Saturday 22 September 2012

रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ - स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी

एखादी कल्पना सुचली की ती मूर्त स्वरूप देऊन ती लोकोपयोगी होईल असे काम स्वार्थत्यागाने करणारे...अतिशय निरलस आणि सेवाभावी वृत्तीने गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणाऱ्यारुग्णांना अतिशय आवश्यक असलेल्या, परंतु सहजरितीने न मिळणाऱ्या अनेक वस्तू नि:शुल्क वा अत्यल्प दरात पुरविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेची स्थापना करणारे रुग्नसेवेतील सेवाभाव जपणारे स्वातंत्र्यसैनिक (कै.) द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी..
कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्यारुग्णोपयोगी वस्तुसंग्रहया कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. तेव्हाचा काळ हा विषमज्वर असाध्य आजार होता गुरुजींचा भाऊ विषमज्वराने आजारी होता. त्याच्या शुश्रूषेसाठी बर्फाच्या पिशवीची गरज होती. खूप प्रयत्न करूनही बर्फाची पिशवी गुरुजींना मिळत नव्हती. अखेर एका सधन विद्यार्थ्यांच्या घरी अडगळीत, धूळ खात पडलेली पिशवी गुरुजींना मिळाली आणि उपचार सुरू झाले.
या धावपळीतच गुरुजींच्या मनात विचार आला, की रुग्ण असलेल्या भावाच्या सेवेसाठी जी वेळ आपल्यावर आली तशी ती आणखी कितीतरी जणांवर येत असणार. ही वेळ खरेतर कोणावरच येता कामा नये. स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींच्या मनाने मग या कामाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभही लगेच झाला. गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटर, युरीन पॉट, कुबडी ही साधनेदेखील तेव्हा दुरापास्त होती. सर्वसामान्यांना ती परवडणे शक्यच नव्हते. सोलापुरातील अनेक धनिकांच्या घरात पडून असलेली अशी साधने गुरुजींनी गोळा केली. स्वत:च्या तुटपुंज्या पगारातील पैसे बाजूला ठेवून ते साठवले आणि त्यातूनच १९३२मध्ये रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह-सोलापूरया संस्थेची स्थापना त्यांनी केली.  रुग्णसेवेचे काम भावे गुरुजींनी सुरू केले, तेव्हा निघाले युरीन पॉट वाटायलाअशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. ते सातत्याने आणि सेवावृत्तीने काम करत राहिले. या कामासाठी आयुष्य वेचलेल्या गुरुजींच्या कामाला पुढे रुग्णसेवेचा भावे प्रयोगअशी जनमान्यता मिळाली.

चाकाची खुर्ची, वॉकर, कुबडय़ा, कमोड खुर्ची, स्ट्रेचर आदी अनेक साधनांची आवश्यकता आजारपणातच भासते आणि या साधनांचे महत्त्वदेखील त्याच काळात समजते. ज्या कुटुंबावर ही वेळ येते, त्यांच्यासाठी ही साधने मिळवणे अनेकदा जिकिरीचे होऊन बसते. या वस्तू विकत घेण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा काळात लोक चिंतातुर होतात. काय करावे समजत नाही. चांगली आर्थिक परिस्थिती असली, तरी वस्तू कायमस्वरूपी लागणार नसल्यामुळे ती विकत घेणेदेखील व्यवहार्य नसते. समाजाची ही गरज ओळखून भावे गुरुजींच्या संस्थेने रुग्णोपयोगी वस्तू गरजूंना नाममात्र भाडय़ाने आणि गरिबांकडून कोणतेही भाडे न आकारता देण्याचे काम सुरू केले. हळूहळू लोकांना या कामाचे महत्त्व पटू लागले.

गुरुजींचा पिंड निरलस समाजसेवकाचा होता. सेवेची कोणतीही कल्पना मनात आली की ती पूर्णत्वाला नेणे एवढाच त्यांचा ध्यास असे. त्यातूनच संस्थेला सेवेचे नवे आयाम मिळाले. साहित्य पुरवण्याबरोबरच रुग्णांची घरी जाऊन सेवा करणे, किरकोळ आजारात किरणोपचार करणारी यंत्रे अत्यल्प भाडय़ात देणे, रुग्णांच्या सेवा-शुश्रूषेसाठी अटेंडंट देणे, महापालिका शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवणे, मुलांना दुधाचे वाटप, मोफत दवाखाना, फिरता दवाखाना, अत्यल्प दरात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे ही आणि अशी अनेक कामे संस्थेने सुरू केली. या सर्वच कामांची निकड एवढी होती, की संस्थेचा पसारा वाढत राहिला. त्यातून गुरुजींनी सोलापुरात संस्थेची स्वत:ची वास्तू निर्माण केली आणि आजही या वास्तूचा वापर रुग्णसेवा तसेच अनुषंगिक उपक्रमांसाठीच सेवाभावनेतून केला जातो.

सोलापुरात आणि जिल्हय़ात ज्या ज्या कोणी महत्त्वाच्या व्यक्ती येतील त्यांना आग्रहाने संस्थेत न्यायचे आणि संस्थेच्या कामाची ओळख करून द्यायची, यासाठी भावे गुरुजी खूप आग्रही असायचे. अनेकांना ते मुंबईत आणि दिल्लीतही जाऊन भेटले होते. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, झैलसिंग, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, भाऊसाहेब बांदोडकर, कमलाताई होस्पेट, लीलाताई मुळगावकर, सुशीलकुमार शिंदे अशी शेकडो नावे सांगता येतील की ज्यांनी संस्थेचा गौरव केला आहे.

अनेकदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेले काम त्या व्यक्तीच्या पश्चात तितक्या प्रभावीपणे चालतेच असे नाही. भावे गुरुजींनी मात्र स्वत: काम करतानाच अनेक सहकारी असे तयार केले, की गुरुजींच्या पश्चात हे काम आजही पूर्वीच्याच सेवाभावी वृत्तीने आणि आत्मीयतेने गुरुजींनी घालून दिलेल्या मार्गाने आजही सुरू आहे. सत्त्याण्णव वर्षांपर्यंत गुरुजी हे काम करत राहिले. जीवनातील त्रेसष्ट वर्षे त्यांनी या कामासाठी दिली. रुग्णांचे नातेवाईक वस्तू नेण्यासाठी रात्री-अपरात्री, अगदी सणावाराच्या दिवशीदेखील येतात आणि त्यामुळे बारा महिने-चोवीस तासही या कामाची वेळ आहे; पण कधीही न कंटाळता, न थकता, न रागावता गुरुजींचे संपूर्ण कुटुंब हे काम करत राहिले. त्यात पत्नी इंदिराबाई यांची फार मोलाची साथ त्यांना लाभली. आलेल्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला दिलासा देण्याचे कामही वस्तू देताना केले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ही संस्था अडचणीच्या काळात मोठा आधार ठरते.  गुरुजींचे पुत्र रमेश हे १९७७ मध्ये पुण्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आणि पुण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी संस्थेचे काम पुण्यातही सुरू केले. पुण्यात आता रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्थेची तीन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये वस्तू नाममात्र भाडय़ाने देण्याचे काम चालतेच, शिवाय रमेश भावे यांनी या सेवाकार्याला आता आणखी काही पैलू जोडले आहेत. गरम पाण्याची पिशवी, बर्फाची पिशवी, चाकाची खुर्ची, घडीच्या कुबडय़ांपासून ते एअरबेडपर्यंत या आणि अशा अनेक रुग्णापयोगी वस्तू अत्यल्प दरात आणि प्रसंगी नि:शुल्क पद्धतीने देण्याचे काम केंद्रातर्फे पुण्यात चालते. गरीब आणि गरजू रुग्णांना सवलतीने रक्त मिळवून देण्याचेही काम केले जाते. रक्तदानानंतर मिळणारी आणि रुग्णाचे सहाशे ते एक हजार रुपये वाचवणारी सवलतपत्रे संकलित करून ती गरजू रुग्णांना देणे, गरजूंना अध्र्या किमतीत रक्त मिळवून देणे, ज्येष्ठांना एक रक्तपिशवी विनामूल्य देणे, गरजूंना रक्त मिळावे यासाठी रक्तपेढय़ांना निधी देणे यांसह अनेक कामे संस्थेतर्फे सुरू आहेत.

