेतर्फे भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. ज्या वयोवृद्ध, महिलारुग्ण आणि गरीब रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देणे किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्य उपलब्ध करून देणे हे काम पुण्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत त्यासाठी लाखो रुपये उभे करण्यात आले आणि ते गरजू रुग्णांच्या रक्तासाठी वापरण्यात आले. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. समाजाच्या पाठबळावर सुरू असलेल्या या कामात गुरुजींनी आणि त्यांच्यानंतर हे काम सांभाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांने, विश्वस्ताने कमालीचा पारदर्शीपणा ठेवला आहे. कोणतीही आर्थिक बाब पावतीशिवाय करायची नाही हा गुरुजींचा दंडक होता. तो आजही कसोशीने पाळला जातो. ज्या कामासाठी समाजाने निधी दिला आहे, त्याच कामासाठी त्यातील पै अन् पै खर्च झाला पाहिजे ही संस्थेतील प्रत्येकाचीच तळमळ असते. म्हणूनच संस्थेने समाजात खूप मोठी विश्वासार्हतादेखील मिळवली आहे. संस्थेचे कार्य गेली ऐंशी वर्षे सुरू आहे ते समाजाच्या पाठबळावर. भविष्यातही रुग्णांच्या मदतीसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे.

भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. वयोवृद्ध रुग्ण, महिला रुग्ण आणि गरीब रुग्ण यांच्यापैकी ज्यांना ज्यांना रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी या योजनेत सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्यदेखील उपलब्ध करून दिली जाते. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. अशा रुग्णांना रक्तसंक्रमणासाठी आवश्यक असणारे डायलायझरहे उपकरण सातत्याने विकत घ्यावे लागते. त्यामुळे डायलिसीसच्या रुग्णांकडून या उपकरणाची मागणी सतत होत असते. रक्त मिळवणे सर्व दृष्टींनी खर्चिक व अवघड होत असल्यामुळे किमान हे उपकरण गरजू, गरीब रुग्णांना सवलतीने आणि शक्य झाल्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना संस्था आता हाती घेत आहे.संस्थेला एका मोठय़ा ट्रस्टकडून गेली अनेक वर्षे भरीव देणगी मिळत होती. यंदा मात्र काही कारणांनी या ट्रस्टने देणगीबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी नव्या योजना हाती घेत असतानाच संस्थेच्या कामालाही मर्यादा येत आहेत. गरजू रुग्णांसाठी खूप काम करण्याची गरज आहे, काम करण्याची तयारीदेखील आहे; पण हाती तेवढा निधी नाही, अशा परिस्थितीत सापडलेल्या या संस्थेला आता समाजानेच पाठबळ देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
  
समाजाच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या या कामाची समाजाला आजही नितांत गरज आहे. इतरांच्या व्यथा, वेदना थोडय़ाशा हलक्या करण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सेवेचा ध्यास घेतलेल्या या भावे प्रयोगाला शक्य ती मदत करायलाच हवी.
ज्यांना मदत करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा...
* संपर्क : रमेश भावे, कोथरूड (फोन नंबर-  ९६२३९ ३८१०९)
सौजन्य- लोकसत्ता...

Saturday 15 September 2012

कविवर्य विंदा करंदीकर - कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील दृष्टी असलेले कवी...


मराठी साहित्यातील एक ख्यातनाम कवी, लेखक, समीक्षक..... मराठी साहित्य संस्कृतीच्या अभूतपूर्व सर्जनशीलतेच्या बहराचे वासंतिक पर्वाचे जनक आणि त्याच पर्वाचे एक अपत्य....त्या वासंतिक वनात स्वतःच्या सर्जनाचा वाफा फुलवित सुसंस्कृत साहित्य निर्माण करणारे.. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळवित, मराठीला आपल्या श्रेष्ठ काव्यनिर्मितीने तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कविवर्य विंदा करंदीकर....!!!
‘आपल्या प्रतिभेचे शील शाबूत ठेवण्यासाठी व तिच्या विकासाच्या शक्यता जिवंत राखण्यासाठी कवीने आपली मस्ती सांभाळली पाहिजे...’ असा एक महत्वाचा कानमंत्र करंदीकरांनी सांगितला आणि या ‘मस्ती’ची व्याख्याही त्यांनी केली आहे. - ‘काव्याच्या सृजनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’ हे कवीचे व्रत आहे. या व्रतातूनचं विंदा करंदीकरांची कविता ही जन्मली आणि आपल्या मस्तीत मुक्तपणे जगली....
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म  २३ ऑगस्ट१९१८ रोजी
घालवणसिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर  हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरीरामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबईएस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठीइ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली.  संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातीलपहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
१९३७ ते १९८५ हा काळ म्हणजे  विंदांच्या लेखन प्रवासाचा कालखंड.... या कालखंडात त्यांनी आपल्या जीवनधर्म असलेल्या काव्यरचनेत विविध प्रयोग केले. बालकविता, तालचित्रे, अभंग, सूक्ष्मरचना, मुक्तसुनिते ,विरूपिका असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. ‘अमृतानुभवा’ सारख्या तत्वकाव्याचे अर्वाचीनीकरण हा सुद्धा विंदांचा एक प्रयोगचं होता. अशा अनेक अंगांनी काव्यनिर्मिती करून करंदीकरांनी मराठी कवितेत फार मोलाची भर टाकली. विंदांना कविता म्हणजे स्वदेशगंगा वाटायची.. त्यांची  ‘स्वदेशगंगे’ पासूनची  काव्यगंगा पुढे विविध वळणे घेत वाहू लागली .कालांतराने या गंगेला  ‘बालकविता’ यमुनेच्या रुपात मिळाली. मोठ्या माणसांना ज्ञानात्मक आनंद देणारी आणि लहान मुलांना वेगळ्या राज्यात नेणारी बालकविता ही विंदांची मराठी  काव्यासृष्टीला मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या ‘मावशी’ ,‘घड्याळ’, ‘पंतोजी’, ‘बेडकाचे गाणे’, ‘जादूगार’, ‘पतंग’ या बालगीतातील नाट्यप्रसंगातून तर त्यांनी बालकांचे निरागस मन प्रगट केले.
विंदा कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही ते इंग्रजी साहित्याचे गाढे, व्यासंगी प्राध्यापक होते. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते. इंग्रजी साहित्य आणि त्यातील विचारातून  त्यांच्या स्वतःच्या मर्मदृष्टीला, चिकित्सक वृत्तीला खूप काही घेता आले . काही महत्वाच्या इंग्रजी साहित्यकृतींचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. कुठल्याही साहित्यसंस्कृतीचा कणा हा भाषा असतो, याचं सजग भान असल्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापक असूनही मराठीतील नानाविविध बोलीभाषांच्या  खजिन्याकडे ना कधी दुर्लक्ष केलं आन्ही कधी तुच्छ लेखलं... विंदांची वृत्ती ही जीवनाभिमुख होती. जीवनाचे स्वागत करणारी, जीवनाविषयीची अशा बाळगणारी, त्यात रस घेणारी होती. त्यांच्यामध्ये नैराश्य किंवा कडवटपणा नव्हता. त्यांच्या कवितेने कधी कधी धारदार शस्त्राप्रमाणे वर केले तर कधी उपरोधाचा तीव्र प्रहार केला पण तरीही माणसांमधील मार्दव आणि कोमलता यांचा त्यांना विसर पडला नाही...
जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी  जाणीव विंदांच्या कवितेला व्यापून टाकते. ‘ये यंत्रा ये’ म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा,  क्रांतीची चाहूल घेत, ‘माझ्या मना बन  दगड’ असेही म्हणतात...वर्गसंघर्षचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. त्यांची बालगीते असो, परम गीते असो वा स्त्रियांसाठी लिहिलेले स्थानगीते असो, यातील प्रत्येक गीतांमध्ये ‘जीवनातल्या वास्तवाची पेरनी सहजगत्या  करणे’ हे त्यांचे खास वैशिष्ट्य दिसून येते. ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ या त्यांच्या ललित लेखांतील बहुतेक  निबंधांतून त्यांची चिंतनशील वृत्तीही दिसून येते. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य...
 विंदांनी पारंपारिक मुक्तछंदातही अनेक प्रयोग केले. मुक्तछंदाचे स्वातंत्र्य आणि सुनीत रचनेतील ओळींचे बंधन यांच्या मेळातून ‘ मुक्तसुनीत’ तयार केले. ‘आज प्रार्थना प्राणाऐवजी’ हे तेरा ओळींचे तर ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगाऱ्यावर’ हे  पंधरा ओळींचे सुनीत त्यांनी लिहिले. यात वृत्त व यमक संगती नसली तरी आवाका व परिणाम या दृष्टीने सुनितप्राय राहणे हे मुक्तीसुनितचे लक्षण ठरले.
विंदांनी जशा मुक्छांदात कविता लिहिल्या तशा गाजला अभंग या प्रकारातही रचना केल्या... त्यांनी सामाजिक आशयाची कविता केली तर प्रेमकावितेला नाक न मुरडता तितक्याच आत्मीयतेने प्रेमकविताही केल्या, जितक्या निष्ठेने प्रौढांसाठी प्रलाग्भ कविता लिहिली तितक्याच निष्ठेने बालगीतसुद्धा लिहिली.. विंदा समकालीन साहित्याबद्दल म्हणत की .."वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." याचं विचाराला अनुसरून विंदांची लेखणी चोफेर चालली.  कवितेसोबतच ललित लेखन, समीक्षा. अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रांतात विंदा लीलया वावरत राहिले.
विंदा करंदीकरांना त्यांच्या या साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे...
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार,केरळ (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान, मध्यप्रदेश (१९९१)
जनस्थान पुरस्कार,कुसुमाग्रज प्रतिष्ठान( १९९३)
कोणार्क पुरस्कार, ओरिसा(१९९३)
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स

आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी   जाने. २००३  रोजी जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी आंतरिक भावना व्यक्त केल्या. काव्य हाच जीवनधर्म मानणाऱ्या विंदांचे १४ जानेवारी २०१० रोजी मुंबई येथे  त्यांचे निधन झाले.
विंदांच्या कितीही कवित्या आठवल्या तरी त्यांची ‘घेता’ ही कविता मराठी काव्यसृष्टीच्या अंतापर्यंत स्मरणात राहील..
देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
देणाऱ्याचे हात घ्यावेत ....
अशा या मराठी साहित्यविश्वात बहुस्पर्शी कामगिरी करणाऱ्या कलावंत म्हणून मोठे असलेल्या आणि माणूस म्हणून त्याहूनही मोठे असलेल्या कविवर्य विंदा करंदीकरांना शतशः नमन........

Friday 7 September 2012

कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल - तेजाने तळपणारी ज्योत....


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावळीत जनरल भोसले, कर्नल सहगल यांच्यात झळकणाऱ्या....पूर्वायुष्यातील तेजस्वी पर्वाचा गर्व न बाळगणाऱ्या...जातिभेद, गरिबांच्या पिळवणुकीबद्दल तळमळीने बोलणाऱ्या, संघटित लोकक्रांतीसाठी अजूनही धडपडणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या....वाईट राजकारणाला नाकं न मुरडता, न घाबरता पेटून उठाम्हणणाऱ्या...भारतीय इतिहासात स्वत:च्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या वीरांगना...!!!
अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थानात प्रथम लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व होते नंतर  महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशांनी अहिंसक लढे दिले. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, या विचारावर विश्वास असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौजेच्या राणी झाशी रेजिमेंट या महिलांची पलटणच्या प्रमुख भारतातून सिंगापूर मध्ये व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या पहिल्या स्त्री सेनापती कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल....!!
डॉ. लक्ष्मी स्वामिनाथन यांचा जन्म चेन्नई येथे २४ ऑक्टोबर  १९१४ रोजी डॉ. एस स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्याच्या घरी झाला. कॅप्टन लक्ष्मी यांचे वडील बॅ. स्वामिनाथन हे चेन्नईतले अतिशय पुढारलेल्या विचारांचे, जात-पात, धर्म ही उतरंडीची समाजव्यवस्था ण मानणारे प्रसिद्ध वकील होते.ते  एक असे देशभक्त होते की ज्यांना इंग्रजांवर त्यांनीच दिलेल्या शिक्षणाने मात करायची होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या बायकोला मुलींना इंग्रजी,  तमिळ,मल्याळी या भाषा शिकविल्या. घरात सतत इंग्रजी वातावरण ठेवले पण एका इंग्रजाच्या खुनाचे वकीलपत्र बॅरिस्टर स्वामिनाथन यांनी घेतले म्हणून या परिवाराला संबंधित सर्व इंग्रज स्त्री-पुरुषांनी बहिष्कृत केले तेव्हापासून त्यांच्या घरात भारतीय वातावरण असायचे. त्याच वेळी महात्मा गांधीजींची असहकाराची चळवळ सुरू झाली. लक्ष्मीने आपले सर्व परदेशी कपडे व वस्तू होळीत टाकल्या. म. गांधींबद्दल तिला परम आदर वाटत होता तो अगदी शेवटपर्यंत.
१९२८ मध्ये कॅप्टन लक्ष्मी यांनी कोलकाता काँग्रेस मध्येआपल्या आई आणि २०० स्वयंसेविकांबरोबर   गणवेशात संचलन केले. त्यांच्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक दिवसाची अटकही झाली. शाळा, कॉलेजवर बहिष्कार घालून शिक्षण सोडणे ही कल्पना कॅप्टन लक्ष्मी यांना पटली नाही. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण हवेच व ते त्या वयातच घेतले पाहिजे, असा त्यंचा ठाम विश्वास होता. मात्र या चळवळीत त्यांनी आपल्या अंगावरचे सर्व दागिने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या मदतीसाठी दिले.
