Friday 8 June 2012

हिरवाईच्या वाटेवर चालणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले...


डॉ. अर्चना गोडबोले.
पर्यावरणतज्ज्ञ, AERFच्या संस्थापिका...

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले..

तीव्र इच्छेचा परिस हातात असला आणि त्याला अथक, मन:पूर्वक प्रयत्नांची जोड मिळाली तर एखादी अनवट वाटसुद्धा कशी लखलखीत होऊन उजळून निघते याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. अर्चना गोडबोले, ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’च्या (AERF) संस्थापिका... पण अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर कोकणातील देवराया आणि पर्यायाने पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरावे म्हणून अखंड काम करणारी स्त्री...

महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया आणि त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पती असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. आज कोकणातील देवरायांचा हा प्रश्न केवळ ‘लोकल’ नाही, तर ‘ग्लोबल’ पातळीवर होणारी तापमानवाढ, बदलणारे ऋतुचक्र, नैसर्गिक संसाधनांची अमाप वेगाने होणारी हानी अशा सगळ्या प्रश्नांशी त्याचे नाते आहे.

या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अर्चना कधी सावंतवाडी, कुडाळजवळच्या अगदी दुर्गम अशा छोटय़ा गावांमध्ये असतात तर कधी दोन-अडीच महिने अमेरिकेत मात्र दोन्ही ठिकाणचा अजेंडा एकच. समविचारी लोकांच्या भेटीगाठी. पर्यावरणाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काय प्रयत्न करता येईल याची आखणी आणि असेच काही.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाच्या घरात पैशाची श्रीमंती फार नव्हती, पण पुस्तक, वाचन, चर्चा अशी वैचारिक समृद्धी भरपूर होती. मोठी स्वप्नं बघण्यासाठी लागणारी हिंमत तिला तिच्या वडिलांनी दिली, अर्चना यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागलेली बघायची होती तेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता अर्चना यांनी वनस्पती नामकरणशास्त्रात एम. एस्सी. केली मग मानव वनस्पतीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी जणू झपाटलेला कालखंड होता. मनापासून आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्याचा आनंद तर होताच, पण पश्चिम घाट बचाव चळवळीच्या संपर्कात आल्याने आवडत्या विषयात प्रत्यक्ष काम करण्याचे धडेही त्याच वेळी मिळत होते. चळवळीतील सहकारी असलेले आणि पर्यावरणासंबंधात मराठी पत्रकारिता करणारे जगदीश गोडबोलेने शंभर दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालण्याचे ठरवले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कामाची दिशा अर्चना यांना या मोहिमेतून मिळाली आणि स्वत:मधील सामथ्र्य, कौशल्य याची ओळखही स्पष्टपणे झाली. या मोहिमेनंतर त्यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण खात्यात नोकरीत केली, पण त्या कामाचे समाधान फारसे मिळाले नाही, पण जंगल संरक्षण आणि संवर्धन या कामासाठी आवश्यक असलेली अभ्यास व संशोधनाची पाश्र्वभूमी मात्र तयार झाली.

देवरायांचे संरक्षण-संवर्धन करणारी संस्था स्थापण्याच्या खटाटोपाऐवजी पर्यावरण विषयातील एखादे झुळझुळीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील पद, नोकरी मिळवणे हे त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली, खडतर पण शाश्वत विकासाचे आश्वासन देणारी. जैविक विविधतेच्या संदर्भात संशोधन, या विविधतेचे रक्षण आणि संवर्धन आणि त्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन हे सूत्र घेऊन(AERF) या त्यांच्या संस्थेने काम सुरू केले. पुढे पर्यावरणासाठी इतके मूलभूत काम करणाऱ्या संस्थेला आणि माणसांना कोकणच्या जंगलाने आमंत्रण दिले...!

कोकणात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या देवराया म्हणजे निव्वळ वृक्षसमूह आणि त्यावरील प्राणी-पक्षी जीवन नाही. ती एक संपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. परस्परांना जगवणारी आणि त्यामुळे परस्परांवर अवलंबून असणारी. त्याच्या आसपास जगणाऱ्या माणसांच्या जीवनाला सर्वार्थाने आधार देणारी ही व्यवस्था... या व्यवस्थेला मूठभर लोभी माणसांपासून वाचवायची गरज आहे तर त्यासाठी लोकांचा पाठिंबा हवा, मदत हवी, लोकजागृती आणि त्यातून स्वयंस्फूर्तीने लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे त्यांचे सगळे कामच लोकसहभागाभोवती गुंफले आहे.