रमेश आणि त्यांची पत्नी ललिता भावे हे दोघेही गेली चाळीस वर्षे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून रुग्णसेवेचे काम पुण्यात करत आहेत. रुग्णसेवेबरोबरच संस्थेसाठी आर्थिक स्वरूपाची मदत गोळा करण्याकरता सातत्याने पायपीट करावी लागत असली, तरीही ते ज्या पद्धतीने हे काम करतात त्यामागची प्रेरणा खरोखर भावे प्रयोगहीच आहे.
 
संस्थेतर्फे भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. ज्या वयोवृद्ध, महिलारुग्ण आणि गरीब रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देणे किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्य उपलब्ध करून देणे हे काम पुण्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत त्यासाठी लाखो रुपये उभे करण्यात आले आणि ते गरजू रुग्णांच्या रक्तासाठी वापरण्यात आले. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. समाजाच्या पाठबळावर सुरू असलेल्या या कामात गुरुजींनी आणि त्यांच्यानंतर हे काम सांभाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांने, विश्वस्ताने कमालीचा पारदर्शीपणा ठेवला आहे. कोणतीही आर्थिक बाब पावतीशिवाय करायची नाही हा गुरुजींचा दंडक होता. तो आजही कसोशीने पाळला जातो. ज्या कामासाठी समाजाने निधी दिला आहे, त्याच कामासाठी त्यातील पै अन् पै खर्च झाला पाहिजे ही संस्थेतील प्रत्येकाचीच तळमळ असते. म्हणूनच संस्थेने समाजात खूप मोठी विश्वासार्हतादेखील मिळवली आहे. संस्थेचे कार्य गेली ऐंशी वर्षे सुरू आहे ते समाजाच्या पाठबळावर. भविष्यातही रुग्णांच्या मदतीसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे.

भावे गुरुजी रक्तदान सेवाहे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. वयोवृद्ध रुग्ण, महिला रुग्ण आणि गरीब रुग्ण यांच्यापैकी ज्यांना ज्यांना रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी या योजनेत सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्यदेखील उपलब्ध करून दिली जाते. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. अशा रुग्णांना रक्तसंक्रमणासाठी आवश्यक असणारे डायलायझरहे उपकरण सातत्याने विकत घ्यावे लागते. त्यामुळे डायलिसीसच्या रुग्णांकडून या उपकरणाची मागणी सतत होत असते. रक्त मिळवणे सर्व दृष्टींनी खर्चिक व अवघड होत असल्यामुळे किमान हे उपकरण गरजू, गरीब रुग्णांना सवलतीने आणि शक्य झाल्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना संस्था आता हाती घेत आहे.संस्थेला एका मोठय़ा ट्रस्टकडून गेली अनेक वर्षे भरीव देणगी मिळत होती. यंदा मात्र काही कारणांनी या ट्रस्टने देणगीबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी नव्या योजना हाती घेत असतानाच संस्थेच्या कामालाही मर्यादा येत आहेत. गरजू रुग्णांसाठी खूप काम करण्याची गरज आहे, काम करण्याची तयारीदेखील आहे; पण हाती तेवढा निधी नाही, अशा परिस्थितीत सापडलेल्या या संस्थेला आता समाजानेच पाठबळ देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
  
समाजाच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या या कामाची समाजाला आजही नितांत गरज आहे. इतरांच्या व्यथा, वेदना थोडय़ाशा हलक्या करण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सेवेचा ध्यास घेतलेल्या या भावे प्रयोगाला शक्य ती मदत करायलाच हवी.
ज्यांना मदत करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा...
* संपर्क : रमेश भावे, कोथरूड (फोन नंबर-  ९६२३९ ३८१०९)
सौजन्य- लोकसत्ता...

Saturday 15 September 2012

कविवर्य विंदा करंदीकर - कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील दृष्टी असलेले कवी...