सरोजिनी नायडूंची बहीण सुहासिनीचे कॅप्टन लक्ष्मीच्या आयुष्यात पदार्पण हा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. सुहासिनीकडूनच त्यांनी राजकारणाचे प्राथमिक धडे घेतले. गांधी व नेहरू यांच्याकडून कधीही समग्र क्रांती होणार नाही. त्यांचे राज्य हे श्रमजीवींचे असणार नाही. जगभर श्रमिक भरडला जातोय. म्हणून समाजवादाला पर्याय नाही असे सुहासिनीने लक्ष्मी यांच्या  मनावर ठसविले. कॅप्टन लक्ष्मी एम.बी.बी.एस.चा अभ्यास करीत होत्याच पण त्याचबरोबर रशियन राज्यक्रांती, रशियामध्ये साम्यवादाचा उदय वगैरे जे जे साहित्य मिळेल ते वाचत असतं. एडगर स्नोचे Red star over China या पुस्तकाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. जे पटेल तेच स्वीकारायचे व कितीही विरोध झाला तरी करायचे हे तिथे ध्येय होते.  त्यांच्या वडिलांवरही कम्युनिस्ट विचारांचा पगडा आणि तिला आलेले अनुभव त्यातूनच त्यां पुढे कट्टर कम्युनिस्ट बनल्या.
कॅप्टन लक्ष्मी यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच बी. के. एन. राव नावाच्या विमानचालकाशी त्यांनी  प्रेमविवाह केला पण, लग्नानंतर लगेचच त्यांचा भ्रमनिरास झाला. राव यांना आपली सुंदर पत्नी म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट वाटत होती. त्यांनी तिला कॉलेज सोडून संसार करायचा असे बजावले. त्यामुळे आपल्या ध्येयापुढे आड येणाऱ्या प्रेमविवाह झालेल्या नवऱ्याचा कायमचा त्याग करून यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९३८ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून त्यांनी  स्त्रीरोगतज्ज्ञाची पदवी घेतली आणि व्हिक्टोरिया क्रॉस हॉस्पिटलमधील विभागात नोकरी धरली. ११जून १९४०ला पुढील अभ्यासासाठी आणि गरीब स्त्रियांची सेवा करण्याच्या ध्येयाने त्या सिंगापूरला गेल्या. कॅप्टन मोहन सिंग या ब्रिटिश सेनेतील भारतीयाच्या साहाय्याने त्यांनी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ स्थापन केली.
सुभाषचंद्र बोस हे आशियात दाखल झाल्यावर त्यांनी सिंगापूर येथे सार्वजनिक सभेमध्ये भारतीय नागरिकांना उद्देशून भाषण केलं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा.त्यांच्या भाषणानंतर डॉ. लक्ष्मीने त्यांची भेट घेतली. त्यांना विचारलं, की तुम्ही स्त्रियांना सैन्यात प्रवेश का देत नाही?’ सुभाषचंद्र बोस म्हणाले, ‘स्त्रियांची पलटण तयार करण्यासाठी कमीत कमी ३००० स्त्रिया हव्यात. एवढय़ा तयार होतील का?’ तत्क्षणी  डॉ. लक्ष्मी यांनी त्यांना ३००० स्त्रियांना राजी करण्याचा शब्द दिला. हिंदुस्तानी बायका मागे राहणाऱ्या नाहीत. त्या अत्यंत कर्तृत्ववान आहेत हे ओळखून बाईंनी सिंगापूर-मलेशियातल्या ३००० बायका गोळ्या केल्याही. आम्ही रक्त देऊ, कुर्बानी देऊ, पण बायका म्हणून मागे ठेवू नका.हे त्यांनी बोस यांना कळकळीने सांगितलं. आणि स्त्रियांची पलटण तयार झाली. पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’चे सुभाषचंद बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’ असे नामकरण केले व या फौजेची ‘राणी झाशी रेजिमेंट’ ही महिला पलटण स्थापन करून लक्ष्मी यांची प्रमुख म्हणून नेमणूक केली.  त्यानंतर त्यांनी पूर्व मलाया व सिंगापूरचा दौरा करून बायकांच्या सभा घेतल्या. ज्यांना पलटणीत येता येत नव्हते, त्यांना सैन्यासाठी कपडे शिवणे, विणणे, बँडेज तयार करणे अशी कामेही सुचविली. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला.

२१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबूंनी आझाद-हिंद-सरकारची घोषणा केली व लक्ष्मीला महिला व बालकल्याण खात्याची कॅबिनेट मंत्री केले. दुसऱ्याच दिवशी महिला पलटणीचे विधिवत व आझाद-हिंद सरकारची पलटण म्हणून उद्घाटन झाले. १९४४ पर्यंत १००० महिला जवान व ५०० परिचारिका जवान अशी १५०० ची पलटण झाली. युद्धसमाप्तीपर्यंत कॅ. लक्ष्मी लेफ्टनंट कर्नलच्या हुद्दय़ावर पोहोचली. या हुद्यापर्यंत पोहोचणारी ती पहिलीच महिला.
१९४७ मध्ये कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाहानंतर त्या कानपूरमध्येच स्थायिक झाल्या. डॉ. लक्ष्मींनी तिथे आपले दोन खाटांचे आणि फक्त ५ रुपये फी असलेले प्रसूतिगृह उघडले. हा दवाखाना त्यांनी शेवटपर्यंत चालविला अगदी वय वर्ष ९० पर्यंत...... १९७१ साली त्या  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या  सदस्य बनून कामे पाहू लागल्या. त्यांना १९९८ मध्ये ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले होते. तर डाव्या पक्षांनी त्यांना त्यांच्या अखेरच्या पर्वात २००२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिली होती. वयोवर्धन परिषदेतही त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य माणूस जोवर जागृत होऊन अन्यायाच्या प्रतिकारात उभा राहत नाही, तोवर दुसरा पर्याय नाही. लोकक्रांती हेच भ्रष्ट राजकारणाला थेट उत्तर आहे. असे मानणाऱ्या वयाच्या ९३ वर्षीही तितक्याच धडाडीने काम करणाऱ्या...अत्यंत तत्त्वनिष्ठ, प्रसंगी महामायेचे रूप धारण करणाऱ्या...आपल्या शेवटच्या क्षणीही आपले पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याऱ्या कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल २३ जुलै २०१२ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी अनंतात विलीन झाल्या...
अशा या विसाव्या शतकातील रणरागिणीला, असामान्य धैर्याच्या, कर्तृत्वाच्या विरांगनेला......संपूर्ण महाराष्ट्राचे कोटी कोटी प्रणाम..!!!

Saturday 11 August 2012

जगज्जेती बॉक्सर आणि भारताची सुपरमॉम- मेरीकोम



ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या पदार्पणातच  पदक मिळविण्याची किमया करणारी...जबरदस्त इच्छाशक्ती,कष्ट आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली  क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी...  स्वःबळावर आपलं कारकीर्द घडविणारी....क्रीडाविश्वातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरवली गेलेली एम.सी. मेरी कोम...!!!
काहीजणांचा जन्मच बहुदा काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी होतो...म्हणजे त्यांच्या डोळ्यांना बिकट वाटच खुणावत असते. मांगते चुंगनेजंग मेरीकोम ही त्याच पठडीतील व्यक्तिमत्त्व...! पाच फुटांच्या आत-बाहेरची उंची, लालसर गोरा वर्ण, बसकं नाक, बारीक मिचमिचे डोळे, अशी सर्वसाधारण मणिपुरी बांध्याची मेरी कोम आज बॉक्सिंग रिंगची राणी होऊन गेली आहे. २०-२५ फुटांच्या त्या चौकोनावर ती अधिराज्य गाजवत आहे.
मेरीकोमचा जन्म मणिपूरमधील कांगाथेइ सारख्या अगदी दुर्गम खेड्यात, गरीब कुटुंबात झाला. तिचे आई वडील शेतात काम करायचे. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. पण मेरी कोम लहानपणापासूनच खेळांमध्ये अव्वल असायची. ती एक उत्तम अॅथलिट होती.  तिच्याच राज्यातील बॉक्सर डिंगको सिंग याने १९९८मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांच्या याच यशाने मेरीकोमला बॉक्सिंगची आवड निर्माण झाली आणि  मेरीने 17व्या वर्षीच बॉक्सिंमध्ये करियर करण्याचा ठाम निश्चय केला होता.
वर्ष २००० मध्ये १७ वर्षांच्या मेरी कोमनं बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि प्रचंड मेहनत करून तिनं त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवलं. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी सगळंच बिंग फुटलं. वडील निराश झाले. पण बॉक्सिंगबद्दल मुलीच्या मनात असणारी ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. मग तर, मेरी कोमला हिरवा कंदिलच मिळाला आणि तिची गाडी सुसाट वेगाने सुटली. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पधेर्त मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या मुष्टीप्रहारानं तिनं प्रतिर्स्पध्यांना नामोहरम केलं. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग सुरू झाला जागतिक स्पधेर्मधील विजेतेपदांचा सिलसिला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पधेर्त तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुदा  त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते.
२००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पधेर्त तिनं अजिंक्यपद पटकावले. मेरी कोमची उंची कमी असली, तरी तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिर्स्पध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. यशस्वी बॉक्सर व्हायचे असेल तर हृदय कणखर असायला हवे, असे तिचे म्हणणे आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८मध्ये तिनं चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले. सुरुवातीला तिला पैसे मिळविण्यासाठी खूपच झगडावे लागले होते. काही वेळा प्रसंगी अपुरेच भोजन घेऊन तिने सरावाकरिता निधी साठविला आहे. आता मात्र खूप व्यक्ती व संस्था तिला मदत करीत आहेत. गीत सेठी यांनी स्थापन केलेली ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, केंद्र शासन व राष्ट्रीय संघटना यांचे साहाय्य तिला लाभले आहे. त्यामुळेच  आता परदेशी प्रशिक्षक अ‍ॅटकिन्सन, तसेच फिजिओ जान्हवी जठार यांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे.
मुष्टियुद्ध हा जरी रांगडा खेळ असला आणि त्यामध्ये सतत आक्रमक चाली कराव्या लागतात ही जरी वस्तुस्थिती असली तरी मेरी कोम ही मनाने खूपच हळवी आहे आणि तितकीच शांत आहे. मुष्टियुद्धात जरी सातत्याने ठोशांचे युद्धच खेळावे लागत असले तरी प्रत्यक्षात मुष्टियुद्धाच्या रिंगबाहेर आल्यानंतर मेरी ही खूपच शांत असते आणि अनेक प्रश्नांना सामोरे जाताना ती हसतमुख असते. रिंगमध्ये स्ट्राँग हार्ट ठेवणारी मेरी घरी एक हळवी आई आहे. तिनं आपला खेलरत्न पुरस्कार आपल्या जुळ्या मुलांना अर्पण केला आहे.
आपल्या देशात एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. मुळातच मुष्टियुद्ध हा महिलांचा क्रीडा प्रकार नाही असा अनेक वेळा प्रचार करण्यात आला आहे आणि अजूनही होतो.  म्हणूनच जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग चार वर्षे विजेतेपद मिळविल्यानंतरही तिला राजीव गांधी  खेलरत्न पुरस्कारासाठी झगडावे लागले होते. पण आज मेरीकोमच्याच  यशामुळे भारतीय महिलाही या क्षेत्रात चमकू शकतात याची जाणीव सर्वाना झाली आहे. त्यातही चूल-मूल या पलीकडेही महिलांचे जग असते याची जाणीव अनेकांना झाली आहे.
मणिपूरमध्ये तिने मुलींसाठी मुष्टियुद्ध प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. सध्या वीस मुली तेथे शिकत आहेत आणि त्यामधील एका खेळाडूने नुकतीच राज्यस्तरावर विजेतेपद मिळवित अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या अकादमीसाठी तिला आर्थिक पाठबळ मिळत आहे, मात्र शेतातच सराव करावा लागतो. सरावासाठी एखादा छोटा हॉल द्यावा ही मागणी तिने गेली तीन-चार वर्षे मणिपूर शासनाकडे व संघटनेकडे करीत आहे, मात्र अद्याप या सुविधा तिला मिळालेल्या नाहीत. कदाचित त्यासाठीही तिला झगडावे लागणार आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध सीरिजसारख्या स्पर्धामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचेही तिचे ध्येय आहे. मुष्टियुद्धापासून तिला खूप काही शिकावयास मिळाले,मानसन्मान मिळाला, तिचे पतीही या खेळामुळेच मिळाले, या खेळाचे ऋण फेडण्यासाठी उर्वरित आयुष्य वाहून टाकण्याची तिची इच्छा आहे.
ऑलिम्पिकसाठी मेरी हिला तिच्या नेहमीच्या ४५ किलोऐवजी ४८ ते ५१ किलो या वजनी गटात खेळावे लागले. साहजिकच तिच्यासाठी हे आव्हान होते. ऑलिम्पिक पदक हे तिच्या नसानसात भिनले होते. त्याकरिता वाटेल तेवढे कष्ट घेण्याची तिची शारीरिक व मानसिक तयारी होती आणि त्याप्रमाणे तिचा सराव सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी  सेमीफायनलपर्य़ंत धडक मारून कास्य पदकावर नाव कोरत तिने एक नवा इतिहास तयार केला आहे. ती आज भारताची खरी सुपरमॉम ठरली आहे.
पाचवेळची जगज्जेती बॉक्सर असणाऱ्या....पहिली महिला मानद लेफ्टनंट कर्नल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या...मणिपूरसारख्या उपेक्षित राज्यात जेथे खेळासाठी फारसे पोषक वातावरण नसतानाही....केवळ आपल्या जिद्दीमुळे आणि घरच्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच एवढे यश मिळविणाऱ्या या भारताच्या सुपरमॉमला सुपर सलाम....!!!


