Showing posts with label समाजसेवक. Show all posts
Showing posts with label समाजसेवक. Show all posts

Sunday, 14 October 2012

विजयाताई लवाटे-‘मानव्य'चा मायेचा वारसा

देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा  वारसा देणाऱ्या विजयाताई लवाटे.....!!!
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी मानव्यसंस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामध्ये त्या काम करीत होत्या. तेथून वेश्यावस्ती जवळच असल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन विजयाताईंना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. या स्त्रियांशी चर्चा करताना त्यांचे विविध प्रश्न समजले. प्रथमोपचार सेवा संघ आणि नंतर निहारप्रकल्पातून त्यांनी वेश्या आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य सुरू केले. निहारमध्ये काम करीत असतानाच एचआयव्ही आणि एड्सचे रुग्ण आढळू लागले. या रोगाचा तीव्र गतीने होणारा प्रसार आणि लहान मुलांमधील प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातूनच मानव्य संस्थेचे बीज अंकुरले गेले.

वडील डॉक्टर असल्याने रुग्णांबद्दल आस्था,समाजसेवेची जाणीव त्यांच्या मनात होती पण सुरुवातीचे दिवस विजयाताईंच्या कामाच्या दृष्टीने अडचणीचे, त्रासाचे, कटकटीचे होते. मुळात वेश्यांच्या मुलांनी जायचं कुठं, त्यांना आधार कुणाचा हा प्रश्न् होता. उघड्यावर वाढणाऱ्या मुलांना ताईंच्या संस्थेच्या रूपाने एक मायेचं छत्र लाभलं. पुणे जिल्ह्यातच शहरापासून काही अंतरावर विजयाताई , चाफेकर , मुक्ता मनोहर यांनी एक छोटं वसतिगृह काढलं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांनाही आशेचा किरण दिसला. वस्तीतल्या गंदगीतून मुलं बाहेर येतील. चार बुकं शिकून आपल्या पायावर उभं राहतील असं कुठंतरी या साऱ्यांना वाटत होतं. पण  हे दिवस फार  तर कठीण होते. जागा, पैसे, अन्नधान्य, औषधं, शिक्षण, अंथरूण-पांघरूण हे सारं काही पुरवण कठीण होतं पण विजयाताईंनी या साऱ्या मुलांच्या अंगावरून आपल्या मायेची ऊबदार शाल पांघरली. मात्र त्या शालीची ऊब काही दिवस मिळाली आणि एके दिनी ही शालही काही सामाजिक कार्यर्कत्यांनी हिसकावून घेतली. तरीही विजयाताई डगमगल्या नाहीत.
राखेतून फिनिक्स पक्षी आकाशात झेपावतो असं म्हणतात नं तशाच विजयाताईंनी पुन्हा एकदा जिद्द धरली, उभारी घेतली आणि 'निहार' ची स्थापना केली. पुण्यात येरवड्याच्या पुढे जमीन घेतली. पैसे जमत गेले तसं वसतिगृह उभं राहिलं. तिथेही खूप अडचणी आल्या पाणी,वीज,रस्ता अशा एक ना अनेक प्रश्नंशी सामना करता करता विजयाताईंनी एके दिवशी ' निहार ' चा निरोप घेतला आणि ' मानव्या ' ची हाक दिली….मात्र वीस वर्षांत एड्सने भयाण रूप धारण केले होते. आता कार्य आणखी अवघड, गुंतागुंतीचे झाले होते. वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येक मुलाचा चेहराच सांगायचा की तो किती दिवसांचा सोबती आहे. इथेही विजयाताई डगमगल्या नाहीत. नेटाने उभ्या राहिल्या. कष्ट करीत राहिल्या.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनअसे म्हणत विजयाताई लवाटे यांनी १८ जून १९९७ रोजी मानव्य संस्थेची स्थापना केली. एचआयव्हीबाधित मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्यापासून १२ किलोमीटर अंतरावर भूगाव येथे ‘मानव्य गोकुळ’ साकारण्यात आले. एचआयव्हीबाधित महिलांच्या तान्हय़ा मुलांचे होणारे हाल लक्षात घेऊन नवजात अर्भकापासून ते तीन-चार वर्षांपर्यंतच्या मुलांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशातून मानव्य संस्थेची सुरुवात झाली. अनाथ मुलांना आधार देणे, या मुलांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, औषधोपचार आणि वैद्यकीय तपासणी सुविधा पुरविणे, आरोग्यवर्धक आणि चौरस आहार देणे आणि एचआयव्हीबाधित स्त्रियांना आधार देणे... मुलांचा सर्वागीण विकास करून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे हेच मानव्य संस्थेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना समाजात स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या गोकुळमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक मुलास जगण्याचा, सुरक्षिततेचा, समाजात वावरण्याचा आणि संपूर्ण विकासाचा हक्क दिला आहे.