मराठी साहित्यातील एक ख्यातनाम कवी, लेखक, समीक्षक..... मराठी साहित्य संस्कृतीच्या अभूतपूर्व सर्जनशीलतेच्या बहराचे वासंतिक पर्वाचे जनक आणि त्याच पर्वाचे एक अपत्य....त्या वासंतिक वनात स्वतःच्या सर्जनाचा वाफा फुलवित सुसंस्कृत साहित्य निर्माण करणारे.. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळवित, मराठीला आपल्या श्रेष्ठ काव्यनिर्मितीने तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कविवर्य विंदा करंदीकर....!!!
‘आपल्या प्रतिभेचे शील शाबूत ठेवण्यासाठी व तिच्या विकासाच्या शक्यता जिवंत राखण्यासाठी कवीने आपली मस्ती सांभाळली पाहिजे...’ असा एक महत्वाचा कानमंत्र करंदीकरांनी सांगितला आणि या ‘मस्ती’ची व्याख्याही त्यांनी केली आहे. - ‘काव्याच्या सृजनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’ हे कवीचे व्रत आहे. या व्रतातूनचं विंदा करंदीकरांची कविता ही जन्मली आणि आपल्या मस्तीत मुक्तपणे जगली....
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म  २३ ऑगस्ट१९१८ रोजी
घालवणसिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर  हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरीरामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबईएस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठीइ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली.  संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातीलपहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
१९३७ ते १९८५ हा काळ म्हणजे  विंदांच्या लेखन प्रवासाचा कालखंड.... या कालखंडात त्यांनी आपल्या जीवनधर्म असलेल्या काव्यरचनेत विविध प्रयोग केले. बालकविता, तालचित्रे, अभंग, सूक्ष्मरचना, मुक्तसुनिते ,विरूपिका असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. ‘अमृतानुभवा’ सारख्या तत्वकाव्याचे अर्वाचीनीकरण हा सुद्धा विंदांचा एक प्रयोगचं होता. अशा अनेक अंगांनी काव्यनिर्मिती करून करंदीकरांनी मराठी कवितेत फार मोलाची भर टाकली. विंदांना कविता म्हणजे स्वदेशगंगा वाटायची.. त्यांची  ‘स्वदेशगंगे’ पासूनची  काव्यगंगा पुढे विविध वळणे घेत वाहू लागली .कालांतराने या गंगेला  ‘बालकविता’ यमुनेच्या रुपात मिळाली. मोठ्या माणसांना ज्ञानात्मक आनंद देणारी आणि लहान मुलांना वेगळ्या राज्यात नेणारी बालकविता ही विंदांची मराठी  काव्यासृष्टीला मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या ‘मावशी’ ,‘घड्याळ’, ‘पंतोजी’, ‘बेडकाचे गाणे’, ‘जादूगार’, ‘पतंग’ या बालगीतातील नाट्यप्रसंगातून तर त्यांनी बालकांचे निरागस मन प्रगट केले.
विंदा कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही ते इंग्रजी साहित्याचे गाढे, व्यासंगी प्राध्यापक होते. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते. इंग्रजी साहित्य आणि त्यातील विचारातून  त्यांच्या स्वतःच्या मर्मदृष्टीला, चिकित्सक वृत्तीला खूप काही घेता आले . काही महत्वाच्या इंग्रजी साहित्यकृतींचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. कुठल्याही साहित्यसंस्कृतीचा कणा हा भाषा असतो, याचं सजग भान असल्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापक असूनही मराठीतील नानाविविध बोलीभाषांच्या  खजिन्याकडे ना कधी दुर्लक्ष केलं आन्ही कधी तुच्छ लेखलं... विंदांची वृत्ती ही जीवनाभिमुख होती. जीवनाचे स्वागत करणारी, जीवनाविषयीची अशा बाळगणारी, त्यात रस घेणारी होती. त्यांच्यामध्ये नैराश्य किंवा कडवटपणा नव्हता. त्यांच्या कवितेने कधी कधी धारदार शस्त्राप्रमाणे वर केले तर कधी उपरोधाचा तीव्र प्रहार केला पण तरीही माणसांमधील मार्दव आणि कोमलता यांचा त्यांना विसर पडला नाही...
जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी  जाणीव विंदांच्या कवितेला व्यापून टाकते. ‘ये यंत्रा ये’ म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा,  क्रांतीची चाहूल घेत, ‘माझ्या मना बन  दगड’ असेही म्हणतात...वर्गसंघर्षचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. त्यांची बालगीते असो, परम गीते असो वा स्त्रियांसाठी लिहिलेले स्थानगीते असो, यातील प्रत्येक गीतांमध्ये ‘जीवनातल्या वास्तवाची पेरनी सहजगत्या  करणे’ हे त्यांचे खास वैशिष्ट्य दिसून येते. ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ या त्यांच्या ललित लेखांतील बहुतेक  निबंधांतून त्यांची चिंतनशील वृत्तीही दिसून येते. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य...
 विंदांनी पारंपारिक मुक्तछंदातही अनेक प्रयोग केले. मुक्तछंदाचे स्वातंत्र्य आणि सुनीत रचनेतील ओळींचे बंधन यांच्या मेळातून ‘ मुक्तसुनीत’ तयार केले. ‘आज प्रार्थना प्राणाऐवजी’ हे तेरा ओळींचे तर ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगाऱ्यावर’ हे  पंधरा ओळींचे सुनीत त्यांनी लिहिले. यात वृत्त व यमक संगती नसली तरी आवाका व परिणाम या दृष्टीने सुनितप्राय राहणे हे मुक्तीसुनितचे लक्षण ठरले.
विंदांनी जशा मुक्छांदात कविता लिहिल्या तशा गाजला अभंग या प्रकारातही रचना केल्या... त्यांनी सामाजिक आशयाची कविता केली तर प्रेमकावितेला नाक न मुरडता तितक्याच आत्मीयतेने प्रेमकविताही केल्या, जितक्या निष्ठेने प्रौढांसाठी प्रलाग्भ कविता लिहिली तितक्याच निष्ठेने बालगीतसुद्धा लिहिली.. विंदा समकालीन साहित्याबद्दल म्हणत की .."वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." याचं विचाराला अनुसरून विंदांची लेखणी चोफेर चालली.  कवितेसोबतच ललित लेखन, समीक्षा. अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रांतात विंदा लीलया वावरत राहिले.
विंदा करंदीकरांना त्यांच्या या साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे...
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार,केरळ (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान, मध्यप्रदेश (१९९१)
जनस्थान पुरस्कार,कुसुमाग्रज प्रतिष्ठान( १९९३)
कोणार्क पुरस्कार, ओरिसा(१९९३)
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स

आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी   जाने. २००३  रोजी जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी आंतरिक भावना व्यक्त केल्या. काव्य हाच जीवनधर्म मानणाऱ्या विंदांचे १४ जानेवारी २०१० रोजी मुंबई येथे  त्यांचे निधन झाले.
विंदांच्या कितीही कवित्या आठवल्या तरी त्यांची ‘घेता’ ही कविता मराठी काव्यसृष्टीच्या अंतापर्यंत स्मरणात राहील..
देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
देणाऱ्याचे हात घ्यावेत ....
अशा या मराठी साहित्यविश्वात बहुस्पर्शी कामगिरी करणाऱ्या कलावंत म्हणून मोठे असलेल्या आणि माणूस म्हणून त्याहूनही मोठे असलेल्या कविवर्य विंदा करंदीकरांना शतशः नमन........

Friday 7 September 2012

कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल - तेजाने तळपणारी ज्योत....


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावळीत जनरल भोसले, कर्नल सहगल यांच्यात झळकणाऱ्या....पूर्वायुष्यातील तेजस्वी पर्वाचा गर्व न बाळगणाऱ्या...जातिभेद, गरिबांच्या पिळवणुकीबद्दल तळमळीने बोलणाऱ्या, संघटित लोकक्रांतीसाठी अजूनही धडपडणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या....वाईट राजकारणाला नाकं न मुरडता, न घाबरता पेटून उठाम्हणणाऱ्या...भारतीय इतिहासात स्वत:च्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या वीरांगना...!!!
अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थानात प्रथम लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व होते नंतर  महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशांनी अहिंसक लढे दिले. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, या विचारावर विश्वास असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौजेच्या राणी झाशी रेजिमेंट या महिलांची पलटणच्या प्रमुख भारतातून सिंगापूर मध्ये व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या पहिल्या स्त्री सेनापती कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल....!!
डॉ. लक्ष्मी स्वामिनाथन यांचा जन्म चेन्नई येथे २४ ऑक्टोबर  १९१४ रोजी डॉ. एस स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्याच्या घरी झाला. कॅप्टन लक्ष्मी यांचे वडील बॅ. स्वामिनाथन हे चेन्नईतले अतिशय पुढारलेल्या विचारांचे, जात-पात, धर्म ही उतरंडीची समाजव्यवस्था ण मानणारे प्रसिद्ध वकील होते.ते  एक असे देशभक्त होते की ज्यांना इंग्रजांवर त्यांनीच दिलेल्या शिक्षणाने मात करायची होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या बायकोला मुलींना इंग्रजी,  तमिळ,मल्याळी या भाषा शिकविल्या. घरात सतत इंग्रजी वातावरण ठेवले पण एका इंग्रजाच्या खुनाचे वकीलपत्र बॅरिस्टर स्वामिनाथन यांनी घेतले म्हणून या परिवाराला संबंधित सर्व इंग्रज स्त्री-पुरुषांनी बहिष्कृत केले तेव्हापासून त्यांच्या घरात भारतीय वातावरण असायचे. त्याच वेळी महात्मा गांधीजींची असहकाराची चळवळ सुरू झाली. लक्ष्मीने आपले सर्व परदेशी कपडे व वस्तू होळीत टाकल्या. म. गांधींबद्दल तिला परम आदर वाटत होता तो अगदी शेवटपर्यंत.
१९२८ मध्ये कॅप्टन लक्ष्मी यांनी कोलकाता काँग्रेस मध्येआपल्या आई आणि २०० स्वयंसेविकांबरोबर   गणवेशात संचलन केले. त्यांच्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक दिवसाची अटकही झाली. शाळा, कॉलेजवर बहिष्कार घालून शिक्षण सोडणे ही कल्पना कॅप्टन लक्ष्मी यांना पटली नाही. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण हवेच व ते त्या वयातच घेतले पाहिजे, असा त्यंचा ठाम विश्वास होता. मात्र या चळवळीत त्यांनी आपल्या अंगावरचे सर्व दागिने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या मदतीसाठी दिले.
