Monday, 7 May 2012

कवी ग्रेस... 
अरुपाचे रुप दावणारा कवी...
जन्म:- १०मे १९३७
मृत्यू:-  २६मार्च २०१२ 

कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपूर येथे झाला. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नावं. पण "कवी ग्रेस" या नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९६७ साली प्रकाशित झालेल्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत, अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. त्यांच्या काही कविता आपल्या शालेय अभ्यासक्रमातही आहेत.
                                                      
"समजण्यास अत्यंत अवघड" इथपासून ते "केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही" इथपर्यंतच्या टीका कवी ग्रेस यांच्या काव्यावरती झाल्या आहेत. यावर "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही" असे त्यांचे म्हणणे होते.
ग्रेसची दुःखला सामोरे जाण्याची पद्धत विलक्षण होती. दुःख आणि कविहृदय याचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा आहे. दुःख जणू शहाणपण देण्याकरिताच निर्माण होत असावे. म्हणूनचदेठास तोडतानाही रडले फुलांचे अंग’ ही पुष्पवस्था त्यांना आदर्शवत वाटत असावी.. ग्रेसच्या कवितेचे दर्शनी स्वरूप अत्यंत मोहक आहे. संगमरवरावर नाजूक हाताने नक्षी काढून, तिला रंग दिल्यावर तिचे सौंदर्य खुलावे, तशी शब्दांची नक्षी कोरण्याचा ग्रेसला हव्यास होता. त्यांच्यासंध्याकाळच्या कविता’ प्रकाशित होऊन इतकी वर्षे लोटल्यावरही तिच्यातील ताजेपणा लोपले नाही.

ग्रेस यांना अगदी सुरवातीपासूनच शब्दशक्तीची विलक्षण समज होती. त्यांना ती नक्षीकामाकरिता अतिशय उपयोगी पडली. शब्दाच्या अर्थाची आणि नादाची इतकी खोल समाज असणारा कवी निराळाच. आवश्यक शब्दांच्या अचूक निवडीत त्याच्या प्रतिभेचे मर्म आहे. अपरिचित, आडवळणी, कृत्रिम, मुद्दाम निर्माण केलेले, इंग्रजीने संस्कारित केलेले असे कोणतेही शब्द त्याच्या कवितेत नाहीत. याचे कारण त्यांचे भावविश्व संपूर्णपणे भारतीय जीवन जाणीवांनी आणि वैचारिक विश्वाने संस्कारित केलेले होते. ग्रेसच्या अनवट अनुभूतीविश्वाने ग्रेसच्या शैलीला विवक्षित परिणाम दिले. शैलीतील प्रासादिकतेचे सौंदर्य तिला मान्य नव्हते, किंबहुना कविता आलंकारिक आणि भरजरी असली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. ग्रेसच्या शैलीत सुभाषितवजा चरणांना फार महत्व आहे. आपल्या प्रतिभेच्या घाटातूनच मराठी काव्य परंपरेतील आवश्यक घटकांचा स्वीकार त्यांनी केला होता.समकालीन भावकाव्यात कवी ग्रेसच्या कविता संपूर्णपणे वेगळ्या आहेत.. मर्ठेकारी काव्याप्रवाहत लिहिणाऱ्या अलीकडच्या कवींच्या संस्कृतिसंचीताला दिलेला नकार आणि बोजड गद्मयता यामुळे निर्माण झालेले मराठी कवितेतील आवर्त ग्रेसच्या कवितेने निवारले.. मराठी कवितेतील संस्कारभान तिने जगविले. परंपरागत मराठी संस्कृतीतील तपशिलाचा साहचर्यसंगीतयुक्त उपयोग करून तिला समृद्ध केले. पण त्यातच गुंतून पडता नेनिवेप्रधान भावावस्थेतील तरल गुढ अनुभूतिनी साकार करून एक अभिजात सोंदर्यशिल्पाचे रूप आपल्या कवितेला दिले. मराठी भावकवीतेला आपल्या अंतस्थ गेयतेचे परिमाण देऊन समृद्ध केले.

स्वतःच्या जगण्यातून इतरांना सदैव अस्वस्थ करणाऱ्या कविवर्य ग्रेस यांच्या जगण्याची धाटणी "मै ओर मेरी तनहाई" अशी होती.. वर्तमानातील प्रत्येक क्षणाची चाचपणी करून तो मनसोक्त जगण्याची आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्याच्या ग्रेस यांच्या जगण्याचे कुतूहल शेवट पर्यंत कायम राहिले. अनेकदा स्वतःच्या एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेस यांना या एकटेपणानेच जगण्याची मजा बहाल केली होती. कधी रडवणारे, कधी हसविणारे, कधी अंतर्मुख करणारे, तर कधी जगण्याचे आणि जगाचे अद्वितीय सत्य उमगायला लावणारे, स्वतःच्या जगण्यावर निस्सिम प्रेम करणारे, कवी ग्रेस म्हणजे कलंदर माणूस... म्हणूनच...

I am free But not Available.
Flat For Sale But not For Gentlemen.

असे अफलातून ओळी लिहून ठेवायचे.

इतरांना जगण्याचे भान आणून देतानाच त्यांना काहीतरी वेगळे तत्वज्ञान सांगणारे ग्रेस अतिशय दिलदार. त्यांच्या घरात आलेला कोणीही माणूस कधी रिकाम्या हाताने गेलाच नसावा. तो विचार, आनंदी जगणे, एकटे जगण्यातील ताकद, असे बरेच काही घेऊन गेलेला असावा.
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काही गाजलेले कविता संग्रह तर चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी हे त्यांचे गाजलेले ललित संग्रह होते.

कवी गेस हे नागपूरच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालयात (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. यांनी काही काळ पत्रकारितासुध्दा केली होती. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या दुस-या -साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
पुरस्कार :-

संध्याकाळच्या कविता’ या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८,
चर्चबेल’ ललितबंधाला राज्य पुरस्कार,
राजपुत्र आणि डार्लिंग’ राज्य पुरस्कार,
चंद्रमाधवीचे प्रदेश’ या कवितासंग्रहाला प्रादेशिक भाषेत बंगलोरमध्ये राज्य पुरस्कार,
मितवा’ या ललितबंधाला मारवाडी संमेलनात सम्मान, कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार-२०११, नागपूर भूषण २०११, नागपूर - विदर्भ फाउंडेशनचा "विदर्भभूषण' पुरस्कार -२०११,
"
वा-याने हलते रान" या ललित लेखसंग्रहाला २०१२ सालच्या "साहित्य अकादमी पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले होते. आजारी असूनही साहित्यविश्वातील सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी ग्रेस व्हिलचेअरवर या समारंभासाठी आले होते. पण बसल्या जागेवरून हलणे शक्य नसल्यामुळे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी, ग्रेस बसले होते तेथे जाऊन त्यांचा सन्मान केला.


कवी ग्रेस गेले काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होते.तीन वर्षांपुर्वी त्याना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून ते पुण्य़ाच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर २६ मार्च २०१२ रोजी ७५ वर्षीय ग्रेस यांची प्राणज्योत मालवली.

समकालीन कवींपेक्षा वेगळा विचार करून शब्दांच्या जगात लिलया वावरणारा हा जादूगार आज गेल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा, निष्पर्ण तरूंची राई, मरण या त्यांच्या गाजलेल्या कविता रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....!!! 

Thursday, 3 May 2012

दादासाहेब फाळके...
भारतीय चित्रपटनिर्मितीचे जनक...


जन्म :- एप्रिल ३०, १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र
मृत्यू :- फेब्रुवारी १६, १९४४ नाशिक, महाराष्ट्र


३ मे १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" या पहिल्या मूकपटाद्वारे भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला या वर्षात १०० वर्षे होत आहेत. आज चित्रपट माध्यमाने समस्त भारतीयांना कवेत घेतले आहे. किंबहुना या न त्या रुपात तो जगण्याचाच भाग झालंय. सिनेमाने सिद्ध केलय कि तुमची वागणूक, नातं, देश, वेश,जात,भाषा,धर्म काहीही असो मनुष्य इथून तिथून एकच आहे...!!!

भारतीय माणसाला, त्याच्या मनाला आकार देणारा हा सिनेमा या वर्षी शाताब्दीकडे वाटचाल करीत आहे. या शंभर वर्षात मनुष्य घडविण्याच्या प्रक्रियेत हजारो कलावंतानी, लाखो तंत्रज्ञानीं आणि कोटी प्रेक्षकांनी भाग घेतला. त्यातून एक चित्रपट संस्कृती निर्माण झाली. आजच्या या चित्रपट संस्कृतीचे आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासात "गोष्ट सांगण्याची कला" प्रकारात गौरवशाली स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय चित्रपटाचे जनक म्हणजे दिवंगत दादासाहेब फाळके आहेत.

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके ह्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. वडिल प्रसिद्ध संस्कृत पंडित असूनही दादासाहेबांना आकर्षण होतं ते रंगांचं, रेषांचं.... म्हणूनच त्यांनी १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात ड्रॉईंग, पेंटिग, मॉडेलिग आणि फोटोग्राफीचे शिक्षण त्यांनी घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. तसेच त्या काळात छायाचित्रकार व नेपथ्यकार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी फोटोग्राफीसाठी स्टील कॅमेरा खरेदी केला. गज्जरांचा कलाभवन स्टुडिओ काही काळ चालवल्यानंतर गोध्रा इथे छायाचित्रणाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९०२ पासून भारत सरकारच्या पुरातत्व विभागात तीन वर्ष त्यांनी नोकरी केली. प्राचीन भूमिगत शहरांची रेखाटनं करण्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यानंतर वंगभंगाच्या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. लोणावळ्याला ‘फाळकेज् आर्ट अॅन्ड प्रिटींग वर्क्स’ या नावाने छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु छपाई व्यवसायात त्यांच्या सहकार्यांुशी त्यांचे वादविवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. एका फोटोग्राफिक स्टुडिओमध्येही त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि नंतर पोर्ट्रेट फोटोग्राफर, तसंच चक्क जादूगार म्हणूनही त्यांनी किमया दाखवली. पुढच्या आयुष्यात त्यांनी कॅमे-यानं दाखवलेल्या जादुला तर सगळेच भुलले , ती जादू म्हणजे चित्रपट.....!!!

चित्रकला, छपाई , फोटोग्राफी ,वास्तुकला , संगीत , जादुगरी आणि हौशी अभिनेता अशी बहुविध प्रतिभा विकसित करणाऱ्या फाळक्यांनी १९११ मध्ये "लाईफ ऑफ ख्राइस्ट "(Life of Christ) हा अमेरिकन मुकपट बघितला आणि फाळकेंच धार्मिक मन चांगलच प्रभावित झालं. त्यातून त्यांनी स्फूर्ती घेतली. परिणामी या प्रतिभाशाली माणसाचा जीवनक्रमचं बदलला. 'त्या' सिनेमातील येशू ख्रिस्ता ऐवजी फाळकेंनी भगवान कृष्ण व इतर देवदेवतांना पाहिलं. आणि याच प्रेरणेनं त्यांनी छायालेखनाच्या नव्या परंपरेची मुहूर्तमेढ केली. मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून १९१२ साली ते इंग्लंडला चित्रपटतंत्र शिकण्यासाठी गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगाचा त्यांनी अभ्यास केला. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळवली. आणि भारतात परतल्यावर राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट तंत्र आत्मसात करून १९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली.

३ मे १९१३ रोजी "राजा हरिश्चंद्र" भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) मुंबईत कोरोनेशन सिनेमा ( Coronation Cinema) येथे प्रदर्शित केला. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. या पहिल्या भारतीय चित्रपटाचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळेच भारतीय चित्रपटाच्या जनकत्वाचा मान त्यांच्याकडे जातो. दादासाहेबांनी पटकथा लिहिली, निगेटीव धुतली, वेशभूषा तयार केली, कलाकारांना दिग्दर्शन केलं, छायालेखन केलं, तयार फिल्मवर प्रक्रिया केली. संकलन केलं. एवढंच नव्हे तर चित्रपटाचे प्रदर्शन, प्रसार व प्रचारही केला. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन बैलगाडीतून गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. खरोखर दादासाहेब फाळके म्हणजे "वन मॅन इंडस्ट्री"च होती. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले. त्यांनी खरा खुरा भारतीय सिनेमा जन्माला घातला आणि भारतीय सिनेमाच्या विकासाला दिशा दिली.

दादासाहेबांच्या कामगिरीचा काळ हा हिंदू समाज व संस्कृतीच्या जागृतीचा काळ होता. ते स्वतःही त्या इतिहासाच्या कालप्रवाहात जागृतपणे कार्य करीत होते. बाल्यावस्थेत असलेल्या या माध्यमाचा त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागृतीसाठी वापर केला. सिनेमामध्ये लोकांचा आत्मा पाहु शकणाऱ्या या द्रष्ट्या माणसाची नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिला अमेरिकन रुपक चित्रपट "ग्रेट ट्रेन रॉबर्स" ही गॅगस्टर फिल्म होती, तर पहिला भारतीय रुपक चित्रपट "राजा हरिश्चंद्र" हा धार्मिक कथेवरचा होता... राजा हरिश्चंद्र नंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३), सावित्री सत्यवान (इ.स. १९१४), श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८), कालिया मर्दन (इ.स. १९१९), सेतुबंधन (इ.स. १९३२), गंगावतरण (इ.स. १९३७) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी पाच भागीदारांसह ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. ‘गंगावतरण’ हा त्यांनी निर्मिलेला पहिला बोलपट. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले.
दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील जवळजवळ ३० लघुपटही काढले.

पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्‌श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.

खर्याि अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणार्या दादासाहेबांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे निधन झाले. या चित्रमहर्षीला जनता कधीच विसरू शकत नाही चित्रपट क्षेत्रातील दादासाहेबांच्या मुलभूत कार्यांची दाखल घेऊन केंद्र शासनाने सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्याा कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला.

चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे, तसेच महाराष्ट्रात भारतातील पहिला चित्रपट बनवणारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत हे निश्र्चित..!

चित्रपट सृष्टीतील पाहिलं दशक हे दादासाहेबंच होत... आज ही चित्रपट सृष्टोई शंभर वर्षाची होत असताना रंगीबेरंगी दुनिया पडद्यावर साकारणा-या चित्रपटसृष्टीच्या जनकाला या चित्रमहर्षीला सलाम...!!!

Saturday, 14 April 2012

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण

जन्म:- मार्च १२, ..१९१३
मृत्यू:- नोव्हेंबर २५, ..१९८४

माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.”--यशवंतराव चव्हाण.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।

महाराष्ट्राचा देशाला केवढा आधार आहे, याचं वर्णन करणार्या सेनापती बापटांच्या कवितेच्या या ओळी. त्या सार्थ केल्या यशवंतराव चव्हाणांनी. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेले. महाराष्ट्राच्या गैरवशाली इतिहासात त्यानी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचे हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हते. तर हा नेता होता, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.

मार्च १२, ..१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.

१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना त्यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० - १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

यशवंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचे स्वरूप थोडक्यात सांगायचे तर कुसुमाग्रजांच्या चार ओळी कमालीच्या बोलक्या आहेत...

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे..
लक्ष शून्यातून
काही क्षेत्र आकारात आहे..

यशवंतरावांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहकाराचे तत्व अवलंबिले. सर्व राज्यांत बदल होणे शक्य नव्हते पण काही भागात तो झाला त्यामुळे काही बरे-वाईट परिणामही झालेत. पण राज्याच्या काही भागांतल्या सामान्य लोकांत स्वतःच्या प्रयत्नांनी भांडवल उभारण्याची ईर्षानिर्माण होऊन जो मानसिक बदल झाला तो महत्वाचा होता.

पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावांना नेहरूनी आमंत्रण दिले. ‘संरक्षण हा विषय तुम्हाला नवाखा असले तरी तुम्ही तो लवकरच आत्मसात कराल’ असं विश्वास नेहरूंनीच व्यक्त केला आणि तो यशवंतरावांनी खरा केला. पुढील काळात साधूंनी गोहात्याबंदीचे आंदोलन पुकारले तेव्हाही इंदिरा गांधीकडून यशवंतरावांना आमंत्रण आले आणि गृहमंत्री पद ताबडतोब स्वीकारण्याचा आग्रह झाला. त्यावेळीही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, अर्थमंत्री (१९७१-१९७५), परराष्ट्रमंत्री (१९७४-१९७७) ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. तेव्हा त्यांची एक कुशल परराष्ट्र मंत्री म्हणून गणना होत असे, म्हणूनच ते सत्तेवर नसतानाही काही देशांचे राजदूत त्यांना येऊन भेटत असतं. १९७७-७८ कालवधीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्रात संसदीय सचिव, अन्नपुरवठा मंत्री, स्थानिक स्वराज्य मंत्री, द्वैभाषिक मुंबई, संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इत्यादी पदे, तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अशा जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. खरं तर यशवंतरावांची संपूर्ण कारकीर्दच कोणाही नेत्याला दीपस्तंभासारखी रस्ता दाखवणारी आहे.

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात आहेत. त्यांनी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. काही ठळक निर्णय पुढीलप्रमाणे :-

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.
(प्रशासकीय विकास)
- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
- कोल्हापूर बंधार्यां्चा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)
- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल. गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.

यशवंतराव राजकारणात नसते, तर ते एक उत्तम साहित्यिक झाले असते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. राजकारण आणि समाजकारण या व्यतिरिक्त अनेक कलागुण असलेले आणि त्या कलेचा मनापासून आस्वाद घेणारे राजकारणी मंडळी क्वचितच आढळतील. यशवंतरावांना कवींच्या मैफिलींची, साहित्य, संगीत, नाटकांची फार आवड होती. सत्तेवर नसताना त्यांनी आपला वेळ साहित्यासाठी दिला. अधूम-मधून ते कविता करीत तर कधी मोठ्याने कवितावाचन करीत आणि श्रोते म्हणून त्यांच्या पत्नी वेणूताई असतं. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

यशवंतरावकृष्णाकाठ” या आपल्या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहीत असताना त्यांच्या पुतण्याचे अपघाती मृत्युमुळे कृष्णकाठच्या दुसऱ्या भागाच्या लिहिण्यात त्यात खंड पडला. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या सौ.वेणूताईंच्या निधनाने ते पूर्णपणे खचले. आता फक्त हा सह्याद्री पडण्याचे शिल्लक राहिले होते. वेणूताईंच्या मृत्युनंतर सतत १५ महिने अश्रू गळणाऱ्या यशवंतरावांचे अश्रू थांबले ते श्वास थांबल्यावरच. आत्मचरित्र कृष्णाकाठचा पुढील भाग न लिहीतचकृष्णाकाठावर” चिरविश्रांती घेऊन पूर्ण झाला.

प्रादेशिकतेच्या मर्यादा सहज ओलांडून राष्ट्रीत्वाला स्पर्श करू शकणारे. कर्तृत्व, साहित्य, कला, संस्कृतीच्या सहज स्पर्शाने उन्नत झालेली रसिकता.. आणि काडोविकडीच्या प्रसंगातून मार्गक्रमण करू शकणारे राजकीय धुरीणत्व.. अशा अभिजात नेतृत्वाचा वारसा महाराष्ट्राला देणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे १३ मार्च, २०१२ - १२ मार्च, २०१३ हे
जन्मशताब्दी वर्ष...!!!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, युगपुरुष स्व. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादान...!!!

हिमालयावर येत घाला
सह्यगिरी हा धून गेला,
मराठमोळ्या पराक्रमाने
दिला दिलासा इतिहासाला...
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने,
जोवर भाषा असे मराठी
यशवंताची” घुमतील कवने...
--------कवी राजा मंगसुळीकर.

Saturday, 7 April 2012

जादुई लेखणी लाभलेला गीतकार- कविवर्य राजा बढे


जन्म-१ फेब्रुवारी १९१२
मृत्यू- ७ एप्रिल १९७७

कविवर्य राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी....

आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. स्वत:सोबत रसिकांनाही चांदण्यात भिजवणारा आणि सुखद गारवा देणारा हा कवीआहे कसा आननी' हे जरी महत्त्वाचे नसले तरी कवीचे दिसणे आणि असणे याचा अपूर्व संगम राजा बढे यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते..! रूपसंपदा, हुकमी कवित्व आणि सदासुखी आयुष्यक्रम असा त्रिवेणीसंगम त्यांच्या जीवनात होता.

राजा नीळकंठ बढे यांचे जन्मस्थान नागपूर. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिकसकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिकमहाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळीवागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिकसावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.

१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबतअंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्‌ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवरनिर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते.

समकालीन जनाभिरुचीचं भान ठेवून विविध भावावस्था बढे यांनी गीतांमधून साकारल्या. प्रेमव्याकुळता हा त्यांच्या कवितेचा-गीतांचा विशेष. आपली गीतं अधिकाधिक आस्वाद्य कशी होतील, यावरच त्यांचा कटाक्ष असे. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली , तरचांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनीप्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली.

राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्याक्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनीप्रस्तावनेत'
‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत.
१९३५- १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे.

कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला... या कार्यक्रमात पु. . देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या... मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.

राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, याचाही विसर पडला असणे शक्य आहे.

गीत, गझल याप्रमाणेचचारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्याविविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या... राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीजकिती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली.

"गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे...

कवी राजा बढे यांच्या व्यक्तिमत्त्वातत ऐसपैसपणा होता, तो नागपूरहून मुंबईला स्थलांतरित झाल्यावरही तसाच राहिला...त्यांनी एकदा एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.

तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..

दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्याा जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..

आपल्या अपुऱ्या, अधुऱ्या जीवनाच्या धावपळीत कवितेचा पदर बढे यांनी हातचा कधीच सुटू दिला नाही. इच्छित यश मिळालं नाही तरी ते कधी निराश झाले नाहीत. मनाला कधी कटुतेचा स्पर्श त्यांनी होऊ दिला नाही. कुठल्या कंपूतही शिरले नाहीत.

ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचंचांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''

गीतकाव्याचा संपन्न आविष्कार करणारे कवी राजा बढे यांनी ७ एप्रिल १९७७ साली हृदयविकारामुळे जगाचा निरोप घेतला..... अशा प्रतिभावंत कवीला विनम्र अभिवादन....
त्यांची गीते आजही स्मरणात आहेत आणि पुढेही राहतील अशी अशा करू....
जय महाराष्ट्र !!!

राजा बढे यांचे १९३१ ते १९७६ या कालखंडात प्रसिद्ध झालेले कवितासंग्रह :-
हसले मनी चांदणे' (१९४१)
माझिया माहेरा जा' (१९५१)
क्रांतिमाला' (१९५२)
मखमल' (१९७६
मंदिका' (१९७६).