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे म्हणून सुरु केलेल्या या संस्थेत मुलांची विशेष काळजी घेतली जाते. संस्थेतील सर्व मुलांच्या वेळोवेळी सगळ्या प्रकारच्या तपासण्या करणे, कॅल्शियम, बी. कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी हे पूरक औषधोपचार मुलांवर करणे, एचआयव्हीचा प्रसार रोखण्याबरोबरच मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उद्देशातून दिल्या जाणाऱ्या ‘एआरटीच्या  (अ‍ॅन्टी र्रिटोव्हायरल ट्रीटमेंट) औषधांमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित व्यायाम याकडेही लक्ष दिले जाते. सध्या संस्थेतील ६३ पैकी ५० मुलांना एआरटी ट्रीटमेंट सुरू आहे. उत्तम भोजनामुळे मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढत असल्याने उर्वरित १३ मुलांना या ट्रीटमेंटची गरज भासत नाही. सध्या वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगतीमुळे मुलांचे आयुर्मान वाढले आहे. संस्थेतील मुलांना त्वरित प्रथमोपचार मिळावेत यासाठी संस्थेच्या आवारामध्येचकृष्णार्पणम निरामय मेडिकल अँड रीसर्च सेंटर प्रकल्पांतर्गत २००६पासून चार खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. येथील उपचाराप्रमाणेच दर आठवड्याला या मुलांची ससूनमध्येही तपासणी करण्यात येते. एका ट्रस्टचे आणि औषध कंपनीचे यासाठी सहकार्य लाभते. पंचक्रोशीतील बाधित रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे तसेच एचआयव्हीविषयी जनजागृती करणे, परिणामांची माहिती देणे असे कार्यही स्वयंसेवक, समन्वयक आणि वैद्यकीय सल्लागारांच्या मदतीने केले जाते.
एचआयव्हीबाधित मुलांना सामाजिक स्वीकृती मिळणे अवघड आहे हे जाणून येथे या मुलांसाठी ८ वी पर्यंत शाळाही आहे. आठवी झाल्यावर या विद्यार्थ्यांना नॅशनल ओपन स्कूलतर्फे दहावीच्या परीक्षेलाही बसवले जाते. एअरकंडिशनिंग रिपेअरिंग, मोबाइल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन असे प्रशिक्षण देऊन या मुलांना आपल्या पायावर उभे केले जाते. शुभेच्छापत्रे , हँडिक्राफ्ट, शिवणकाम, शिल्पकला याबरोबरच फ्लॅट फाइल्स आदींचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आधुनिक काळाची पावले ओळखून संस्थेने संगणक प्रशिक्षण आणि फॅशन डिझायनिंग हे अभ्यासक्रमदेखील सुरू केले आहेत. विजयाताई  यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या या उपक्रमामुळे सुमारे पन्नास -पंचावन्न एचआयव्हीबाधित मुलांचे जिणे सुकर होते आहे.  
एड्स अवेअरनेस सेल पुरस्कार, मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार, युगंधर पुरस्कार, भाटिया मेमोरीअल रीटेबल ट्रस्ट अवार्ड दिल्ली(1995), भारतीय स्त्रीशक्ती पुरस्कार(1995), श्रीमती ताराबाई पुरस्कार(1996), फाय फाऊंडेशन पुरस्कार(1996), हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था पुरस्कार(1996), श्रीमती मीनाताई ठाकरे पुरस्कार(1996), सावित्रीबाई फुले पुरस्कार(1997), Rotary Foundation Jean Harris Award, माऊली आनंदी पुरस्कार(1998), श्रीमती कुसुमताई चौधरी पुरस्कार, केसरी पुरस्कार(2000), जनसेवा पुरस्कार(2001), बाया कर्वे पुरस्कार(2004) अशा विविध पुरस्कारांनी विजयाताई लवाटे यांच्या माणुसकी जपणाऱ्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
एके काळी एचआयव्हीबाधित मुलांचं मरण सुसहय़ व्हावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेची वाटचाल आता मुलांचं जगणं सुखाचं व्हावं अशी झाली आहे.  मर्यादित जागेत आणि ज्वलंत विषयाशी संबंधित काम असल्यामुळे स्वयंसेवक, हितचिंतक आणि देणगीदारांच्या प्रोत्साहनातून मानव्य गोकूळ प्रकल्प' स्वतःच्या जागेत आज  यशस्वी कार्यरत आहे. एचआयव्हीबाधित मुलांच्या आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन देणारी संस्था असेच मानव्यचे वर्णन करावे लागेल.  विजयाताईंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शिरीष लवाटे आणि स्नुषा उज्ज्वला लवाटे ही पुढची पिढी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मानव्य संस्थेचे, नव्हे मानवतेचे हे कार्य पुढे घेऊन जात आहे.
मानवतेचा वारसा देणाऱ्या...माणूस हाच माझा देव, माणुसकी हा माझा धर्म मानणाऱ्या आणि  हा देव आणि हा धर्म ज्या आईवडिलांनी शिकवला त्यांना यशाच संपूर्ण श्रेय प्रदान करत समाजभान जपणाऱ्या विजयाताई लवाटे यांना मानाचा मुजरा.....

संपर्क :
'मानव्य',
४६-३-१ लक्ष्मण व्हिला, फ्लॅट १३, पौड रस्ता,
जोग हॉस्पिटलजवळ, पुणे - ४११०३८
फोन : २५४२२२८२
मानव्य गोकूळ : माताळवाडी फाटा, पौड रस्ता, भूगाव, ता. मुळशी, पुणे - ४११०२१
फोन : ३२३०२६९५
संकेतस्थळ - www.manavya.org

Saturday, 22 September 2012

रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ - स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी

एखादी कल्पना सुचली की ती मूर्त स्वरूप देऊन ती लोकोपयोगी होईल असे काम स्वार्थत्यागाने करणारे...अतिशय निरलस आणि सेवाभावी वृत्तीने गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणाऱ्यारुग्णांना अतिशय आवश्यक असलेल्या, परंतु सहजरितीने न मिळणाऱ्या अनेक वस्तू नि:शुल्क वा अत्यल्प दरात पुरविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेची स्थापना करणारे रुग्नसेवेतील सेवाभाव जपणारे स्वातंत्र्यसैनिक (कै.) द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी..
कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्यारुग्णोपयोगी वस्तुसंग्रहया कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. तेव्हाचा काळ हा विषमज्वर असाध्य आजार होता गुरुजींचा भाऊ विषमज्वराने आजारी होता. त्याच्या शुश्रूषेसाठी बर्फाच्या पिशवीची गरज होती. खूप प्रयत्न करूनही बर्फाची पिशवी गुरुजींना मिळत नव्हती. अखेर एका सधन विद्यार्थ्यांच्या घरी अडगळीत, धूळ खात पडलेली पिशवी गुरुजींना मिळाली आणि उपचार सुरू झाले.
या धावपळीतच गुरुजींच्या मनात विचार आला, की रुग्ण असलेल्या भावाच्या सेवेसाठी जी वेळ आपल्यावर आली तशी ती आणखी कितीतरी जणांवर येत असणार. ही वेळ खरेतर कोणावरच येता कामा नये. स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींच्या मनाने मग या कामाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभही लगेच झाला. गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटर, युरीन पॉट, कुबडी ही साधनेदेखील तेव्हा दुरापास्त होती. सर्वसामान्यांना ती परवडणे शक्यच नव्हते. सोलापुरातील अनेक धनिकांच्या घरात पडून असलेली अशी साधने गुरुजींनी गोळा केली. स्वत:च्या तुटपुंज्या पगारातील पैसे बाजूला ठेवून ते साठवले आणि त्यातूनच १९३२मध्ये रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह-सोलापूरया संस्थेची स्थापना त्यांनी केली.  रुग्णसेवेचे काम भावे गुरुजींनी सुरू केले, तेव्हा निघाले युरीन पॉट वाटायलाअशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. ते सातत्याने आणि सेवावृत्तीने काम करत राहिले. या कामासाठी आयुष्य वेचलेल्या गुरुजींच्या कामाला पुढे रुग्णसेवेचा भावे प्रयोगअशी जनमान्यता मिळाली.

चाकाची खुर्ची, वॉकर, कुबडय़ा, कमोड खुर्ची, स्ट्रेचर आदी अनेक साधनांची आवश्यकता आजारपणातच भासते आणि या साधनांचे महत्त्वदेखील त्याच काळात समजते. ज्या कुटुंबावर ही वेळ येते, त्यांच्यासाठी ही साधने मिळवणे अनेकदा जिकिरीचे होऊन बसते. या वस्तू विकत घेण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा काळात लोक चिंतातुर होतात. काय करावे समजत नाही. चांगली आर्थिक परिस्थिती असली, तरी वस्तू कायमस्वरूपी लागणार नसल्यामुळे ती विकत घेणेदेखील व्यवहार्य नसते. समाजाची ही गरज ओळखून भावे गुरुजींच्या संस्थेने रुग्णोपयोगी वस्तू गरजूंना नाममात्र भाडय़ाने आणि गरिबांकडून कोणतेही भाडे न आकारता देण्याचे काम सुरू केले. हळूहळू लोकांना या कामाचे महत्त्व पटू लागले.

गुरुजींचा पिंड निरलस समाजसेवकाचा होता. सेवेची कोणतीही कल्पना मनात आली की ती पूर्णत्वाला नेणे एवढाच त्यांचा ध्यास असे. त्यातूनच संस्थेला सेवेचे नवे आयाम मिळाले. साहित्य पुरवण्याबरोबरच रुग्णांची घरी जाऊन सेवा करणे, किरकोळ आजारात किरणोपचार करणारी यंत्रे अत्यल्प भाडय़ात देणे, रुग्णांच्या सेवा-शुश्रूषेसाठी अटेंडंट देणे, महापालिका शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवणे, मुलांना दुधाचे वाटप, मोफत दवाखाना, फिरता दवाखाना, अत्यल्प दरात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे ही आणि अशी अनेक कामे संस्थेने सुरू केली. या सर्वच कामांची निकड एवढी होती, की संस्थेचा पसारा वाढत राहिला. त्यातून गुरुजींनी सोलापुरात संस्थेची स्वत:ची वास्तू निर्माण केली आणि आजही या वास्तूचा वापर रुग्णसेवा तसेच अनुषंगिक उपक्रमांसाठीच सेवाभावनेतून केला जातो.

सोलापुरात आणि जिल्हय़ात ज्या ज्या कोणी महत्त्वाच्या व्यक्ती येतील त्यांना आग्रहाने संस्थेत न्यायचे आणि संस्थेच्या कामाची ओळख करून द्यायची, यासाठी भावे गुरुजी खूप आग्रही असायचे. अनेकांना ते मुंबईत आणि दिल्लीतही जाऊन भेटले होते. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, झैलसिंग, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, भाऊसाहेब बांदोडकर, कमलाताई होस्पेट, लीलाताई मुळगावकर, सुशीलकुमार शिंदे अशी शेकडो नावे सांगता येतील की ज्यांनी संस्थेचा गौरव केला आहे.

अनेकदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेले काम त्या व्यक्तीच्या पश्चात तितक्या प्रभावीपणे चालतेच असे नाही. भावे गुरुजींनी मात्र स्वत: काम करतानाच अनेक सहकारी असे तयार केले, की गुरुजींच्या पश्चात हे काम आजही पूर्वीच्याच सेवाभावी वृत्तीने आणि आत्मीयतेने गुरुजींनी घालून दिलेल्या मार्गाने आजही सुरू आहे. सत्त्याण्णव वर्षांपर्यंत गुरुजी हे काम करत राहिले. जीवनातील त्रेसष्ट वर्षे त्यांनी या कामासाठी दिली. रुग्णांचे नातेवाईक वस्तू नेण्यासाठी रात्री-अपरात्री, अगदी सणावाराच्या दिवशीदेखील येतात आणि त्यामुळे बारा महिने-चोवीस तासही या कामाची वेळ आहे; पण कधीही न कंटाळता, न थकता, न रागावता गुरुजींचे संपूर्ण कुटुंब हे काम करत राहिले. त्यात पत्नी इंदिराबाई यांची फार मोलाची साथ त्यांना लाभली. आलेल्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला दिलासा देण्याचे कामही वस्तू देताना केले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ही संस्था अडचणीच्या काळात मोठा आधार ठरते.  गुरुजींचे पुत्र रमेश हे १९७७ मध्ये पुण्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आणि पुण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी संस्थेचे काम पुण्यातही सुरू केले. पुण्यात आता रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्थेची तीन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये वस्तू नाममात्र भाडय़ाने देण्याचे काम चालतेच, शिवाय रमेश भावे यांनी या सेवाकार्याला आता आणखी काही पैलू जोडले आहेत. गरम पाण्याची पिशवी, बर्फाची पिशवी, चाकाची खुर्ची, घडीच्या कुबडय़ांपासून ते एअरबेडपर्यंत या आणि अशा अनेक रुग्णापयोगी वस्तू अत्यल्प दरात आणि प्रसंगी नि:शुल्क पद्धतीने देण्याचे काम केंद्रातर्फे पुण्यात चालते. गरीब आणि गरजू रुग्णांना सवलतीने रक्त मिळवून देण्याचेही काम केले जाते. रक्तदानानंतर मिळणारी आणि रुग्णाचे सहाशे ते एक हजार रुपये वाचवणारी सवलतपत्रे संकलित करून ती गरजू रुग्णांना देणे, गरजूंना अध्र्या किमतीत रक्त मिळवून देणे, ज्येष्ठांना एक रक्तपिशवी विनामूल्य देणे, गरजूंना रक्त मिळावे यासाठी रक्तपेढय़ांना निधी देणे यांसह अनेक कामे संस्थेतर्फे सुरू आहेत.

रमेश आणि त्यांची पत्नी ललिता भावे हे दोघेही गेली चाळीस वर्षे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून रुग्णसेवेचे काम पुण्यात करत आहेत. रुग्णसेवेबरोबरच संस्थेसाठी आर्थिक स्वरूपाची मदत गोळा करण्याकरता सातत्याने पायपीट करावी लागत असली, तरीही ते ज्या पद्धतीने हे काम करतात त्यामागची प्रेरणा खरोखर भावे प्रयोगहीच आहे.
 
संस्थेतर्फे भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. ज्या वयोवृद्ध, महिलारुग्ण आणि गरीब रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देणे किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्य उपलब्ध करून देणे हे काम पुण्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत त्यासाठी लाखो रुपये उभे करण्यात आले आणि ते गरजू रुग्णांच्या रक्तासाठी वापरण्यात आले. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. समाजाच्या पाठबळावर सुरू असलेल्या या कामात गुरुजींनी आणि त्यांच्यानंतर हे काम सांभाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांने, विश्वस्ताने कमालीचा पारदर्शीपणा ठेवला आहे. कोणतीही आर्थिक बाब पावतीशिवाय करायची नाही हा गुरुजींचा दंडक होता. तो आजही कसोशीने पाळला जातो. ज्या कामासाठी समाजाने निधी दिला आहे, त्याच कामासाठी त्यातील पै अन् पै खर्च झाला पाहिजे ही संस्थेतील प्रत्येकाचीच तळमळ असते. म्हणूनच संस्थेने समाजात खूप मोठी विश्वासार्हतादेखील मिळवली आहे. संस्थेचे कार्य गेली ऐंशी वर्षे सुरू आहे ते समाजाच्या पाठबळावर. भविष्यातही रुग्णांच्या मदतीसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे.

भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. वयोवृद्ध रुग्ण, महिला रुग्ण आणि गरीब रुग्ण यांच्यापैकी ज्यांना ज्यांना रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी या योजनेत सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्यदेखील उपलब्ध करून दिली जाते. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. अशा रुग्णांना रक्तसंक्रमणासाठी आवश्यक असणारे डायलायझरहे उपकरण सातत्याने विकत घ्यावे लागते. त्यामुळे डायलिसीसच्या रुग्णांकडून या उपकरणाची मागणी सतत होत असते. रक्त मिळवणे सर्व दृष्टींनी खर्चिक व अवघड होत असल्यामुळे किमान हे उपकरण गरजू, गरीब रुग्णांना सवलतीने आणि शक्य झाल्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना संस्था आता हाती घेत आहे.संस्थेला एका मोठय़ा ट्रस्टकडून गेली अनेक वर्षे भरीव देणगी मिळत होती. यंदा मात्र काही कारणांनी या ट्रस्टने देणगीबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी नव्या योजना हाती घेत असतानाच संस्थेच्या कामालाही मर्यादा येत आहेत. गरजू रुग्णांसाठी खूप काम करण्याची गरज आहे, काम करण्याची तयारीदेखील आहे; पण हाती तेवढा निधी नाही, अशा परिस्थितीत सापडलेल्या या संस्थेला आता समाजानेच पाठबळ देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
  
समाजाच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या या कामाची समाजाला आजही नितांत गरज आहे. इतरांच्या व्यथा, वेदना थोडय़ाशा हलक्या करण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सेवेचा ध्यास घेतलेल्या या भावे प्रयोगाला शक्य ती मदत करायलाच हवी.
ज्यांना मदत करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा...
* संपर्क : रमेश भावे, कोथरूड (फोन नंबर-  ९६२३९ ३८१०९)
सौजन्य- लोकसत्ता...

Tuesday, 3 July 2012

माणुसकीचे महाकाव्य जगणारा कर्मयोगी महात्मा-बाबा आमटे


कामांना अंत नाही, असलाच तर तो आपल्या कार्यशक्तीला आहे - बाबा आमटे.
जो माणूस मनाने सर्व इंदियांना आवर घालून कोणत्याही आसक्तीला बळी न पडता सर्वच्या सर्व कर्मेंदियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो माणूस 'श्रेष्ठ' मानला जातो. गीतेतील हा कर्मयोग ज्यांना कळला व ज्यांनी तो आचरणात आणला, त्यांनाच जग 'महात्मा' मानते. ज्या न्यायाने गांधीजी, जोतिबा फुले आणि मदर टेरेसा 'महात्मा' ठरल्या, त्याच पंक्तीत बसणारे व्रत स्वीकारून  आपल्या हयातभर अंगिकारनारे बाबा आमटे...
अनाथांचे आईपण करण्याकरिता परमेश्वराने ज्यांना कुणाला जन्मास घातले त्यात बाबा आमटे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आई आपल्या लेकांकारिता सर्व काही करते, आपले सारे प्रेम, आपली माया, आपले वात्सल्य, हे सारे ती आपल्या लेकांकारिता खर्ची घालते, बाबांनीदेखील हेच केले. जीवनाच्या अंतापर्यंत आपलं सर्वायुष्य त्यांनी आपल्या अवती-भवतीच्या जिवांकरिता बहाल केले.
शृंखला पायी असुदे, मी गतीचे गीत गाईन,
दुःख उधळवयास आता, आसवांना वेळ नाही...
या ओळीतला प्रत्येक शब्द त्यांच्या सर्वार्थानिशी जगलेल्या बाबांनी वेदनेला साधना आणि श्रमाला शिरं मानून आपले आणि आपल्या सोबतच साऱ्यांचे आयुष्य धन्य केले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जहांगीरदार कुटुंबात, जेथे शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला  वडिलांची देवीदास हरबाजी आमटे यांची प्रशासकिय सेवेतील नोकरी असलेल्या सधन कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ रोजी मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांचा जन्म झाला. बालपणापासूनच बाबा साहसी, निर्भय आणि प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणारे होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी त्यांनी संपादन केली. मनात आणले असते, तर ते विदर्भातील प्रतिष्ठित वकील बनू शकले असते, पण त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वत:ला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. महात्मा गांधी सारखेच विनोबा भावे आणि साने गुरुजी या व्यक्तिमत्वांचा बाबांवर मोठा प्रभाव होता. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.
स्वतंत्रप्राप्तीनंतर  बाबांनी १९४९-५० या कालावधीत कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण करून महारोगासारख्या महाभयानक रोगाने ज्यांना ग्रासले, अशांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. खेड्यापाड्यात पसरलेल्या या रोगामुळे हजारो रुग्ण जिवंतपणी मरणयातना सोसत होते. रोगाने पोखरलेले व अनंत यातना देणारे शरीर आणि समाजाकडून होणारी दारूण विटंबना यांच्या कात्रीत सापडलेले कुष्ठरोगी पाहून बाबांचे संवेदनाशील मन दवले आणि 'प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी' या प्रमाणे जगाने लाथाडलेल्यांना हक्काचे घर मिळावे, म्हणून त्यांनी आनंदवनाची स्थापना करण्याचे कठीण काम स्वीकारले. कोणत्याही मिशनरी संस्थेचा हातभार न लागता, उलट स्वकियांकडूनच निर्र्भत्सनेचे शब्द आणि वाळीत टाकल्याची भावना यांच्याशी सामना करत बाबांनी नेटाने आनंदवनाचा कारभार हाकला. कोलकात्याजवळ मदर तेरेसा कुष्ठरोग्यांना नवजीवन देण्याचे कार्य करत होत्या, त्याच काळात चंदपूर जिल्ह्यातील वरोरा गावच्या दुर्गम प्रदेशात 'आनंदवन' फुलत होते.
बहिष्कृत जमिनीवर बहिष्कृत लोकांनी घडविलेला तो चमत्कार होता. त्या जागेवर विहिरी खणल्या गेल्या. रोपटी उगवू लागली, झोपड्या उभारल्या. १९५१ साली श्रमातून जीवनात आनंद निर्माण झाला. शारीरिक व्यंगव्याधीचे विस्मरण झाले म्हणून त्या श्रमानंदाला नाव ठेवले ‘आनंदवन’..!! कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्यावर इलाज करणे आणि त्यांना रोगमुक्त करून माणसांत आणणे हा बाबांचा ध्यास होता. म्हणून कुष्ठरोगावरची लास शोधून काढायला त्या रोगाचे जंतू स्वतः बाबांनी आपल्या शरीरात टोचून घेतले होते. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रुषाच करण्याचीच नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. ‘महारोगी सेवा समिती’ या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक तेथे आहेत. कुष्ठरोग्यांवर वैद्यकीय उपचार केल्याने त्यांच्या रोगावर नियंत्रण मिळवता येईल, पण त्यांच्या खचलेल्या मनाचे आणि भंगलेल्या स्वाभिमानाचे काय? हा विचार बाबांच्या डोक्यात होता. त्यांना स्वावलंबी केले, तरच त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा करता येईल, हे जाणून 'आनंदवन' उद्योग केंद बनले. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण, शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटिरोद्योग सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. यंत्रमागाचा खडखडाट आणि डोलणाऱ्या पिकांचा ताल यावर आनंदवनातील दु:खी मनेही ताजीतवानी झाली. बाबांनी अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली.

