Showing posts with label उद्योजक. Show all posts
Showing posts with label उद्योजक. Show all posts

Thursday, 12 July 2012

साखर उद्योगाचे चित्र बदलविणारे- बी. बी. ठोंबरे

बी. बी. ठोंबरे हे नाव आपल्यासाठी काहीसे नवीन पण, मराठवाड्यातील लोकांना आणि साखर उद्योगातील संबंधित असणा-या कोणालाही परिचयाचे.... आपले मागासले पण घालवून लोकांची मानसिकता बदलवत, साखर उद्योगजगाला एक नवी दिशा देणारे बी.बी. ठोंबरे...!!
जेथे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत, तिथे स्वतंत्र असा खासगी साखर कारखाना उभारून स्वतःचा ठसा उमटविणारे एका सामान्य माणूस...जागतिकीकरण म्हणजे नॉलेज बेस इकॉनॉमी , बौद्धिक क्षमतेतून संपतीची निमिर्ती याचे मूतीर्मंत उदाहरण म्हणजे बी. बी. ठोंबरे...!!!

विविध सहकारी साखर कारखान्यात अधिकारी , कार्यकारी संचालक म्हणून नोकरी करणा-या ठोंबरे यांनी पंधरा  वर्षांपूर्वी मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणीच्या अतिशय दुष्काळी ग्रामीण भागातील माळरानावर गावातलेच आवश्यक तेवढेच कामगार घेऊन पहिला खासगी साखर कारखाना सुरू केला. त्यांच्या या निर्णयातूनच शेतक-यांच्या आत्मविश्वासाची पहाट झाली. पण त्यांना हा खासगी करणं आहे हे समजून सांगणे कठीण होते. गावकऱ्यांच्या काही मागण्यांना तोंड देत ठोंबरे यांनी या कारखान्यात विविध प्रयोग सुरू केले. त्यांचा पहिला प्रयोग म्हणजे कारखान्यातील वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर करून पाणी आणि लाखो रुपये वाचविण्याचा. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या सहली येऊ लागल्या. त्यानंतर सर्वांप्रमाणे त्यांनी सह-विद्युत प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पाद्वारे विजेचे उत्पादन भरपूर होऊ लागले. अतिरिक्त वीज विद्युत मंडळातर्फे रांजणी परिसरातील शेतक-यांना अल्प दरात विकण्याची तयारी झाली. पण विद्युत मंडळाने अचानक नकार दिला.

आता या निर्माण केलेल्या विजेच करायचं काय, या विचारात असतानाच पोलाद निर्मितीला वीज हा महत्वाचा घटक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी तिथे पोलाद निमिर्ती सुरू केली आणि हे पोलाद पाकिस्तानला निर्यातही होऊ लागले, आता विजेची गरज वाढली. कचरा, सालीचा भुसा, तुराट्या, पराट्या ज्याला शेतकरी काडी लावून जाळीत असतो त्यातून त्यांनी वीज निर्मिती करण्याचे ठरवले. त्यासाठी ५ लाख रुपयांची यंत्र सामुग्री वाढवून, 'अॅग्रो वेस्ट' चा वापर करून वीज निमिर्तीची गरज भागवली. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतक-यांचा कचरा गोळा करून स्वत:च विकण्याचा नवा व्यवसाय तर मिळालाच त्यात भर म्हणजे दरवर्षी दीड कोटी रुपये शेतक-यांना त्यांच्याच शेतीतील कच-यापासून मिळू लागले आहेत.

साखरेचे भाव कोसळल्यावर, शेतकऱ्यांना भाव मिळत नसताना साखर उद्योगात समस्या निर्माण झाल्या. पण ठोंबरे थकले नाहीत. गंधकमुक्त आणि कच्ची साखर निमिर्तीसाठी केंदाने परवानगी देताच आवश्यक तेवढी  पक्की साखर आणि बाकी सर्व कच्ची, गंधकमुक्त साखर तयार करून निर्यात सुरू केली. शेतक-यांना ११०० रुपये प्रतिटन भाव दिला. ठोंबरे यांनी एवढ्यावरच न थांबता काळाची पावले ओळखून साखरनिर्मितीसह वीज, आसवनी,  इथेनॉल, रिफायनरी, बायोकंपोस्ट, बायोपॉवर, बायोगॅस व डेअरी यांसारख्या विविध प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक क्रांती निर्माण केली. शेतकरी असलेल्या सभासदाला  ठोंबरे यांनी एकाच वेळी साखर , वीज , पोलाद , आणि इथेनॉलचा उत्पादक केला. हे सर्व करणारे ठोंबरे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत आणि ही सर्व किमया आपल्याच माणसांच्या सहकार्यांनी आपल्याच माळरानावर करून दाखवली आहे.

मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून ठोंबरे यांनी नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. या महाराष्ट्रातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची उभारणी करून साखर उद्योगात एक मोठा आदर्श निर्माण केला. रांजणी येथे कारखाना उभारण्यापूर्वी ठोंबरे यांनी लातूर येथील मांजरा कारखान्याच्या यशस्वितेत मोठे योगदान दिले आहे. अत्यंत काटकसर व नियोजनबध्द, पारदर्शक पद्धतीने कामकाज करून साखर उद्योगात नॅचरल शुगरने अल्पकालावधीत यशस्वी गरुडझेप घेतली आहे.

बी.बी. ठोंबरे यांनी प्रकारची औद्योगिक चळवळ उभारताना  मानव विकासाला अग्रभागी ठेवून प्रदूषणमुक्त उद्योगाची यशस्वीपणे उभारणी करून मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथे दैनिकदिव्य मराठीतर्फे इंडस्ट्री एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’.

दैनिकएकमतच्या वतीने  जीवनगौरवपुरस्कार.

छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार.

मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा 'मराठा समाजभूषण पुरस्कार'.
मराठवाड्यासारख्या मागास भागात खासगी साखर कारखानदारी निर्माण करून विविध विकास कामे उभी करणाऱ्या 'नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी आपल्या उद्योग कामगिरीचा यशस्वी झेंडा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही यशस्वीपणे फडकावित उद्योजगतात एका आदर्श प्रस्थापित केले आहे.