Tuesday 7 August 2012

भारतीय सिनेमाला मिळालेला पहिला डान्सिंग स्टार- मास्टर भगवान पालव


सध्या भारतीय सिनेमाची शताब्दी सुरू आहे आणि याच सिनेजगतात तब्बल ६५  वर्षं घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे...गेली अनेक दशके चित्रपट रसिकांना बेधुंद करणारे..स्टंट चित्रपटांचे मर्दानी नायक व अभिजात नर्तक असे जगावेगळे मिश्रण असलेले...हास्य अभिनेते म्हणून नावाजलेले गेलेले कलाकार मास्टर भगवान यांची जन्मशताब्दीही 0१ ऑगस्टपासून सुरू झाली आहे...
१९१३ साली पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला. हेच १९१३ साल हिंदी चित्रपट जगतातील एका अवलिया मराठी कलावंताचे जन्मसाल आहे. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटांना मिळालेली अतीव लोकप्रियता ही कर्णमधुर-भावुक गीत-संगीताने मिळाली हे सर्व खरे, तेवढाच महत्त्वाचा यशाचा वाटा हा या चित्रपटातील नृत्यशैलीमुळे अधोरेखित झाला हेही तितकेच खरे...याच नर्तनकलेत आपली वेगळी छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेता म्हणजे मास्टर भगवान होय.
भगवान पालव या अस्सल कोकणी माणसाचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी मालवण भागात झाला. बालपण खुप हलाखीत काढणाऱ्या भाग्वानादादांचे शिक्षण कसंबसं चौथी पर्यंत झाले होते. त्यांना लहानपणापासूनच मास्टर विठ्ठल यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्यासारखे आपणही चित्रपटात काम करावं आणि सगळीकडे लोकप्रिय व्हावं असं भगवानदादांना नेहमी वाटायचं. पण गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं...
मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत...! त्यांच्यासारखे आपणही एक दिवस हीरो व्हावे हा एकच ध्यास त्यांनी विद्यर्थीदशेपासून घेतलेला. डोळस निरीक्षण, नियमित व्यायामाने कमविलेली शरीरयष्टी मर्दानी खेळांमुळे तिला आलेला लवचिकपणा, अफाट परिश्रम, मूळचा गमत्या स्वभाव, हाणामारी, शस्त्रविद्येतील कौशल्य, रोमारोमांत भिनलेला नैसर्गिक ऱ्हिदम, चित्रपटात काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व वडिलांचे आशीर्वाद या शिदोरीवर एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मूकचित्रपटाच्या जमान्यापासून सुरुवातीला विनोदी नटपुढे फायटर म्हणून चित्रपटात काम करू लागला व म्हणता म्हणता १९३८ मध्ये पाश्र्वगायक खान मस्ताना, मीर साहेबांचे संगीत असलेल्या बहादूर किसानचित्रपटाचे दादा कथालेखक व दिग्दर्शकही झाले.
1930 मध्ये दादाला कॉमेडियन म्हणून 'बेवफा आशिक' हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र 'बेवफा आशिक' या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी दादाला आपल्या 'जनता जिगर' या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. 'हिम्मते मर्दा' या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले..
१९४६ ते १९६८ या दरम्यानचा काळ भगवानदादांसाठी जॉकपॉटचा काळ ठरला. भगवानदादा हा खरे तर दिवसभर काबाडकष्ट करून, घामाचे पैसे खर्च करून ग्रांट रोडच्या बकाल वस्तीतील थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या गरीब जनतेचा आणि शाळा-कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो पाहयला आलेल्या विद्यार्थ्यांचा आवडता नायक होता.. त्यांच्या  मुद्राभिनयाला, हाणामारी किंवा हास्यप्रसंगाला थिएटरमध्ये टाळ्या, हास्य व शिट्टयांचा जल्लोष असे. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.
१९५१ ला रिलीज झालेल्या 'अलबेला’तील  एकाहून एक "सुपरडुपर हिट' गाणी आणि त्यावरील खास "भगवान-डान्स'ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'भोली सुरत दिल के खोटे' हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भगवान दादांचा हा रोंबासांबा डान्स अत्यंत सोपा परंतु आकर्षक नृत्यप्रकार असल्याने खूप लोकप्रिय झाला.. शाम ढले खिडकीतले तुम सीटी बजाना छोड दो' या गीतानं तर "छेडछाडवाल्या' गीतांचा आरंभ केला."ओ बेटाजी, किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम' या गीतात भांड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः भगवानदादांची होती."भोली सूरत दिल के खोटे। नाम बडे और दर्शन छोटे ' आणि "शोला जो भडके । दिल मेरा धडके। दर्द जवानी का सताए बढ बढ के' या गाण्यानं पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. या सिनेमातील अंगाईगीत सर्वांत लोकप्रिय ठरलं. 'धीरे से आजा री अखियन में निंदिया धीरे से आ जा' या लता मंगेशकर यांनी गायलेल्या अंगाईगीतानं आजही सर्वोत्कृष्ट अंगाईगीताचं स्थान कायम ठेवलं आहे.

भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्‍चात्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या "अलबेला'नं केलं. भगवानदादा यांचं "अलबेला'चं हे यश मात्र "एकमेवाद्वितीय' ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले..."झमेला', "कर भला', "लाबेला', "शोला जो भडके', "रंगीला....” पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. सिनेमानिर्मितीच्या उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवानदादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपलं लक्ष पूर्णपणे 'डान्स'वर केंद्रित केलं. पुढं कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमांत ते नाचू लागले. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा "प्लस पाइंट' होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. "चोरी चोरी', "झनक झनक पायल बाजे' या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या.
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवानदादा यांनी १९४२ मध्ये "जागृती पिक्‍चर्स' या बॅनरची स्थापना केली; तसेच स्वतः चा चेंबूर इथं "जागृती स्टुडिओ'ही १९४७ मध्ये उभारला.  पुढं गोरेगावमधल्या भगवानदादा यांच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात त्यांचे हे सारे स्टंटपट भस्मसात झाले. १९५१ मध्ये अलबेलाप्रदर्शित झाल्यावर बरोबर पंचवीस वर्षांनी रणजीत बुधकरांनी अलबेलाचे हक्क विकत घेतले. काळाप्रमाणे आवड बदलते असे म्हणतात. पण अलबेलाकाळाच्या कसोटीलाही पुरेपूर उतरला. नव्या तरुण पिढीने त्याचे न भूतो न भविष्यतीअसे स्वागत केले अलबेलाने परत रजत जयंती साजरी केली. आज भगवानदादांच्या स्टंटपटांची आठवण इतिहासजमा झाली असली, तरी त्याच्या कारकीर्दीला "चार चॉंद' लावणारा "अलबेला' शाबूत राहिला. भगवानदादांच्या "अलबेला'नं इतिहास घडवला. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला "पहिला डान्सिंग ऍक्‍टर' -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला.

दादरच्या ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते राहत होते, त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ भगवानदादा यांच्याशिवाय पुरा होत नसे. एकेकाळी एका स्टुडिओचे मालक असलेल्या भगवानदादांनी बंगला, गाडी असं सर्व काही ऐश्‍वर्य उपभोगलं. पुढं काळ बदलला. भगवानदादा "डेली पेड आर्टिस्ट' म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. भगवानदादा हे अहंकाराची अजिबात बाधा नसलेले कलाकार होते.
ऐश्‍वर्य आणि गरिबी त्यांनी एकाच मापात मोजली. ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते लहानपणापासून राहत असत, तिथंच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. ०४ फेब्रुवारी २००२ रोजी. जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता, तिथंच ते आयुष्याच्या अखेरीस येऊन विसावले.
मास्टर भगवान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक गोड स्वप्नच होते. अशा या हरफनमौला, दिलखुलास मास्टर भगवानदादांच्या जन्मशताब्दी निमित्त  विनम्र अभिवादन...!!!