या प्रतिभाशाली माणसाचा लढा फक्त कुष्ठरोगाविरुद्धच नव्हता तर जीवनातील सगळी कुरूपता नाहीशी व्हावी, यासाठीच त्यांनी सर्वकष युद्ध आरंभले होते. आदिवासींच्या दरिद्री आयुष्याला किमान आरोग्याची जोड द्यावी म्हणून त्यांनी भामरगडच्या अरण्यात आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. आंधळ्या मुल-मुलींना हाताळता यावा म्हणून बिनकाट्याचा गुलाब मिळविण्यासाठी धडपडणारे हळुवार मन लाभलेल्या बाबांना शेकडो युवक युवतींना सोबत घेऊन, कन्याकुमारी ते पंजाब, दहशतवादाने पिचलेला काश्मीर आणि कोहिमा ते पोरबंदर या भागांत त्यांनी पायाला भिंगरी लावल्यासारखे भ्रमण केले आणि ' भारत जोडो'साठी देशभराची यात्रा काढली. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. पाठीचे काही मणके गमावल्याने अंथरुणावर कायमचे पडून राहवे लागणाऱ्या एका अपंगाचा हा पराक्रम होता. बाबांच्या या सर्व चळवळींना नैतिकतेचा आधार आणि मानवतावादाचा गाभा होता. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनांबाबत ज्यांना शंका  वा विरोध होता, त्यांनाही बाबांच्या प्रामाणिकपणाबद्दल व सद्हेतूबद्दल केव्हाही संदेह नव्हता.
दीन दुबळ्यांना हात धरून उठविणाऱ्या सेवेभावी बाबांना असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्करांनी गौरविण्यात आले.
१९५८ - रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
१९८६ - पद्मविभूण , पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ - मानवी हक्क पुरस्कार .
१९९० - टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ - राईट लाइव्हली हुड पुरस्कार .त्याच बरोबर पर्यावरणासंबंधीचा ' ग्लोबल ५०० ' पुरस्कार .
१९९९ - आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार.
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार.

समाजसेवा, देशभक्ती करणाऱ्या बाबांचे मन तरल, भावुक वृत्ती आणि नाजुक शब्दसंपदा लाभलेल्या एका विलक्षण हळव्या प्रतिभावंत कवीचे होते. त्यांचा 'ज्वाला आणि फुले'  आणि ‘करुणेचा कलाम’ हे कवितासंग्रह त्यांच्यातील स्वप्नाळू कवीची साक्ष देतात.
'पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू,
 निमिर्तीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाढू;
नांगरु स्वप्ने उद्याची, येथली फुलवीत शेते;
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते...
' या त्यांच्या काव्यपंक्तीनी त्यांचे स्वप्नच शब्दबद्ध केले.
या काव्यसंग्रहातून त्यांच्या भावविश्वाची आणि विचारवैभावांची धुंदीच पहावयास मिळते. ‘थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा आणि धुंद वादळास कोठला किनारा’ अशी तेजोमय कविता लिहिणाऱ्या बाबांच्या कर्तृत्वाला थांबणे मंजूर नव्हते आणि त्याला किनारही कधी मानवाला नाही. ‘भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अमलात आणा’ असे सांगणाऱ्या बाबांनी जेव्हा एखादे कार्य हाती घेतले तेव्हा त्याच्या पूर्ततेविषयी, त्यांच्याखेरीज इतरांच्या मनात शंका असायची. मात्र हाती कोणतेही काम त्यांनी अर्ध्यावर सोडले नाही किंवा ते अपुरेही ठेवले नाही. संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्र्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले.
ज्यांच्या मागे कूळ, जात, धन, किंवा राजकीय साथ यापैकी कोणतीही पुण्याई आधाराला उभी नसते अशी माणसे जेव्हा ‘बाबा आमटे’ होतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांची स्वतःचीच श्रमशक्ती उभी असते. श्रम आणि अश्रुंसोबत केलेल्या या प्रवासात आले ती त्यांना वेळेवेळी साथ लाभली ती बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताईंची. बाबांना स्वतःच्या यातानंखेरीज समाजाच्या यातनांनाही असमाधानी बनविले. त्यांच्या या असमाधातून उभी राहिलेली त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रभावळ फार मोठी आहे. त्यात आनंदवन आहे, त्यांची कविता आहे, युवकांसाठी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके आहेत, साधनाताई आहेत, विकास आणि प्रकाशाची परंपरा आहे. त्यांच्याविषयी श्रद्धाभाव बाळगणारे चाहते, अपंगाना समर्थ बनविण्याची आव्हाने आहेत. दुःख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या प्रतिज्ञा आहेत.
नेते आणि पुढारी बरेच असतात, तत्त्ववेत्ते आणि विचारवंतही बरेच सापडतात. पण तत्त्वाला कृतीची जोड देऊन समाजाच्या शेवटच्या टोकाला जाऊन भिडणारे 'महात्मा' मात्र शतकात एक-दोनच सापडतात. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे, सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढणारे बाबा त्यातीलच एक....
समाजाच्या तिरस्काराचा विषय झालेल्या हजारो कुष्ठरोग्यांच्या आयुष्याला संजीवनी देणारे त्यांच्यासाठी आपले आयुष्य वेचणारे बाबा फेब्रुवारी, २००८ मध्ये अनंतात विलीन झाले.
खरतरं  बाबांसारखी माणसे मारत नसतात, अशा माणसांना शेवट नसतो. ती अमर असतात आपल्या कार्याने कर्तृत्वाने....!!!

Monday, 7 May 2012

निर्मलाताई  पुरंदरे... 

आत्मविश्वासाच्या विश्वाचा आधार...

आजही आपला जवळजवळ सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहतो आणि त्यापैकी अनेकजण; विशेषतः महिला अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ संस्थेने ग्रामीण भागातील. महिला मुले यांना शिक्षणाचे, पर्यायाने विकासाचे दार खुले करून दिले.

ताई आता आम्हाला आमच्या घरात मान मिळतो.
ताई त्यादिवशी गावच्या शाळेत मला शिकवायला बोलावलं होतं.
ताई त्या दिवशी गावच्या सरपंचानी माझा सल्ला विचारला.
ताई आता गावात सगळेजणबालवाडीताई’ म्हणून आदराने वागवतात.”
ताई, ताई आणि फक्त ताई... जणूताई’ हाच त्यांचा श्वास नि ध्यासही. जणूताई’ हाच त्यांचा अंतिम शब्द निताई’ म्हणतील, तीच त्यांच्यासाठी पूर्वदिशाही..!
..
याताई’ म्हणजे निर्मला पुरंदरे..!

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या संचालिका. तना-मनाचं शुभ्रपण कसं असावं, ते निर्मलाताईंना पाहिल्यावर कळतं. आतबाहेर वेगवेगळं काही नाही. जे काही आहे, ते सारं स्वच्छ, निर्मळ आणि पारदर्शक. कुणी नावालाही हिणकस शोधू शकणार नाही इतकं. कामाप्रती नि ध्येयाप्रती असलेल्या असीम निष्ठेमुळेच त्यांचं शीलवान नेतृत्व उजळून निघालंय आणि त्यामुळेच 78 व्या वर्षीही निर्मलाताईंची समाजसेवेची आस कायम आहे.

खरं तर वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी एक स्वप्न पाहिलं. केवळ पाहिलंच नाही, ते प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्दही त्यांनी उराशी बाळगली. हे स्वप्न होतं ग्रामीण भागातील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण मिळण्याचं. त्यासाठी १९८१ मध्ये त्यांनीवनस्थळी’ या संस्थेची स्थापना केली आणि संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण द्यायला सुरुवात केली. गेल्या ३० वर्षात त्यांचं म्हणजे निर्मलाताईंचं स्वप्न साकार झालं आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, लातूर, नाशिक आणि सांगली अशा सात जिल्ह्यांतवनस्थळी’च्या पूर्वप्राथमिक बालशिक्षण देणाऱ्या सुमारे सव्वाशे बालवाडय़ा सुरू आहेत. पाचेक वर्षापूर्वीपर्यंत वनस्थळीच्या या बालवाडय़ांची संख्या खरं तर अडीचशेच्या आसपास होती. पण महाराष्ट्र सरकारला पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची गरज पटली आणि शिक्षण खात्याने राज्यस्तरावर पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची सोय केली. त्यामुळे संख्येच्या पातळीवर वनस्थळीच्या बालवाडय़ांचा आकडा कमी झाला. अर्थात निर्मलाताई असा विचार कधीही करत नाहीत. त्या फक्त आपलं काम करत राहतात. अधिकाधिक मुलांपर्यंत कसं पोचता येईल; याचा विचार करत राहतात.