सध्या देवराई संरक्षणाबरोबर, खाणकाम उद्योग हे ही एक कडवं आव्हान बनतं आहे. पण त्याच्याशी लढण्यासाठीही मोर्चे काढण्यापेक्षा, नारेबाजी करण्यापेक्षा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे धोरण अर्चनाने अनुसरले आहे कारण मोर्चे काढून, आंदोलन करून, सरकारवर जबाबदारी टाकून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पूर्ण पणे थांबणार नाहीत. फार तर सरकारी आदेश निघतील हे त्यांना देवरई संरक्षणाच्या अनुभवातून कळून चुकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील असनिये गावातील खाणकाम थांबवण्यासाठी या परिसरातील जैवविविधतेचा एक वर्ष सखोल अभ्यास करून तपशीलवार अहवाल तयार केला गेला आणि गावातील लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनवाईमध्ये या अहवालाच्या आधारे प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यात आला. समाजातील सत्ताधीश, पैशाची अमाप सत्ता बाळगत निर्णय आपल्या बाजूने वळवणाऱ्यांचा विरोध पत्कारत ज्या भूमीच्या पोटात तुम्ही खणत खोल उतरता तिचे आणि तिच्या आधारे जगणाऱ्या माणसांची काही बाजू आहे व ती त्या हिरिरीने मांडते आहेत.

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं निव्वळ वाचवणं हे अर्चना यांच्या पुढील आव्हान नाही तर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं हे त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे काम आहे आणि त्यासाठी My Forest नावाचा उपक्रम त्यांनी वं त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतला आहे. जैवविविधतेच्या प्रश्नी ज्यांना आस्था आहे त्यांनी एक एकर जमीन पाच वर्षांसाठी, पाच हजार रुपये देऊन दत्तक घ्यायची. हे पैसे जंगले तोडून पैसे कमवू इच्छिणाऱ्या जमीन मालकाला दिले जातात आणि जंगल वाचवले जाते. एक जंगल वाचते तेव्हा त्याच्या अंगा-खांद्यावर जगणारे प्राणी, पक्षी, कीटक तर वाचतातच, पण हवेचे प्रदूषण काही अंशाने कमी होते आणि पावसाचे चार काळे ढग त्या जंगलाच्या माथ्यावर येण्याच्या शक्यता वाढतात.

अर्चना यांच्या आयुष्याचा साथीदार जगदीश त्यांचा हात सोडून गेल्यावर आता निसर्ग हाच त्यांचा आप्त, मित्र सर्व काही आहे. भटकंती करीत निसर्गाची तऱ्हेतऱ्हेची रूपे बघायला आवडणाऱ्या अर्चना यांना या भटकंतीतच विविधरंगी, अद्भुत निसर्ग, त्याची अनंत रूपे बघायला मिळाली.

आत्तापर्यंत जागतिकीकरणाचे वारे येण्यापूर्वीपर्यंत सामान्य माणसांचे निसर्गाशी काहीतरी नाते होते. घरातील प्रत्येकाला किमान चार झाडांची नावे ठाऊक होती. अंगणा-परसातील झाडे ओळखता येत होती. निसर्गातील शांतता त्याला हवीशी वाटत होती. या ना त्या निमित्ताने तो निसर्गाशी जोडलेला होता. त्यामुळे ‘निसर्गाला सांभाळा’ हे सामान्य माणसाला सांगणे-पटवून देणे सोपे होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या रेटय़ाने माहिती, उपभोगाची साधने याचा जो एक महापूर आपल्याकडे आला आहे, त्यात हे नाते, मूल्यविवेक फार वाहून गेला आहे. आता निसर्गाचा आदर करणे माणसं विसरलीच आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये निसर्गाबद्दलची, त्यातील संसाधनांबद्दलची कमालीची वाढलेली बेफिकिरी आणि अलिप्तपणा त्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते आहे ते फक्त ओरबाडून घेण्यापुरतेच. अशा या आव्हानांशी आता पर्यावरणासाठी लढणाऱ्या अर्चनासारख्या कार्यकर्त्यांना लढावे लागते आहे. २०११ ला डॉ. अर्चना गोडबोले आणि कोल्हापूरच्या ‘निसर्ग मित्र'चे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटाचा भाग असणाऱ्या राज्यांच्या संस्थां, पर्यावरणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरविले आहे.

हिरवाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन, हिरव्या वाटेवरचा ह्या वेगळ्या प्रवासावर असणाऱ्या अर्चना सारख्या अनेकांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांकारिता आणि पर्यावरण संवार्धानाकरिता अनेक अनेक शुभेच्छा...!!!

साभार- लोकसत्ता...

1 comment: