Monday 11 June 2012

साने गुरुजी...
“साधी राहणी उच्च विचारसरणी” या मूर्तीचे प्रतीक म्हणजे साने गुरुजी.

जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९ पालगड, रत्नागिरी
मृत्यू: जून ११, इ.स. १९५० के.इ.एम.रुग्णालय मुंबई



थोर साहित्यिक, स्वतंत्र समरातील आघाडीचे नेते आणि प्रेममूर्ती बालागोपालांचे लाडके दैवत मातृहृदय पू. साने गुरुजी...

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने...! त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये कोकणात पालगडसारख्या खेडेगावात झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जात पण हे त्यांच्या आजोबांच्या वेळी पण गुरुजींच्यावेळी घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली इतकी कि त्यांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले आणि गरिबीने त्यांच्या परिवाराला घेरले. शाळेतील फी भरण्याची सुद्धा सोय नसे; परंतु त्यांच्या आईला आपला मुलगा शिकला पाहिजे असेच वाटे. शिक्षणासाठी कष्ट उपसण्याची शक्ती गुरूजींजवळ होती, म्हणून ते गाव सोडून शिकण्यासाठी दूर गेले, जेणेकरून आपल्याला काम करून शिकता येईल आणि कुणी ओळखाणारही नाही. अशा परिस्थितीत गुरुजी एम.ए. पर्यंत शिकले. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर संस्कार घालणे महत्वाचे मानले. त्यासाठी त्यांनी कथा हे माध्यम निवडले व ते प्रभावी ठरले. स्वत:च्या उदाहरणातून त्यांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ तर शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’ त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. स्वातंत्राची चळवळ जोर धरू लागल्यावर ते विनोबाजी, म. गांधी यांच्या संपर्कात आले आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्यांंची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.

समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्याु पांडुरंगाला खर्याे अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, अनेक भाषा, चालीरीती समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.

त्यांच्या कथा, कादंबर्याध, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक तर मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये आपल्याला दिसतात. त्यांच्या लिखाणात मातृहृदयाची जाण होती. आजही त्यांच्या स्फुर्तिदायी कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली.

साने गुरूजींचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते. ते म्हणत ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू’. त्या प्रेमातूनच ‘श्यामच्या आईचा’ जन्म झाला. ‘श्यामची आई’ या सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. गुरुजींनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले.

त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. फेब्रुवारी १९३३ मध्ये ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. आईच्या उच्च विचारसरणीतून, शिस्तीतून, प्रेमळ वागण्यातून गुरुजी घडले. माणसाने गरिबीत जीवन जगावे पण स्वाभिमान सोडू नये. प्रामाणिक असावे, लाचारी पत्करू , दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे, भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करणे, गरिबांना मदत करावी जीवन समाजसेवेसाठी वेचावे असे त्यांना वाटे.

स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली, ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टह केले पण काही कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले. आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले आहे. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

आसवांना शब्द देणाऱ्या, मातृहृदायाच्या महामानवास शतशः अभिवादन...!!!

No comments:

Post a Comment