डॉ. अच्युत शंकर आपटे यांनी १९५५ मध्ये या स्थापना केलेल्याविद्यार्थी साहाय्यक समिती”चे काम करत असताना अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांशी निर्मलाताईंचा परिचय झाला. त्यातील अनेकांच्या घरीही त्यांचे जाणे झाले. त्यावेळी या मुलांची कौटुंबिक परिस्थिती, ग्रामीण भागातील प्रश्नर, एकूणच स्थिती त्यांच्या लक्षात आली. आजही आपला सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहत असून शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षण नाही म्हणून पुढे उभे राहणारे कितीतरी प्रश्नग आहेत, या विचाराने त्यांना ग्रासले. हीच स्थिती ग्रामीण महिलांचीही आहे. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित म्हणून विकासाचा विचार नाही, कुटुंबात दुय्यम स्थान, योग्य आहार, निरोगी वातावरण, वैद्यकीय मदत, दळणवळणाच्या साधनांचा अभाव यांमुळे या महिलांच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य ताईंच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर स्थानिक पातळीवरच काम सुरू करावे लागेल या विचारातून 21 डिसेंबर 1981 पासून "वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'चे काम सुरू झाले.

अनेक कारणांमुळे खेड्यातील मुलींचे अर्धवट राहिलेले शिक्षण आणि त्यातून त्यांचा थांबलेला पुढचा प्रवास विचारात घेऊन "वनस्थळी'ने त्यांना संधी देण्याचा उपक्रम सुरू केला. या मुली आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला, तर गावाची प्रगती वेगाने होईल, या भूमिकेतून प्रयोगाला सुरवात झाली. ग्रामीण भागातील पालकांमध्ये वयाच्या सहा वर्षांपर्यंत मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकताच नव्हती. अडीच-तीन वर्षांपासून मुलाला विविध साधनांची, व्यवहारातील गोष्टींची माहिती व्हायला हवी, त्यांच्यामधील कलांची जाणीव व्हावी म्हणून बालशिक्षण महत्त्वाचे असल्याने ते देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षित सक्षम हवेत म्हणून ग्रामीण महिलांसाठी बालवाडीताई प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठीहिंगणे स्त्री- शिक्षण संस्था” नूतन बाल शिक्षण संघ” यांचे सहकार्य घेण्यात आले. या वर्गांतून पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी आवश्यईक बालशिक्षण कार्यपद्धती, मानसशास्त्र, आरोग्य आणि आहार, बालकल्याण इत्यादींविषयी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. अर्धवट शिक्षण झालेल्या, गावातीलच विविध जाती-धर्मातील अल्पशिक्षित महिलांनी याद्वारे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण झाल्यावर या महिलांनी आपल्याच परिसरातील वीस-पंचवीस मुले जमा करून बालवाडी सुरू करण्यासाठीही "वनस्थळी'ने त्यांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. तसेच, मेळावे, निवासी शिबिरे, चर्चासत्रे घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचाही प्रयत्न केला.

वनस्थळी’चा पूर्वप्राथमिक बालशिक्षणाचा उपक्रम मुलांना लहान वयातच अभ्यासाची गोडी लावणारा होताच. पण तो बालवाडीताईंच्याही व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम होता. कारण मुलांना शिकवता शिकवता बालवाडीताई स्वत:ही शिकत होत्या. महत्त्वाचं म्हणजे आधी सातवी-आठवी किंवा बारावीपर्यंत शिकूनही गावातल्या एखाद्या मुलीला घरात-गावात-समाजात मान मिळायचा नाही. पण बालवाडीताईचं प्रशिक्षण घेऊन गावागावात बालवाडय़ा सुरू केल्यावर मात्र याच मुलींना गावात आदराची वागणूक मिळू लागली. कुठलाही निर्णय आणि कृती त्या जबाबदारीने पार पाडू लागल्या. निर्मलाताईंनी गावेगावी जे आहे, त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारं साहित्य बनवायला मुलींना शिकवलं. त्यामुळे मुलंही शिक्षणसाहित्याला बुजली नाहीत...निर्मलाताईंना ग्रामीण भागातल्या महिलांचा-मुलांचा-समाजाचा विकासच महत्त्वाचा वाटतो. मग तो आपण केला काय किंवा शासनाने केला काय. म्हणून तर त्या पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची कास धरून त्या थांबल्या नाहीत. त्यापुढे जाऊन त्यांनी वनस्थळीतर्फे शाळाशाळांत जाऊन किशोर छंदवर्ग घेणे, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण शिबीर असे अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केली. आता तर बालवाडीताई प्रमाणेच वनस्थळीने बारावी झालेल्या मुलींनाआरोग्य सेविका प्रशिक्षण’ द्यायला सुरुवात केलीय. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून इथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांत आरोग्य सेविकेचं काम आदराने दिलं जात आहे.

ग्रामीण भागातील गरजा ओळखून "वनस्थळी'च्या माध्यमातून निर्मलाताईंनी आजवर असंख्य मुलांना घडवले. स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले. "विद्यार्थी सहायक समिती'च्या माध्यमातूनही त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना नवी दिशा दिली. त्यांची "फ्रान्स मित्रमंडळ' ही संस्था भारत-फ्रान्सची संस्कृती समजून घेत एकमेकांमधील नाते दृढ करत आहे. डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे.

ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल पुणेकरांनीपुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे. सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरत असलेल्या शिवछत्रपतींची प्रतिमा असलेले गौरवचिन्ह आणि रोख एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांना आणि यांच्या पुढील कार्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप खूप शुभेच्छा...

संपर्क-वनस्थळी,
318/ 19
बी, कॅनॉल रोड, मॉडेल कॉलनी, पुणे- 411 016 फोन .- (020 - 25651550)