सरोजिनी नायडूंची बहीण सुहासिनीचे कॅप्टन लक्ष्मीच्या आयुष्यात पदार्पण हा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. सुहासिनीकडूनच त्यांनी राजकारणाचे प्राथमिक धडे घेतले. गांधी व नेहरू यांच्याकडून कधीही समग्र क्रांती होणार नाही. त्यांचे राज्य हे श्रमजीवींचे असणार नाही. जगभर श्रमिक भरडला जातोय. म्हणून समाजवादाला पर्याय नाही असे सुहासिनीने लक्ष्मी यांच्या  मनावर ठसविले. कॅप्टन लक्ष्मी एम.बी.बी.एस.चा अभ्यास करीत होत्याच पण त्याचबरोबर रशियन राज्यक्रांती, रशियामध्ये साम्यवादाचा उदय वगैरे जे जे साहित्य मिळेल ते वाचत असतं. एडगर स्नोचे Red star over China या पुस्तकाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. जे पटेल तेच स्वीकारायचे व कितीही विरोध झाला तरी करायचे हे तिथे ध्येय होते.  त्यांच्या वडिलांवरही कम्युनिस्ट विचारांचा पगडा आणि तिला आलेले अनुभव त्यातूनच त्यां पुढे कट्टर कम्युनिस्ट बनल्या.
कॅप्टन लक्ष्मी यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच बी. के. एन. राव नावाच्या विमानचालकाशी त्यांनी  प्रेमविवाह केला पण, लग्नानंतर लगेचच त्यांचा भ्रमनिरास झाला. राव यांना आपली सुंदर पत्नी म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट वाटत होती. त्यांनी तिला कॉलेज सोडून संसार करायचा असे बजावले. त्यामुळे आपल्या ध्येयापुढे आड येणाऱ्या प्रेमविवाह झालेल्या नवऱ्याचा कायमचा त्याग करून यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९३८ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून त्यांनी  स्त्रीरोगतज्ज्ञाची पदवी घेतली आणि व्हिक्टोरिया क्रॉस हॉस्पिटलमधील विभागात नोकरी धरली. ११जून १९४०ला पुढील अभ्यासासाठी आणि गरीब स्त्रियांची सेवा करण्याच्या ध्येयाने त्या सिंगापूरला गेल्या. कॅप्टन मोहन सिंग या ब्रिटिश सेनेतील भारतीयाच्या साहाय्याने त्यांनी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ स्थापन केली.
सुभाषचंद्र बोस हे आशियात दाखल झाल्यावर त्यांनी सिंगापूर येथे सार्वजनिक सभेमध्ये भारतीय नागरिकांना उद्देशून भाषण केलं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा.त्यांच्या भाषणानंतर डॉ. लक्ष्मीने त्यांची भेट घेतली. त्यांना विचारलं, की तुम्ही स्त्रियांना सैन्यात प्रवेश का देत नाही?’ सुभाषचंद्र बोस म्हणाले, ‘स्त्रियांची पलटण तयार करण्यासाठी कमीत कमी ३००० स्त्रिया हव्यात. एवढय़ा तयार होतील का?’ तत्क्षणी  डॉ. लक्ष्मी यांनी त्यांना ३००० स्त्रियांना राजी करण्याचा शब्द दिला. हिंदुस्तानी बायका मागे राहणाऱ्या नाहीत. त्या अत्यंत कर्तृत्ववान आहेत हे ओळखून बाईंनी सिंगापूर-मलेशियातल्या ३००० बायका गोळ्या केल्याही. आम्ही रक्त देऊ, कुर्बानी देऊ, पण बायका म्हणून मागे ठेवू नका.हे त्यांनी बोस यांना कळकळीने सांगितलं. आणि स्त्रियांची पलटण तयार झाली. पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’चे सुभाषचंद बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’ असे नामकरण केले व या फौजेची ‘राणी झाशी रेजिमेंट’ ही महिला पलटण स्थापन करून लक्ष्मी यांची प्रमुख म्हणून नेमणूक केली.  त्यानंतर त्यांनी पूर्व मलाया व सिंगापूरचा दौरा करून बायकांच्या सभा घेतल्या. ज्यांना पलटणीत येता येत नव्हते, त्यांना सैन्यासाठी कपडे शिवणे, विणणे, बँडेज तयार करणे अशी कामेही सुचविली. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला.

२१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबूंनी आझाद-हिंद-सरकारची घोषणा केली व लक्ष्मीला महिला व बालकल्याण खात्याची कॅबिनेट मंत्री केले. दुसऱ्याच दिवशी महिला पलटणीचे विधिवत व आझाद-हिंद सरकारची पलटण म्हणून उद्घाटन झाले. १९४४ पर्यंत १००० महिला जवान व ५०० परिचारिका जवान अशी १५०० ची पलटण झाली. युद्धसमाप्तीपर्यंत कॅ. लक्ष्मी लेफ्टनंट कर्नलच्या हुद्दय़ावर पोहोचली. या हुद्यापर्यंत पोहोचणारी ती पहिलीच महिला.
१९४७ मध्ये कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाहानंतर त्या कानपूरमध्येच स्थायिक झाल्या. डॉ. लक्ष्मींनी तिथे आपले दोन खाटांचे आणि फक्त ५ रुपये फी असलेले प्रसूतिगृह उघडले. हा दवाखाना त्यांनी शेवटपर्यंत चालविला अगदी वय वर्ष ९० पर्यंत...... १९७१ साली त्या  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या  सदस्य बनून कामे पाहू लागल्या. त्यांना १९९८ मध्ये ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले होते. तर डाव्या पक्षांनी त्यांना त्यांच्या अखेरच्या पर्वात २००२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिली होती. वयोवर्धन परिषदेतही त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य माणूस जोवर जागृत होऊन अन्यायाच्या प्रतिकारात उभा राहत नाही, तोवर दुसरा पर्याय नाही. लोकक्रांती हेच भ्रष्ट राजकारणाला थेट उत्तर आहे. असे मानणाऱ्या वयाच्या ९३ वर्षीही तितक्याच धडाडीने काम करणाऱ्या...अत्यंत तत्त्वनिष्ठ, प्रसंगी महामायेचे रूप धारण करणाऱ्या...आपल्या शेवटच्या क्षणीही आपले पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याऱ्या कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल २३ जुलै २०१२ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी अनंतात विलीन झाल्या...
अशा या विसाव्या शतकातील रणरागिणीला, असामान्य धैर्याच्या, कर्तृत्वाच्या विरांगनेला......संपूर्ण महाराष्ट्राचे कोटी कोटी प्रणाम..!!!