Thursday 3 May 2012

दादासाहेब फाळके...
भारतीय चित्रपटनिर्मितीचे जनक...


जन्म :- एप्रिल ३०, १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र
मृत्यू :- फेब्रुवारी १६, १९४४ नाशिक, महाराष्ट्र


३ मे १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" या पहिल्या मूकपटाद्वारे भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला या वर्षात १०० वर्षे होत आहेत. आज चित्रपट माध्यमाने समस्त भारतीयांना कवेत घेतले आहे. किंबहुना या न त्या रुपात तो जगण्याचाच भाग झालंय. सिनेमाने सिद्ध केलय कि तुमची वागणूक, नातं, देश, वेश,जात,भाषा,धर्म काहीही असो मनुष्य इथून तिथून एकच आहे...!!!

भारतीय माणसाला, त्याच्या मनाला आकार देणारा हा सिनेमा या वर्षी शाताब्दीकडे वाटचाल करीत आहे. या शंभर वर्षात मनुष्य घडविण्याच्या प्रक्रियेत हजारो कलावंतानी, लाखो तंत्रज्ञानीं आणि कोटी प्रेक्षकांनी भाग घेतला. त्यातून एक चित्रपट संस्कृती निर्माण झाली. आजच्या या चित्रपट संस्कृतीचे आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासात "गोष्ट सांगण्याची कला" प्रकारात गौरवशाली स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय चित्रपटाचे जनक म्हणजे दिवंगत दादासाहेब फाळके आहेत.

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके ह्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. वडिल प्रसिद्ध संस्कृत पंडित असूनही दादासाहेबांना आकर्षण होतं ते रंगांचं, रेषांचं.... म्हणूनच त्यांनी १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात ड्रॉईंग, पेंटिग, मॉडेलिग आणि फोटोग्राफीचे शिक्षण त्यांनी घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. तसेच त्या काळात छायाचित्रकार व नेपथ्यकार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी फोटोग्राफीसाठी स्टील कॅमेरा खरेदी केला. गज्जरांचा कलाभवन स्टुडिओ काही काळ चालवल्यानंतर गोध्रा इथे छायाचित्रणाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९०२ पासून भारत सरकारच्या पुरातत्व विभागात तीन वर्ष त्यांनी नोकरी केली. प्राचीन भूमिगत शहरांची रेखाटनं करण्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यानंतर वंगभंगाच्या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. लोणावळ्याला ‘फाळकेज् आर्ट अॅन्ड प्रिटींग वर्क्स’ या नावाने छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु छपाई व्यवसायात त्यांच्या सहकार्यांुशी त्यांचे वादविवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. एका फोटोग्राफिक स्टुडिओमध्येही त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि नंतर पोर्ट्रेट फोटोग्राफर, तसंच चक्क जादूगार म्हणूनही त्यांनी किमया दाखवली. पुढच्या आयुष्यात त्यांनी कॅमे-यानं दाखवलेल्या जादुला तर सगळेच भुलले , ती जादू म्हणजे चित्रपट.....!!!

चित्रकला, छपाई , फोटोग्राफी ,वास्तुकला , संगीत , जादुगरी आणि हौशी अभिनेता अशी बहुविध प्रतिभा विकसित करणाऱ्या फाळक्यांनी १९११ मध्ये "लाईफ ऑफ ख्राइस्ट "(Life of Christ) हा अमेरिकन मुकपट बघितला आणि फाळकेंच धार्मिक मन चांगलच प्रभावित झालं. त्यातून त्यांनी स्फूर्ती घेतली. परिणामी या प्रतिभाशाली माणसाचा जीवनक्रमचं बदलला. 'त्या' सिनेमातील येशू ख्रिस्ता ऐवजी फाळकेंनी भगवान कृष्ण व इतर देवदेवतांना पाहिलं. आणि याच प्रेरणेनं त्यांनी छायालेखनाच्या नव्या परंपरेची मुहूर्तमेढ केली. मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून १९१२ साली ते इंग्लंडला चित्रपटतंत्र शिकण्यासाठी गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगाचा त्यांनी अभ्यास केला. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळवली. आणि भारतात परतल्यावर राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट तंत्र आत्मसात करून १९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली.

३ मे १९१३ रोजी "राजा हरिश्चंद्र" भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) मुंबईत कोरोनेशन सिनेमा ( Coronation Cinema) येथे प्रदर्शित केला. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. या पहिल्या भारतीय चित्रपटाचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळेच भारतीय चित्रपटाच्या जनकत्वाचा मान त्यांच्याकडे जातो. दादासाहेबांनी पटकथा लिहिली, निगेटीव धुतली, वेशभूषा तयार केली, कलाकारांना दिग्दर्शन केलं, छायालेखन केलं, तयार फिल्मवर प्रक्रिया केली. संकलन केलं. एवढंच नव्हे तर चित्रपटाचे प्रदर्शन, प्रसार व प्रचारही केला. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन बैलगाडीतून गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. खरोखर दादासाहेब फाळके म्हणजे "वन मॅन इंडस्ट्री"च होती. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले. त्यांनी खरा खुरा भारतीय सिनेमा जन्माला घातला आणि भारतीय सिनेमाच्या विकासाला दिशा दिली.

दादासाहेबांच्या कामगिरीचा काळ हा हिंदू समाज व संस्कृतीच्या जागृतीचा काळ होता. ते स्वतःही त्या इतिहासाच्या कालप्रवाहात जागृतपणे कार्य करीत होते. बाल्यावस्थेत असलेल्या या माध्यमाचा त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागृतीसाठी वापर केला. सिनेमामध्ये लोकांचा आत्मा पाहु शकणाऱ्या या द्रष्ट्या माणसाची नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिला अमेरिकन रुपक चित्रपट "ग्रेट ट्रेन रॉबर्स" ही गॅगस्टर फिल्म होती, तर पहिला भारतीय रुपक चित्रपट "राजा हरिश्चंद्र" हा धार्मिक कथेवरचा होता... राजा हरिश्चंद्र नंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३), सावित्री सत्यवान (इ.स. १९१४), श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८), कालिया मर्दन (इ.स. १९१९), सेतुबंधन (इ.स. १९३२), गंगावतरण (इ.स. १९३७) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी पाच भागीदारांसह ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. ‘गंगावतरण’ हा त्यांनी निर्मिलेला पहिला बोलपट. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले.
दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील जवळजवळ ३० लघुपटही काढले.

पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्‌श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.

खर्याि अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणार्या दादासाहेबांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे निधन झाले. या चित्रमहर्षीला जनता कधीच विसरू शकत नाही चित्रपट क्षेत्रातील दादासाहेबांच्या मुलभूत कार्यांची दाखल घेऊन केंद्र शासनाने सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्याा कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला.

चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे, तसेच महाराष्ट्रात भारतातील पहिला चित्रपट बनवणारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत हे निश्र्चित..!

चित्रपट सृष्टीतील पाहिलं दशक हे दादासाहेबंच होत... आज ही चित्रपट सृष्टोई शंभर वर्षाची होत असताना रंगीबेरंगी दुनिया पडद्यावर साकारणा-या चित्रपटसृष्टीच्या जनकाला या चित्रमहर्षीला सलाम...!!!

No comments:

Post a Comment